जेव्हा दोन देशांत युद्ध होतं
नागरिक घरी बसून करतात
आकांडतांडव
शत्रूला धडा शिकवलाच पाहिजे,
आपण जिंकलोच पाहिजे
आणि हवाई हल्ल्याचा सायरन वाजला
की हेच शूर नागरिक बसतात
आपापल्या बिळात लपून
दिवे घालवून, प्रार्थना करत
स्वतःसाठी, पोरांबाळांसाठी
पण जेव्हा दोन देशांत युद्ध होतं
तेव्हा सैनिक असतात उभे
सीमेवर ठाम
गोळ्यांच्या वर्षावात
शत्रूच्या जीवघेण्या हल्ल्यात
तिथे हल्ल्याचे सायरन वाजत नाहीत
वाजतात दूरवर तोफा
आणि गोळे बरसतात, जणू अग्निप्रलय
सैनिक आसरा घेतात फॉक्सहोल्सचा
आडव्या टाकलेल्या झाडांचा आणि
तात्पुरत्या उभारलेल्या पोत्यांच्या भिंतींचा
जमिनीत, झाडोऱ्यात त्या भीषण तांडवात
सैनिक उभा असतो प्राण जाईपर्यंत
त्याची बंदूक आग ओकत असते
त्याचे डोळे, त्याचा प्राण पेटलेला असतो
पण त्याच्या मूक प्रार्थनेत असतो
त्याचा देश आणि त्याचे सहकारी
जेव्हा दोन देशांत युद्ध होतं
तेव्हा सैनिक लपून बसत नाहीत,
ते सामना करतात शत्रूच्या लोंढ्याचा
लढतात प्राणपणाने भ्याड नागरिकांसाठी
आणि देह ठेवतात मातृभूमीसाठी
मरेपर्यंत आठवणसुद्धा येत नाही
त्यांना कुटुंबियांची
शेवटच्या क्षणी मात्र असतो
एखादा फोटो हातात
किंवा एक बारीकशी कळ काळजात
ती वेदनाच घेऊन जाते त्यांना
पलीकडे
जेव्हा सीमेवर सैनिक शहीद होतात
काहींचे मृतदेह पाठवले जातात
अंत्यसंस्कारांसाठी
काही सैनिक मात्र राहतात मागेच
अनाम बनून, हरवून जातात
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात
राहतात त्या त्यांच्या आठवणी
त्यांच्या कुटुंबासोबत
कारण त्यांच्याच देशाचे शूर नागरिक
दुसऱ्याच दिवशी विसरलेले असतात
त्यांचं हौतात्म्य
सैनिकांची कुटुंबं उध्वस्त होतात आणि
नागरिक रमतात त्यांच्या विलासात
पुन्हा काही वर्षांत
जेव्हा त्याच दोन देशांत युद्ध होतं
त्याच सीमा पुन्हा पेटून उठतात गोळे आणि गोळ्या अजून भीषण होतात
अजून सैनिक मरतात शूरपणे
मातृभूमीसाठी आणि तिथल्या
भ्याड नागरिकांसाठी
काही पोहोचतात अंत्यसंस्कारांपर्यंत
आधीचे अनाम सैनिक असतात तिथेच काही सैनिक मात्र पुन्हा राहतात मागेच
अनाम बनून, हरवून जातात
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात
त्यांना समजून घेण्यासाठी
त्यांना एकटं वाटू नये म्हणून
दरवेळी जेव्हा दोन देशांत युद्ध होतं
नागरिक पेटतात, विझतात
सैनिक मात्र चुकवत राहतात
देणं मातृभूमीचं
आणि अनाम सैनिकांची भरती
होतंच राहते
सीमेवरच्या जमिनीत, झाडोऱ्यात
- समीर (२२/०५/२०२५)