Sunday, July 26, 2020

पुस्तक कसे वाचावे? - अर्थात माझे रिकामे उद्योग



आपण एरवी बरेच वेळा खाद्यपदार्थांचे लेख - ते बनवण्याचे, सजावटीचे, खाण्याचे - पाहतो, वाचतो, अनुभवतो. पण कधी हा विचार केला आहे का, की आपण पुस्तक कसं वाचतो. मी भरल्या पोटी आणि रिकाम्या डोक्याने जे विचाराचं गुऱ्हाळ चालवतो, त्यातून निघालेली रत्नं अशी कधीकधी वाचणाऱ्यांना वाटत असतो. हे सुद्धा त्यातलंच एक.

पुस्तक कोणतंही असो, विषय काहीही असो, लेखक कोणीही असो, पुस्तक वाचायला घेताना ते संपूर्ण वाचण्याचा संकल्प करूनच त्याला हात घालावा. पुस्तक अर्धवट वाचून, आपले विचार खरकटे करून तसेच सोडून देणारे लोक मुळी पुस्तक वाचतच नाहीत. ते आपले उगाच कुणाच्या तरी सांगण्यावरून, दबावाखाली पुस्तकाला शिवतात फक्त. मिसळ खायला बसल्यावर अस्सल तब्येतीत खाणारा खवय्या जसा मिसळीचा, तर्रीचा एक थेंब सुद्धा मागे सोडत नाही, तसचं एक अस्सल वाचक पुस्तकाचं पहिलं, शेवटचं पान, प्रस्तावना, अपोद्घात, उपोद्घात, काहीकाही सोडत नाही.

पुस्तक वाचताना शक्यतो पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचावे. उगीच  पुढल्या पानांवर उड्या मारत मारत वाचू नये. काही लोक शेवटसुद्धा वाचून घेतात. हे म्हणजे पंगतीला बसल्यावर यजमानांनी पानापुढे विडा- दक्षिणा ठेवल्यावर जेवण सोडून तो विडाच आधी खाण्यासारखे आहे. शक्यतो असला आचरटपणा टाळावा. पुस्तक वाचणे ही पंगत रंगवण्यासारखीच कला आहे. तिथे उनाडपणा कामाचा नाही.

एखादं सनसनाटी पुस्तक वाचताना पहिल्या वेळी तरी ते पुस्तकाच्या वेगाने वाचावे. त्याची समीक्षा, चर्चा, रवंथ हे सगळं नंतरच्या वाचनांसाठी राखून ठेवावे. अशी पुस्तकं वाचताना सुरुवात ते शेवट कथानकाच्या वेगाने वाचून एकाच बैठकीत एकसंध वाचून काढण्यात जी मजा आहे, त्याची तुलना केवळ पाणीपुरीशीच होऊ शकते. पाणीपुरी जशी - "देणाऱ्याने देत जावे, खवय्याने खात जावे, खाताखाता पुन्हा पुढली डिश ऑर्डर करत रहावे" - खातात तसचं. पाणीपुरी अर्धवट सोडून ती तासाभराने खाणाऱ्याला जशी भर चौकात मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते, तशीच इच्छा थ्रिलर पुस्तक टप्याटप्याने वाचणारे लोक पाहून होते. ती पाणीपुरी बिचारी लिबलिबीत होऊन असहाय्य स्थितीत प्लेटमध्ये पडून राहते तशीच पुस्तकं सुद्धा वाचकांची वाट बघत पडून राहतात.

याच्या बरोबर उलट, जेव्हा आपण ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो, तेव्हा त्यातले प्रसंग समजून घेऊन त्यावर आपला विचार पणाला लावून, गरजेप्रमाणे गोष्टी गुगलून,  पुस्तक शांतपणे आस्तेकदम बामुलाहिजा वाचावे. तिथे घाई करायची नाही.  पुस्तकातल्या समरप्रसंगात आपणही तिथेच जिवाच्या आकांताने लढतो आहोत असे वाटून अंगात वीरश्री संचारली पाहिजे. पन्नास कोसावर ढग गडगडून काही फायदा नाही.

कवितांची पुस्तकं ही रसिक मैत्र जमवून रसग्रहण करत वाचावीत. कवीला कवितेत काय सांगायचे आहे ते सगळं एका वाचकाच्या लक्षात येणे केवळ अशक्य. तिथे 'समानशीले व्यसनेशु सख्यं' मित्र घेऊन कवितेचे साधकबाधक रसग्रहण करून ती वाचावी. बासुंदी जशी भसाभसा पित नाहीत, ती कशी तब्येतीत, प्रत्येक चमच्यात अवीट सुंदरता भरून प्यायची असते, तसचं कवितेचं.
'मधुशाला' सारख्या कविता मात्र रंगील्या मिजाशीत रांगील्या दोस्तांबरोबर ऐकाव्या, वाचाव्या. तुम्ही भले रंगीले नसाल तरीही अशा वातावरणात त्या सायंस्मरणी कवितेची झिंगच तुम्हाला पुरेशी होते.

लघुकथा संग्रह वाचताना सोबत चणे फुटाणे वगैरे घेऊन बसावे. कथेबरोबर जिभेचेसुद्धा लाड करावे. कथेची चव जिव्हेला आवडेपर्यंत हा कथायज्ञ सुरू ठेवावा. प्रत्येक कथेला पुरेसा वेळ आणि न्याय देण्याचा प्रयत्न करावा.  इथे वेळेचे बंधन नाही. हवे तसे हवे तेव्हा वाचन हीच त्याची खासियत.

विनोदी कथा वाचताना त्यातल्या विनोदाला मनमोकळी दाद द्यावी. उत्तम विनोदनिर्मिती ही अतिशय सिन्सियरपणे करायची गोष्ट आहे हे तसा विनोद स्वतःला सुचेपर्यंत कळत नाही. त्यामुळे उगीच चोरून वाचल्यासारखे करू नये. 'टवाळा आवडे विनोद' असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहेच, त्यामुळे तात्पुरतं  टवाळपण अंगिकारून पुस्तकाची मजा घ्यावी.

इतकं करूनही काही पुस्तकं असतात जी लवकर पचत नाहीत, संपता संपत नाहीत. अशा पुस्तकांना तोंडीलावणे म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वाचनातली पुस्तकं घेऊन ती पूर्ण करावी. सत्याचे प्रयोग हे पुस्तक मी सुशिंच्या कादंबऱ्या सोबतीला घेऊन संपवलं होतं. इच्छाशक्तीला थेट आव्हान देणारी अशी पुस्तकं वाचून साधारणपणे एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद होतो. तेवढंच काय ते सिल्व्हर लायनिंग.

ज्ञानेश्वरी, भगवदगीता, दासबोध ही वडील मंडळी, यांच्या खोड्या काढायला जाऊ नये. आपली वैचारिक पातळी, समज, आपल्या डोक्यातला कंदील एकूणच किती उजेड पाडतो या सगळ्याचा एकत्रित विचार करून या अशा पुस्तकांना हात घालावा. 'येथे पाहिजे जातीचें, येरागबाळ्याचे हे काम नव्हें', तेव्हा आपण येरूपणाच्या पुढे गेल्यावरच करायचा हा उद्योग आहे. थिल्लरपणा इथे वाचकाला सर्वस्वी उघडा पाडतो. जिथे ज्ञानेश्वरांचे पसायदान समजणेच इतके अवघड, तिथे ज्ञानेश्वरी वाचायचा प्रमाद येरुंनी शक्यतो टाळावा. दासबोध हा वाचकाच्या वर्तनातल्या ढोबळ चुका इतक्या मर्मावर बोट ठेवून दाखवून देतो की मनातल्या मनात कित्येक वेळा स्वतःचीच धिंड निघाल्याचा फिल येतो. यांच्यासाठी पोक्त वय राखून ठेवणेच योग्य. संसारातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय यांच्यातला खरा अर्थ कळणार नाही, झेपणार नाही. 

बाकी पुस्तकं वाचताना दुमडू नयेत, त्यावर लिहू नये, फराटे रेघोट्या मारू नये हे तर शहाण्यास सांगणे न लगे. पुस्तकं विद्रूप करणारे पुढल्या जन्मी गांडूळ होतात असा माझा ठाम समज आहे. पुस्तक शक्यतो दोनदा तीनदा वाचावे, प्रत्येक वेळी ते नव्याने कळते हा स्वानुभव आहे. असे हे पुस्तकवाचन पुराण प्रत्येक वाचकास पुस्तक वाचनात उपयोगी पडेल असा गैरसमज करून घेऊन  हा रिकाम्या वेळचा उद्योग थांबवतो.

समीर

Friday, July 7, 2017

थेंब!

हुश्श! सुटलो एकदाचा.


खूप दिवस अडकून पडायला झालं होतं. आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. मस्त गार गार! असं सुसाटत बाणाच्या वेगानं जमिनीकडे जाताना मनाला काय वाटतं ना, सांगताच येणार नाही कधी. असं छान शांत शांत वाटतंय, या वाटण्याची सर त्या तिथे, वर निवांत बसून राहण्याला नव्हतीच कधी. सतत सुटकेची आस, सतत निघून, सोडून, पळून जाण्याची इच्छा! बस्स, आज पूर्ण झाली. 

आता काय करू आणि काय नको असं होतंय. ही तप्त-संतप्त धरा शांत-तृप्त करून टाकेन. जगातल्या कुठल्याही अत्तरतज्ज्ञाला जमणार नाही असा सुगंध निर्माण करेन. या पृथ्वीचं नंदनवन करून टाकेन. सर्वांना पुरेसं आणि पोटभर मिळेल याची तजवीज करेन. जगातल्या प्रत्येक जीवात जगण्याची नवी उर्मी निर्माण करेन मी!

काय करू आणि काय नको असं झालंय. काय नको? कुणाचं नुकसान नको, शिव्याशाप नकोत. ज्यापायी हे होतं तो सुसाटणारा वेगही नको. वेग नको? अरे, मग आत्ताच लाभलेली ही मनाची शांतता कुठून आणायची? वेग नको तर मग ताकद कुठून पैदा करायची? आणि ताकद नको, तर मग चराचरावर सत्ता गाजवायची अशी आयती चालून आलेली संधी सोडून द्यायची? आणि करायचं काय, स्वस्थ पडून राहायचं डबक्यात? हेच करायचं होतं तर मग होतो त्या तिथेच बसून राहायला काय दुखत होतं?

या वेगात, त्याच्या ताकदीत काहीतरी विलक्षणच आहे. अशी नशा, अशी धुंदी आहे जिची तुलनाच नाही. एकाच वेळी हजारो कंपन निर्माण करायची अफाट ताकद. एकाच वेळी अतर्क्य शांतता आणि कुठल्यातरी दैदिप्यमान कोलाहलाची जाणीव करून देणारी ताकद!

काय करू? आता काय काय करू? सद्सद्विवेकबुद्धी, समंजसपणा,  भ्रामक कल्पना आहेत. जेत्यांनी जिंकलेल्यांवर केलेले दुर्बळ संस्कार. खरा संस्कार एकच, ताकदीचा, आणि अशी ताकद देणार हा वेग! अफाट वेग!! आता निघालोच मी, कुणालाही आवरायचा नाही असा वेग. ही ताकद, ही शक्ती, चराचराच्या असण्यानसण्याचं, अस्तित्वाचं क्षणभंगुरत्व आता माझ्या हातात आहे. हा निघालो मी, खळाळत, निनादात, सुसाटत! बरोबरीला आहेतही हजारो लाखो, माझ्यासारखीच ताकद घेऊन प्रवासाला निघालेले! आणि घेऊन जातोय बरोबर हे गडगडणारे दगड,  वाहणारी माती, चिखल. कधी ताठपणाचा माज दाखवणार टोलेजंग वृक्ष आता दयनीय होऊन वाहतायेत. सगळ्यांचीच मुक्ती घडवुन आणतोय मी.

कळून चुकलंय मला आता, की मीच आहे सर्वेसर्वा या वाहत्या जगाचा, मीच संहारकर्ता या सृष्टीचा, तांडवाचा मीच सम्राट! कोण रोखणार मला? माझ्या वाहण्याला, गतीला, आकाशातून जी सुरुवात झालीये त्याला आता ना अंत ना पार. आता फक्त  -  प्रलय!!!

खडक

 बाहेर पाऊस पडतोय. शांत, निवांत! मी उभा आहे खिडकीत, पावसापेक्षाही निवांत! माझ्याच तंद्रीत, त्या हळुवार पडणाऱ्या पावसाकडे लक्ष आहेदेखील, आणि नाहीदेखील. पाऊस रस्त्यावरच्या दिव्यात चमकतोय. देखणा,  सुंदर. रात्रीचा एक वाजलाय, की तीन वाजलेत?  किती वेळ झाला मी उभा आहे इथे, पत्ताच नाही. हातातलं घड्याळही पावसात भिजायला निघून गेलंय.  पाऊस वाढलाय आता. लक्ष देण्याइतका की दुर्लक्ष ना करता येण्याइतका, कळत नाहीये. 


मंद्रसप्तकात सुरु असलेला पावसाचा आलाप आता तारसप्तकात पोहोचलाय. तंद्री मोडून काही लक्षात यायच्या आत स्वर टिपेचा झालाय. पावसाला आता आवाजही फुटलाय आणि पायही! जमेल तिकडे, जमेल तसा धावत सुटलाय. कुठे हळू, कुठे जोरात, तिथे सहज, कुठे ठेचकाळत, धावतोय! आवाजही तसाच, जिथे सहज तिथे चुपचाप, जिथे ठेचकाळत तिथे ठणाणत. पण थांबायचं नाव नाही. 

सगळ्याच गोष्टींना एक वेग आलाय.  आजूबाजूची प्रत्येक गोष्ट वाहत चाललीये. वेळसुद्धा! मी इथे असाच उभा.  किती वेळ उभा आहे, का उभा आहे, कशासाठी उभा आहे, कुणासाठी उभा आहे, काही पत्ताच नाहीये. मध्येच मला माझं घड्याळ दिसतंय. आपले दोन्ही हात चालवत पोहतंय मस्त. वेळेचं, स्थळकाळाचं भान ना मला आहे ना त्या घड्याळाला! अचानक बरं वाटतंय, की डिजिटल घड्याळ घेतलं नाही, नाहीतर त्याला पोहता कसं आलं असतं.  सगळ्याच गोष्टी वेगात चालल्यात, मागून पुढे, डावीकडून, उजवीकडून - वाहताहेत! ना दिशांचं भान आहे ना स्वतःचं - एकच दिशा, एकच वेग, पाण्याचा!

मी आपला मध्येच उभा आहे, खडक! सगळं पाहतोय, ऐकतोय. सगळे आपल्याच तंद्रीत, धुंदीत. वाहतायेत! ती लय, तो आवाज, तो ठेका - बेधुंद व्हायला होतंय! हळूहळू हा पाऊस, हे पाणी मला विरघळवून टाकतंय. बहुधा  नववीन क्लुप्ती असावी, पावसाची! माझ्यातला ठामपणा पटला नसावा त्याला. मला असं एकाच जागी स्थिर उभं पाहून जळफळाट झाला असेल त्याचा. त्याला कुठे जमतंय एकाच जागी थांबायला. त्याच्या त्या वेगवान गर्वाला माझी ठेच लागली असेल. 

पण त्याची ताकद जाणवतेय. पूर्ण जोर लावून मला माझ्या जागेवरून हटवायच्या मागे लागलाय हा पाऊस. मला हटवतोय की विरघळून टाकतोय आतून? हळूहळू माझेच तुकडे त्या तुफान वेगात धावताना दिसायाला लागलेत मला. मीच माझ्याशीच शर्यत खेळतोय. कोणता मी पुढे जाणार, कोणता मी जिंकणार. कसली शर्यत आहे कुणास ठाऊक! आणि आता जो मागे राहिलाय, एकटाच, स्वतः:चा खडकपणा सावरून धरणारा मी, त्याचं खडकपणही विरघळून जातंय. त्याला पण धावायचंय, बेफाम, सुसाट. पण जमतच नाहीये. काहीतरी ओढून धरतंय त्याला, थांबूही देत नाहीये आणि सुटूही देत नाहीये. प्रचंड ओढाताण!

आणि एकदम हा  शेवटचा मी, सुटलोच! कसलातरी बेभान आनंद झालाय मला. गडगडत, धावत, पळत निघालोय आता - ते बाकीचे मी आहेत ना, मलाच सोडून पळालेले - त्यांना मागे टाकत! त्या पावसाचा, त्याच्या पाण्याचा, त्या वेगवान गर्वाचा चक्काचूर करत, सगळ्यात जास्त वेगात, वाहात सुटलोय मी!

'प्रवाहपतित' होण्याचं सुख एखाद्या खडकाला विचारून पहा. स्थळाचे, काळाचे, स्थैर्याचे आणि वेगाचे, पिढ्यानपिढयांचे सगळे बांध फोडून, तोडून, मोडून निघालेल्या त्या खडकाला. आकाशातून आलेली ती मुक्तीची प्रलयांकित, वलयांकित हाक ऐकण्यासाठी उभ्या देहाचे कान केलेल्या त्या खडकाला!

अजून उजाडत का नाहीये?

Friday, March 3, 2017

ताराबलं चंद्रबलं! अर्थात, प्रत्येक लग्नाच्या सुरुवातीची गोष्ट

लग्न! 
भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक, सोळा संस्कारातला सर्वात महत्वाचा संस्कार, दोन जीवांचं मिलन, वंशवृद्धीचा राजमार्ग वगैरे वगैरे. चंद्राचा चंद्रीमा, शुक्राची चांदणी, प्रवाहाचा पतितपणा, आकाशाची गहिराई, सागराची निळाई, गरुडाची झेप, सिंहाचा वाटा इत्यादी विषयांइतकाच घासलेला आणि तरीही अजिबात गुळगुळीत न झालेला विषय. जगातले सर्व पुरुष यावर भरभरून लिहू शकतात आणि सर्व स्त्रीया यावर भरभरून बोलू शकतात. कारण, या विषयावर काही उघडपणे बोलणे पुरुषांना शक्य नाही, आणि काहीच्याबाही लिहून पुरावे निर्माण करण्याचा गाढवपणा बायका करत नाहीत. एकूणच अशा या जागतिक पातळीवरील एका अतिसंवेदनशील विषयाला डिवचण्याचं धाडस या लेखणीने आज केले आहे. उद्या याच प्रमादाबद्दल हीच लेखणी बंबातदेखील जाऊ शकते याची तींस काय कल्पना? असो! नमनालाच मोजून सात घडे तेल गेले आहे.

तर, पूर्वी या लग्न नावाच्या संस्थेची स्थापना वरपिता आणि वधुपिता हे दोन संस्थापक करीत असत. आपापला बाब्या आणि बेबी यांना या संस्थेचे आजीवन सभासद बनवले जात असे. अध्यक्षस्थानी बाब्याला बसवून चिटणीस आणि खजिनदार अशा दोन्ही जिम्मेवाऱ्या बेबीवर सोपवून हे दोन्ही संस्थापक मजा बघत असत. बाकी समस्त इंटरेस्टेड मंडळी ही एखाद्या वाचनालयाच्या मेम्बरांप्रमाणे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक,  वार्षिक, नित्य आणि नैमित्यिक हजेरी लावीत. कधी विंगेतून, कधी पिटातून, कधी छतातून  एंट्र्या करणाऱ्या हौशी कलाकारांइतकाच या मंडळींचा उत्साह दांडगा असे. असे हे संस्थापक आणि मेंबर मंडळी एकत्र येऊन आपसात खलबतं करून नवऱ्यामुलाची सगळी शस्त्रं नवऱ्यामुलीकडे सुपूर्त करून त्यांना जीवनाच्या वगैरे समरात वगैरे झुंजायला वगैरे पाठवून वगैरे देत वगैरे असत. असा हा 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' पुरता उरलेला तो नवरा आणि त्याची सगळी शस्त्रं परजून सर्वशक्तीनिशी उभी ठाकलेली ती अष्टभुजा नारायणी नवरी असे दोघेजण बोहल्यापर्यंत पोहोचत. त्यानंतर होणारा सामूहिक 'सावधान' चा गजर. संपूर्ण जगाला 'अखंड सावध' राहायला सांगणारे आणि दासबोधासारखा सांसारिक कर्मयोग शिकवणारे समर्थ रामदास हे याच 'सावधान' पश्चात बोहल्यावरून गायब झाले होते, यातूनच या सावधानाची माहिती लक्षात येते. विशेष म्हणजे या 'सावधान' नंतर पुन्हा अजिबात 'विश्राम' ना होता कायम परेड करावी लागते हे कुणीही आधी सांगत नसे.

काळ बदलला, वेळ टळली, आणि विवाह नावाच्या संस्थेच्या स्थापनाप्रक्रियेत सूक्ष्म बदल घडून आले. आता यातले  भिडू लोक आधीच एकेमेकांना भेटून, बोलून, जोखून घेतात. जमलं, पटलं, झेपलं, तर दोन्ही चाकांचा सांधा जुळतो. वरपिता, वधुपिता या 'मानद' खुर्च्या आहेत, बाकी इंटरेस्टेड मंडळाची गिनती सेम आहे अजून. पूर्वी लग्न करून पाहत असत, आता पाहून लग्न करतात एव्हढाच काय तो फरक. याउपर या संस्थेच्या कारभारात काहीही फरक नाही.

विवाहप्रसंगी मंगल सनई वाजायला लागते, 'सावधान'चे गजर टिपेला पोहोचू लागतात, अक्षता डोक्यावर पडतात. काही सव्यसाची मित्रांमुळे त्याच अक्षता डोळ्यात, कानात, नाकात, झब्ब्यात आणि जाकिटाच्या खिश्यातदेखील पडतात, त्याला इलाज नाही. आमच्या मातु:श्री म्हणतात त्याप्रमाणे त्या लग्नकलशातल्या पाण्यात खरंच काहीतरी जादू असावी. ते पाणी डोक्यावर पडलं कि नवरदेवातला सगळा दैवीपणा ओसरून त्याचा अक्षरशः नवरा होतो, आणि त्या अंतरपाटापलीकडल्या अष्टभुजेची ताकद अमाप वाढते.

लग्नाच्या मंगलाष्टका जर नीट पहिल्या तर त्यातलं व्यवहारी सावधपण आणि छुपे संदेश जिज्ञासूंना दिसून येतील. सुरुवात होते ती गणेशवंदनेने! 'स्वस्तिश्रि गणनायकं गजमुखं' म्हणत आद्यदेवांना बोलावून घेतात. ते उभे नवऱ्यामुलाकडून. त्यानंतर गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रतनया, चर्मण्वती, वेदिका, क्षिप्रा, वेदवती, महासुरनदी, गंडकी, पूर्णा या मिळून साऱ्याजणी नवऱ्यामुलीकडून. इथेच नारीशक्तीची वाढलेली संख्या आणि ताकद चाणाक्ष नजरेला दिसून येते.  मग कुण्या रुक्मि राजाच्या रुक्मिणीनामे सुविद्य कन्येस श्रीकृष्ण नामक अनुरूप जोडीदार कसा मिळाला याची सुरस आणि रम्य कथा रंगवून सांगितली जाते. इथेसुद्धा जगातले सगळे लग्न झालेले पौराणिक, ऐतिहासिक, वास्तविक, काल्पनिक नवरे सोडून फक्त 'करी शस्त्रं ना धरीं' कृष्णाचंच उदाहरण पुढे केलं जातं हे (त्याच) चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.

यानंतरच्या स्टेशनवर आत्या, मावशी, मामी, अशा एकापेक्षा एक गायिकांची चढाओढीने जुगलबंदी होते. त्या मैफिलीतून जाग येईपर्यंत गाडी पोहोचते ती 'तदेव लग्नं, सुदिनं तदेव' पाशी. हे फार्फार महत्वाचं आहे. "आज तुझे लग्न आहे मित्रा, याहून उच्च सुदिन तुझिया आयुष्यास शक्य नाही. तरी वत्सा, तुजप्रत कल्याण असो" असा संदेश स्वतः आद्यदेव नवरदेवाच्या कानात सांगून त्याचा उत्साह वाढवताना (पुन्हा त्याच) जाणकार नजरेने पहिले आहेत. आणि "आज तुझे लग्न आहे देवी, यापुढील सगळे दिवस तुझेच सुदिन, आजपासून सुरुवात" हे सगळ्या सरिता आपल्या नवरीस सांगताना (तेच) दिव्यचक्षु बघत असल्याचा दिव्य पुरावा आहे.

यापुढील ओळी या फक्त नवरदेवास उद्देशून असतात. 'ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव', म्हणजे हे नवऱ्या, तुझे सगळे ताराबळ, चंद्रबळ, विद्याबळ, दैवबळ वापरलेस तरीदेखील या अष्टभुजेपुढे तुझी तारांबळच होणार आहे. तरी तू त्या लक्ष्मीपती विष्णूला पर्यायाने कृष्णाला शरण जा. त्याने सांगितलेला 'करी शस्त्रं ना धरीं , सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' हा बाणा आत्मसात कर. बाकी संसारसागरातून तुझी नैय्या पार नेण्यास तुझी अष्टभुजा, जी सध्या तुझ्यासमोर सात्विक उभी आहे, ती सदैव तुझ्या पाठीशी राहो. इतका सगळा उपदेश स्वतः आद्यदेव नवरदेवास करतात आणि त्याला बायकोहाती सोपवून पुढल्या लग्नास प्रस्थान करतात. आद्यदेवांचं काम लग्नसराईत फार वाढतं, त्याला ते तरी काय करणार. ऑफिसात बॉस आणि घरी दोन-दोन बायका यात त्यांचादेखील पिट्टा पडतो. असो.

आणि मग, एखाद्या उस्फुर्त रणभेदी गर्जनेप्रमाणे सर्व उपस्थित समुदाय एकच 'सावधान' ची ललकारी देतो. त्यामुळे नवरदेवास अचानक, तोफा होईतो खिंड लढविणारा बाजीप्रभू देशपांडा, दोन तलवारीं घेऊन पेटलेला मुरारबाजी, लाखोंच्या सैन्याला भिडलेले प्रतापराव, बुराडीच्या घाटावरचा दत्ताजी, पानपतात सूर्यमंडळ भेदून चाललेला सदाशिवरावभाऊ, असे अनेक पराक्रमी वीर पूर्वज दिसू लागतात. नसा नसा पेटून उठतात, वीरश्री खुणावू लागते, आत्ताक्षणी घोड्याला टाच मारून गनिमांचा खुर्दा करायची उर्मी  दाटून येते. पण हे तेव्हढ्यापुरतंच! दोन्ही बाजूस 'अखंड सावध' उभे ठाकलेले मामा लोक संसारनाटकाचा पडदा उघडतात, आणि नवरी मुलगी नवरदेवास 'वेलकम टू ब्याटलफिल्ड, आता जीत आपलीच असा' असा हार घालते. नवरदेवही तिला 'देवी, मी तुला शरण आलो आहे' अशा विनम्र आविर्भावात हार घालतो. अशा तऱ्हेने वैजयंतीहार घातलेला तो नरनारायण आणि त्याची ती सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी समस्त उपस्थितवर्गाला कृतकृत्य करून टाकण्यासाठी लक्ष्मी-नारायणाचा जोडा बनून सज्ज होतात.

यानंतर नव्याचे नऊ दिवस येतात, जातात. खरा संसार सुरु होतो, तो प्रत्येकाने आपापला बघावा, बायकोवर सोपवून सुखी करावा. आपली सौम्यमुद्रा अष्टभुजा नारायणी आपला संसार सुखी करतेच. तिच्याशी पंगे घेऊ नयेत अन्यथा आपला "महिषासुर होण्यास वेळ लागत नाही", असे संसार या विषयातले जाणकार सांगतात. खरे-खोटे देवाक ठाऊक.

अशाप्रकारे जाणकार आणि संशोधक यांजकडून माहीती संकलित करून जमवलेल्या या प्रास्ताविक लेखानंतर आता 'लग्नसंस्था, संस्कृती आणि आपण' हा विवेचनग्रंथ, 'कर्मयोग आणि लग्नयोग' हा संशोधनलेख उर्फ थिसीस, 'लग्न, लिव्ह-इन, ब्रह्मचर्य' ही तुलनात्मक लेखमाला, 'सतराशे विघ्नं, तरीही नकटीचं लग्न' हा विनोदीकथासंग्रह आणि 'ठोंब्याच्या लग्नाच्या बोंबा' हा दीर्घ लघुकवितासंग्रह हे सगळे प्रसिद्धीसाठी रांगेत आहेत. अधिक माहितीसाठी जाणकार आणि जिज्ञासूंनी लिहावे/भेटावे, हि णम्र वीनंति!

Friday, November 25, 2016

पहिला पगार!

कोणे एके काळी मला जेव्हा नोकरी लागली तेव्हापासून आजतागायत मी आमच्या कंपनीत पगार खातो आहे. कारण आय.टी. कंपनीमध्ये पगार ही भरपेट खाण्याची गोष्ट आहे असं समजलं जातं. अजीर्ण झालं तरी चालेल, रेचक म्हणून इन्कम टॅक्सवाले एखादा फॉर्म पाठवतात, पण पगार दर महिन्याला भरपेटच झाला पाहिजे. प्रत्येक महिना-अखेरीस आय.टी. वाले पगाराची जी वाट पाहतात ना, त्याची तुलना केवळ चातक पक्ष्याशीच होऊ शकते. जगण्याची धडपड दोघांचीही सारखीच. मिळेल ते घ्यावं आणि गप पडावं, ते नाही. यांना पाहिजे ते सगळं तुपाशी आणि तूप पण अस्सलच हवं. चातक बिचारा फक्त मृगाचा पाउस पिऊन राहतो, तोही वर्षातून एकदा येणारा. आय.टी. कंपनीतले चातक महिन्याच्या महिन्याला प्रामाणिकपणे पगार पिऊन राहतात. कारण यांना खाबुगिरी करायचा बाकी चान्सच मिळत नाही ना!

आता इतकी वर्ष झाली, प्रत्येक वर्षात किमान १२ पगार असतात तरीही पहिल्या पगाराचं अप्रूप आणि त्याची आठवण कधीच पुसली जात नाही. का? कॉलेजात असताना स्वत:वर लादून घेतलेली आर्थिक दिवाळखोरी संपल्याचा आनंद जास्त असतो, की स्वावलंबी झाल्याचा? मिळणारे पैसे हे कष्टाचे आहेत वगैरे (गैर) समज पुसले गेले नसतात म्हणून, की आयुष्य लायनीला लागलं म्हणून? कारण काही असो, पहिला पगार म्हणजे भावनांचा कल्लोळ असतो हे खरं!

पहिला पगार मिळाला त्यावेळची गोष्ट. सगळ्या 'पहिला पगार' गोष्टींसारखीच, पण दर चतुर्थीच्या शिऱ्याची चव कशी वेगळी असते, तशी जराशी निराळी! आम्ही १४ तारखेला जॉईन झालेलो, त्यामुळे महिना-अखेरीस पगार मिळायची शक्यता फारच धूसर होती. आमच्याकडे पगार हे महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी होतात. म्हणजे महिनाखेर रविवार असेल, तर शुक्रवारी पगार होतो. त्यावेळीही तशीच परिस्थिती होती. ३० तारखेला रविवार, त्यामुळे शुक्रवारी पगार होणार अशी आवई उठलेली. सगळे लोक आपापली डेबिट कार्ड  परजत ए.टी.एम. मशीन वर हल्ले करत होते, पण प्रत्येकाचं उत्तर 'शून्य' च्या वर काही जात नव्हतं! २८ तारीख झाली, २९ झाली, रविवार दिनांक ३० सुद्धा उलटून गेली. हे म्हणजे माधुरी दिक्षितच्या 'एक दो तीन' गाण्यासारखंच झालेलं. किमान ४० वेळा ए.टी.एम. मशीनचं दर्शन घेऊन आलेलो! माझे बाहेरगावाहून आलेले मैतर लोक खर्चाच्या काळजीत काळे निळे लाल पिवळे पडले, डोळ्याखाली काळी वर्तुळं आली, केस मागे मागे जाऊन टक्कल पडलं, असं काही झालं नव्हतं, पण आपल्याला शेंडी लावली बहुतेक, याचा विषाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.  त्यातून महिना संपून ४ दिवस झाले तरी पगाराचं पत्त्या नव्हता. या महिन्याचा पगार पुढच्या वेळीच मिळेल अशी अजून एक निराशाजनक आवई उठलेली! मी आणि माझे नवेकोरे सहकारी, सगळेच निराशेच्या खोल-खोल गर्तेत वगैरे! आणि अचानक-

एके दिवशी संध्याकाळी आमच्या फायनान्सच्या चित्रगुप्ताचं आगमन झालं. (यमाच्या दरबारी चित्रगुप्त सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो तसे आमचे चित्रगुप्त आमच्या पापांचा हिशोब ठेवतात आणि दर महिन्याला आमचं पाप पगारातून कापून मोकळे होतात) च्यामारी, आम्हाला तर पहिल्यांदा कळलंच नाही की हा मनुष्य कोण आणि इथे काय करतोय ते. पण आमच्यातले काही चाणाक्ष सहकारी, जे राजा मानसिंहाच्या  राज्यातून आले होते, आणि ज्यांना 'पैसे' या पदार्थाचा वास, चव, स्पर्श या सगळ्याचं ज्ञान होतं त्यांनी लगेच ओळखलं की आज चित्रगुप्त साहेब कशाला आलेत. चित्रगुप्त काही बोलायच्या आधीच टाळ्यांना सुरुवात! कमाल झाली!

मग त्यांनी सविस्तर वर्णन करून सांगितलं की कसे सगळ्यांचे पगार १५ तारखेलाच तयार होते, पण पहिल्यांदाच पगार पाठवायचा असल्याने कसा तपासून पाहावा लागला. अहो, त्याकाळी मिळणारा एवढासा चिमुकला पगार तो, त्याला तपासायला का वेळ लागावा? आणि झाला समजा १०-१५ टक्क्याचा घोळ, तरी मुद्दलात पगाराचा जीव तो केवढा, त्यामुळे होणाऱ्या गोंधळाचा आकडा असा काय विशेष असणार म्हणा? पण नाही. चित्रगुप्ताच्या अडचणींची लिस्ट संपायलाच तयार नाही. आमच्या चिमुकल्या पगाराची रक्कम त्यांना कशी हिशोब करून ठरवावी लागली, काही जण २-३ दिवस उशिरा आले होते, त्यांचा पगार फायनल करताना किती त्रास झाला आणि मग कुणाचंच  बँक अकाउंट चालू झालं नसल्याने कसे सगळे चेक लिहावे लागले आणि त्यात कसा वेळ गेला वगैरे.

आम्ही सगळे कीर्तनाला बसल्यासारखे तल्लीन. चित्रगुप्ताच्या कुठलंही वाक्य संपलं की हरिनामाचा गजर करावा तसा 'हिप हिप हुर्रे' चा गजर आणि टाळ्या. कारण त्यांचं हे सगळं पुराण चालू असताना आमच्या मनात फक्त एक 'चेक' नाचत होता! आमच्या चाणाक्ष मित्रांनी (तेच ते, राजपूत रक्ताचे, राजा मानसिंहाच्या राज्यातले) तेवढ्यात हिशोब करून पगाराची रक्कम किती असेल याचे आडाखे बांधले, पैजा लावल्या. इकडे आम्ही स्वप्नात दंग झालो, की पगार मिळाला की काय करायचं? चार दोन स्वप्नं पाहून झाली असतील नसतील, शेजारी बसलेल्या मैत्रिणीने जागं केलं तेव्हा चित्रगुप्त आमच्याच नावाचा पुकारा करत होते.साक्षात चित्रगुप्ताच्या मुखी आमचं नाव! आहाहाहा!! धन्य झालो, जीव आकाशाएवढा झाला, मनाच्या राज्यात सगळीकडे वसंत ऋतू आणि अजून काय काय! उठून धडपडत पुढे गेलो आणि त्यांच्या हातून आमचं चेक नावाचं  पारितोषिक स्वीकारलं. सर्व मित्र टाळ्या वाजवत होते, आपल्याला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकल्याचा फील आला होता. (त्यानंतर मात्र जेव्हा केव्हा 'चित्रगुप्त' बोलवतात ना, केवळ पोलीसातून कायदेशीर आमंत्रण आलंय असं वाटतं!) त्यादिवशी ऐकलेल्या टाळ्या ह्या मी आजपर्यंत ऐकलेल्या सर्वाधिक वेळ वाजलेल्या टाळ्या होत्या! साहजिक आहे हो, ४० जणांचा पगार-वाटपाचा कार्यक्रम असा काय टाळ्यांच्या गजरात आणि दणक्यात झालाय सांगू!

संध्याकाळी धनादेशाच्या उडत्या गालिच्यावर बसून तरंगत तरंगत घरी आलो. घरी येईपर्यंत कुण्णाला  काय पण सांगितला नाय! गुडूप घरी आलो आणि तीर्थरूप आणि मातोश्री यांच्या हातात चेक देऊन टाकला. ऑन द स्पॉट दिवाळी चालू झाली. कारण लौकिकार्थाने 'दिवटा' असणाऱ्या माझी गाडी ऑफीशीयली लायनीला लागली होती. मग काय, सतत काहीतरी खरेदी करून घरी आणावं असं वाटायला लागलेलं. आणि आपल्याला तर 'जे मनात येईल ते' करायची सवयच आहे. यातूनच 'नाठाळ' (लोकांतर्फे), 'मनस्वी' (मातोश्रींतर्फे), 'आडमुठा' (मित्रांतर्फे) वगैरे पदव्या मिळवल्या आहेत. मग उगाच स्वत:च्या इच्छा मारून नाव का खराब करा?? लगेच बदाबदा खर्च करून पाहिजे ते घेऊन आलो. प्रत्येक वेळी काहीही नवीन घेताना 'जग जिंकलंय' असा आनंद व्हायचा.

पण टोटल १५ दिवसांचा पगार, जसा अनपेक्षितपणे मिळाला तसाच संपून पण गेला. जाताना मणा-मणाचा आनंद मागे ठेवून गेला. तेव्हापासून आजतागायत दर महिनाअखेरीस पगार घेत आलोय, पण तो आनंद रिपीट नाही झाला. आणि आता तर काय, "आता उरलो पगारापुरता" अशी संतवृत्ती आलीये! सध्या 'पगारवाढ' नावाची सर्वसामान्य (आणि सर्वमान्य) अपेक्षा मनी बाळगून दिवस कंठणे चालू आहे.


Monday, March 12, 2012

नक्षत्रं आणि राशी

मंडळी,

नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय. यालासुद्धा कारणीभूत असणारी दिव्य मंडळी म्हणजे हे ग्रह, तारे वगैरे आकाशस्थ पार्टी.

आपापल्या दिलेल्या कक्षेत गपगुमान फिरणारी, बाकी जगाच्या खोड्या सोडा पण एकमेकांच्यादेखील वाटेला ना जाणारी, जमलंच तर अधूनमधून मानवजातीकडे पाहून भुवया उडवणारी, सूर्याभोवती फिरणारी त्याची पोरं पाहीली की ही जनता कुणाच्या राशीला लागेल, किंवा कुणाला वक्री वगैरे जाईल असं मुळी वाटतच नाही. किंबहुना, शनी आणि मंगळ ग्रह जर दुर्बीणीतून पाहीले तर त्यांच्या मूळ सौंदर्यापुढे नतमस्तक व्हावं वाटतं, त्यांच्याबद्दल उगाच पसरवलेल्या भितीपोटी नाही. शनी-मंगळ युती, सूर्य-बुधाचं एकत्र येणं, सध्या आकाशात एकत्र आलेले शुक्र आणि गुरु आणि अजून कोण कोण कुणाकुणाच्या गळ्यात गळे घालून फिरतायेत अशी सेलेस्टियल हार्मनी 'याची देही याची डोळा' एकदा पाहून बघा महाराजा; एकदम ओरिगिनल, इमिटेसन नाय!

तर, नमनालाच घडा उलटा करुन झाल्यावर आजच्या मूळ विषयाकडे वळूयात. आपण रोजच्या भाषेत वापरतो ते राशीला 'लागणे', नक्षत्रासारखे दिसणे, झगामगा मला बघा असणे, असले आणि अनेक वेगवेगळे वाक्प्रचार वापरतो, किंवा "सत्ताविसातून नऊ गेले तर खाली उरलं काय?" सारख्या बिरबलाच्या गोष्टी ऐकतो, मराठी क्यालेंडरं, ऋतू, सण साजरे करतो यात कुणाचा हात आहे सांगा पाहू?

सध्या आपण जी मराठी दिन-दर्शिका वापरतो, सध्या म्हणजे गेली हजार दोन हजार वर्षं आपण जी दिन-दर्शिका वापरतोय, त्यात १२ मराठी महिने आहेत. त्या १२ महिन्यांची नावं जर आपण जरा बारकाईने पाहीली तर आपल्या लक्षात येईल की ही नावं तर नक्षत्रांवरुन आली आहेत. उदाहरणार्थ, चित्रा नक्षत्रावारुन आलाय तो चैत्र महिना, विशाखा नक्षत्राचा वैशाख, ज्येष्ठा नक्षत्रानं नाव दिलं तो ज्येष्ठ आणि पूर्वाषाढा(पूर्वा) नक्षत्र असणारा आषाढ. असे बाराच्या बारा महिने बारा वेगवेगळ्या नक्षत्रांकडून नावं उसनी घेऊन आलेत. हे त्याचं कोष्टक :

(नक्षत्र - महिना याप्रमाणे)
चित्रा - चैत्र
विशाखा - वैशाख

ज्येष्ठा - ज्येष्ठ
पूर्वाषाढा (पूर्वा-आषाढा) - आषाढ

श्रवण - श्रावण
पूर्वा-भाद्रपदा - भाद्रपद

आश्विनी - आश्विन
कार्तिक - कृत्तिका

मृगशीर्ष - मार्गशीर्ष
पुष्य - पौष

मघा - माघ
पूर्वा-फाल्गुनी - फाल्गुन

आपल्याला माहीती असलेल्या नक्षत्रांपैकी ही १२ नक्षत्रं. बाकी १५ को क्या हुएला है? तीसुद्धा आहेत. मग तुम्ही नक्की विचारणार, की याच १२ नक्षत्रांचं काय कौतुक? अर्थात, याला कारणीभूत आहे तो चंद्र. येस्सार, हाच तो चंद्र. जो पृथ्वीभोवती फिरतो, अधूनमधून ग्रहणं दाखवतो, बाकी महिन्याकाठी आपल्या कलांचं प्रदर्शन मांडून बसतो, रोम्यांटीक शीन करुन प्रेमात पडलेल्यांना जळवतो, पिच्चरमधून गाणीगिणी करायला लावतो वगैरे वगैरे.

हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे चंद्राच्यादेखील आपसूकच सूर्याभोवती फेर्‍या होतात. पण हे सूर्याभोवती फिरताना चंद्राची थोडी धावपळच होते. म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरताना समजा, एका बिंदूपासून सुरुवात करुन गोल फेरी मारून परत तिथेच आला, तर पृथ्वी तर सूर्याभोवती फिरतफिरत पुढे गेलीये ना. मग याला अजून जास्त अंतर काटून तो सापेक्ष बिंदू गाठावा लागतो. आता किती पण पळापळ केली तरी साला लेट झाला तो झालाच. असा चंद्र आपल्या आकाशात रोज थोडाथोडा उशिरा उगवतो. असं करत करत तो दर महिन्याला भलत्याच तारखा-समूहात उगवतो. म्हणजे तो उगवतो त्यावेळेला त्याच्या बॅकग्राऊंडला जो कोण तारका-समूह असेल तो. आता अशा प्रत्येक तारका-समूहाचं आपल्याला जे कौतुक, की आपण आपल्या महिन्यांना त्यांची नावं देऊन टाकली.

आकाशात अनेक तारकासमूह आहेत. म्हणजे बघा, एकदम जगन्मान्य असे ८८ तारखा-समूह आहेत. अधिक जनरल क्याटलॉगप्रमाणे तर विचारुच नका. त्यात भर म्हणजे आपण दर रात्री वेगवेगळे तारे "ये तारा, वो तारा, हर तारा" प्रमाणे जोडत वाटेल ते आकार तयार करु शकतो. आता या इतक्या तारका-समूहातून बरोबर सत्तावीसच कसे काय बरं शोधून काढले असतील? अभी इसकू भी ये चंद्रच कारणीभूत हय. आणि याच्या जोडीला बाकीचे ग्रह आणि सूर्य. हे सगळे आकाशातून एका रांगेत गेल्यासारखे जातात. काय चार-सहा डिग्री इकडे-तिकडे. आकाशातल्या या काल्पनिक रेषेवर जितके तारका-समूह आहेत ते या सत्तावीस भागात विभागून टाकले आणि झाली सत्तावीस नक्षत्रं. या सत्ताविसांना बारा लिफाफ्यात बंद केलं ते बारा लिफाफे म्हणजे आपल्या राशी.

याच बारा राशी आणि त्यातलि ही सत्तावीस नक्षत्रं यांची आणि तुमची गाठभेट करुन देण्यासाठी हा लेखनप्रपंच. मला लिहिण्याची मजा आहेच, तुम्हाला वाचायची येत असेल तर उत्तमच.
चार-पाच लेखात आपण या सगळ्यांना भेटून येऊ. लिखाण जर फारच टेक्निकल होत असेल, समजायला अवघड वगैरे वाटेल तेव्हा जरुर सांगणे.

क्रमश:

Wednesday, October 12, 2011

मडकं


हल्ली माझ्या कवितांना 'प्रस्तावना दे' अश्या सूचना येत आहेत म्हणून हे थोडसं!
प्रस्तावना अशी आहे की, मला कुंभारकाम किंवा पॉटरी ह्या विषयावर कविता करायची होती. माझ्या मते ती एक सुंदर कला आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि रूपाचे कुंभ बनवले जातात, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. काही प्रकारच्या मडक्यांकडे कलाविष्कार म्हणून पाहिलं जातं आणि रूनीची पॉटरी ह्या कलाप्रकारात येते !
हा झाला एक दृष्टीकोन. वेगळ्या चष्म्यातून पाहिलं तर हीच मडकी म्हणजे आपण सगळे आहोत असं वाटतं. ही कविता त्याच विषयावर आहे. कुंभारवाड्यातल्या प्रत्येक मडक्याला आकार, रंग रूप असतं आणि त्यावरूनच त्याची किंमत ठरते, तसंच प्रत्येक माणसाची किंमत ही त्याच्याकडे असणर्‍या आकार रंग आणि रूपावरून नकळत केली जाते. एकमेकांना वाखाणण्यात आपण फक्त एकमेकांचं प्रथमदर्शनी अस्तित्व लक्षात घेतो. शिवाय ह्या मडक्यांमधले फरक म्हणजे ते कोणत्या कुंभारानं बनवलं आहे वगैरे वगैरे.....एकूण काय, माणसाच्या मनातच 'चांगला-वाईट', 'सुंदर-कुरूप', 'स्वस्त-महाग', 'काळा-गोरा', 'दैवी-पाशवी' असा भेदभाव अंतर्भूत असतो, त्यात विकत घेतल्या जाणार्‍या मडक्याचा काही दोश नसतो.
 ही कविता म्हणजे एका कुंभाराचं मनोगत आहे, असा कुंभार ज्याला त्याची  सगळी मडकी सारखीच वाटतात!


मडकं 





कुंभारवाडा तुझा मी
मातीत सांडला की
माती जरी ही एक
कुंभ ते बघ वेगळे की

बुटका कुणी करंटा
ऊत्तुंग तो शैल कुंभ
आकार पद्माचा असे कुणा
काठोकाठ भरला त्यात दंभ

माठास माठ माझ्या
अजिबात तू म्हणू नको
गारवा देतो तुला जो
चकार शब्द तू काढू नको

माध्यान्ही गडूमध्ये त्या
कोण तो चाखतो दही रे
रात्रीस बोल तू हळू अन
मी त्यातच मद्य ओततो रे

नक्षी सुरेख आहे अन
अप्सरा नाचती इथे त्या
देवास कोरले कधी अन
दैत्यासही आसरा मिळे त्या

कुंभात येत आहे
आवाज त्या धन्याचा
रंगात येत आहे
हा सामना खिशा-खिशांचा

दृष्टीत सर्व आहे
मडक्यांस जाण नाही
भेदात सर्व आहे
माणसांत जान नाही

Thursday, September 29, 2011

पूर्वीसारखी झोप

थिएटरमधे पाऊल टाकल्या टाकल्या सिनेमा सुरु व्हावा,
तसं बिछान्यात पडल्या पडल्या झोप लागून मी स्वप्नही पाहू लागायचो!
तेव्हाची स्वप्नं निरागस होती
आता स्वप्नं पाडावी लागतात
पण ठरवून पाडलेली स्वप्नं स्पष्टपणे दिसत नाहीत
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

दुधाचे दात तर केव्हाच गेलेत
त्यानंतर कॉम्प्लानचे दातही येऊन गेले
आता चहाच्या दातांनी खळखळून हसू फुटत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप येत नाही.

निळ्या निळ्या फेसबुकने प्रत्येकाशी जोडला गेलोय
प्रत्येकच जवळच्याशी कुठेतरी तोडला गेलोय
कुणाची जगणी कुणावाचून अडलीयत?
देवाला वाहिलेली फुलं निर्माल्य होऊन तिथेच सडलीयत
लोकांची आयुष्य त्या wall वर उघडी पडलीयत
झोपताना कुणी आता तेल लावत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

लहानपणी पत्त्यांचा बंगला करायचो
जरा वारा आला, की पुन्हा सुरु करायचो
आता अपयश काही पचवता येत नाही
त्यामुळे मीही मग यशाची गाडी सेकंड गिअरपुढे नेत नाही
बँक बॅलन्स वाढतोय, पण आयुष्य मात्र भरत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

स्वप्नांचा बादशाह भविष्यकाळात जगतोय
विचारांचा गणिती भूतकाळातून शिकतोय
वर्तमानातल्या क्षणात क्षणैक सुख शोधतोय
कर्माची फळं वर्मावर भोगतोय
हातावर छडी मिळूनसुद्धा आता वागणं बदलत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही...

Thursday, August 18, 2011

धिक्कार हो!


अनेक दिवस आणि महिन्यांनी कशीबशी  ही एक कविता सुचते हो! हल्ली लिहिणं फार far away झालंय! पाचशे ओळी एका वेळी मनात नाचत असतात पण त्याच वेळी grocery आणायला जावं लागतं, वातावरण नीट रहावं म्हणून काही बोलून दाखवावं लागतं...इत्यादि इत्यादि....आपल्याला सगळ्यांना 'एक खिडकी योजना' आवडते ना, तर आपलं आयुष्यही तसंच झालं आहे असं वाटतं..आपण सगळे एक silent obedient consent देऊन बसलो आहोत आणि कुणी कुणाच्या फारसं वाटेला न जाता, फार प्रश्न न विचारता आपलं जे काही असेल ते पुढे चालू ठेवत आहोत......खूप मानवशास्त्रज्ञांच्या मते १९५० नंतरचा काळ हा संपूर्ण पृथ्वीवरच्या आत्तापर्यंतच्या मानवी कालखंडातला 'सगळ्यात शांतततापूर्ण काळ' आहे...आणि 'शांतीत क्रांती' म्हणजे चोरून वडे खाण्यासारखं आहे. बाहेरून दिसणार्‍या शांततेतही खूप गदारोळ आहे. हे झालं बाहेरचं... माझ्या स्वतःत पाहिलं तर आपण कुठे चाललो आहे ह्याचं भान नसलेली व्यक्ती आणि क्रियाहीनता दिसते. तर काही नाही, तर फार न लिहीता ही नवीन कविता...

धिक्कार हो!
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
भिकार ते दिवाळीतले फटाके
जे ऊजळती राहून तुझ्या संगती
भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू
लेखणी सुतकी रडू लागली
वासना तुझ्या विनोदी झुरळ ते
वहाणही कच खाऊ लागली
जोहार हे जगणे तुझे अन
न मागताच तू मुंडके दिले
सशाचे फुकाचे हृदय तुझे अन
ढगाने मदाने हसूं पाहिले
पाटच्या पाण्यातसुद्धा
रंग तुजला दिसला खूनाचा
वारही तूच केलेस अन
खर्चही मागशी आता वेदनांचा
प्रेम जे केलेस तेही
चोरट्यांना भरपूर दिसले
मद्य जे प्यालेस तेही
शंभरांना आधीच प्याले
प्रार्थना जशी तुझी ती
भज्यांवरची माशीच की
कंटाळूनी तो हाकली देवही
शिळे लपविण्या त्यासही यत्न की
अंगारे धुपारे दुपारी सुपारी
फोटोतही दिवा तूच लावला
विजांच्या कडाक्यातही त्या
अंधारही तूच की कमावला
का उगाच्या फुशारक्या अन
काय तू दिलेस ह्या धरेला
का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा
ग्रहण जे लागले तुझ्या डोळा
सावकारी हा रथ निघाला
तू बैलजोडी ही कोडगी
आसूडांचा पाऊस पडला
का साहसी सर्व हे, फोड की
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
तू एक पणती मिणमिणती
अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन
का दाबशी घशात स्वतःच्या माती ?

Friday, August 12, 2011

राजसा निजलास का रे..?

चौथीला स्कॉलरशिपला बसवणार आहात का मुलाला? ५ वी पासून आम्ही ह्याला वेगळ्या शाळेत घालणार आहोत. जरा लांब आहे ती. पण चांगली आहे. आई ७ वीची स्कॉलरशिप अवघड असते का ग? नाही बाळ. तू हुशार आहेस ना? तुला सोप्पी जाईल. ८ वीला परांजपे सरांचा क्लास लावायचाय अहो ह्याला! आता रोज इतक्या लांब सायकल मारत जाणार का हा? जाऊ देत ग, त्याचे सगळे मित्र तिथेच जाणार आहेत म्हणतोय ना..नववी ही दहावीपेक्षा अवघड असते बरं.. आता स्पर्धा काय फक्त शाळेतल्याच मुलांशी नाही.. बोर्डात आलं की आयुष्याची दिशाच बदलते... आर्ट्स साईडला पुढे काय असतं? काहीच नसतं! अरे तू हुशार आहेस ना? हुशार मुलं Science च घेतात. ११ वीत timepass करून career चा बट्ट्याबोळ करून घेतलेल्या मुलांची भरपूर उदाहरणं आहेत.. हे बघ. नीट ऐक. हे वय पाय घसरायचं असतं. या वयात प्रेमात वगैरे पडू नकोस. त्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय. या वयात मुलांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे.. हेच तर घडायचे दिवस असतात.. १२ वी बोर्ड आणि दहावी बोर्ड यात जमीन अस्मानाचा फरक आहे... अभिनंदन! बोल. मग काय ठरवलंयस? Engineering का Medical?... मी..? माझं ठरत नाहीये.. कळत नाहीये.. तुला Physics आवडतं का Biology? काहीच नाही.. बरं, मग तुला Maths आवडतं का Bio? Umm.. Maths. म्हणजे Engineering... ए माझं ठरलं रे. Engineering. मी लहानपणीच ठरवलं होतं. मला Computer Engineer व्हायचंय म्हणून. Computer का?.. मला लहानपणापासून Computer ची आवड आहे. माझ्या बाबांचा आहे ना आमच्या घरी. आणि मी आता सुट्टीत एक course पण करणार आहे. आणि सध्या भयंकर scope आहे अरे. माझ्या चुलत भावाला तर ३ कंपन्यांनी offer दिली होती.. MS करावं, MBA करावं की MTech? GRE चे words पाठ झाले का? कुठे कुठे apply करतोयस? मी त्या बँकेचं लोन घेणार आहे. Interest rate सगळ्यात कमी आहे. इकडची education system कसली चांगली आहे ना? Job मिळाला का रे? खूप apply केलंय.. मला आश्चर्य वाटतं की अमेरिकेतही ओळखीने नोकऱ्या मिळतात. आता कमावतोयस तर मार एकदा आमच्या west cost ला ट्रीप! हा..काका काय म्हणताय? काय अमेरिकन..तुम्ही आता तिकडचेच झालात की.. इकडे यायचा विचार आहे की आता तिकडेच..? नाही नाही. असं कसं. येणार ना भारतात.. Frankly speaking, all I am looking for is the results. That's the bottom line. Come on..You know you are intelligent. You are smart. All you have to do is to put little extra bit of efforts.. You are young. You should be more efficient than me!..काय म्हणतेस आई? अरे किती दिवसांनी बोलतोयस..busy असतोस का? बर मी काय म्हणते, आपल्याला तुझ्या लग्नाचं बघायला हवं आता. तू काही ठरवलंयस का तिकडे? नाही आई.. नक्की नाही? नाही. म्हणजे अशी कोणी मिळालीच नाही. ठीक आहे मग आम्ही बघायला लागतो. तुझी काय स्वप्नं आहेत? मला काही वर्ष job करून भारतात यायचंच. Great! आणि तुझी? मलाही काही वर्षे अमेरिकेत राहायला आवडेल. Independent. नंतर सासरच्या लोकांबरोबर राहायचं असतंच.. तुम्ही दोघेही आता तिशीचे झालायत.. तुम्ही family planning करताय की नाही..? हे बघ, योग्य वेळेत सगळं झालं पाहिजे.. हो आई..एक heavy प्रोजेक्ट चालू आहे..promotion चे chances आहेत.. मग आम्ही...



आज मला इतक्या सकाळी का जाग आलीय? किती वाजलेत? ४?! सूर्योदयापूर्वी बाहेर कसं असतं बघून तरी येऊ..बोचरी थंडी आहे..काय सुंदर दिसतीय बाग..धुक्यात. एक मिनिट! माझ्या घरामागे अशी बाग नाहीये.. हे तर माझं आजोळ आहे. मी स्वप्नात आहे का? झाडं अजून झोपेत आहेत.. पानापानातून झोप ओघळतीय खाली.. ह्या कळ्या तर आज उमलतील.. त्यांच्या आयुष्याचा पाहिला दिवस!.. हा प्रेमळ गारवा फक्त पहाटेच पाडतो का? कसे सगळे शांत झोपलेत.. जागा आहे तो फक्त मी आणि ही थंडी. म्हणजे कोणीतरी आहे माझ्या सोबतीला.. मी चप्पल काढावी.. हा... पायरीची फरशी कसली गार पडलीय... इथंच उभं राहावं. हा पायाखालचा गारवा कधी जाऊच नये.. अहाहा.. जग थांबलय असंच वाटतंय. at least वेळ खूप हळू पुढे सरकतीय.. आईनस्टाईन चा काहीतरी प्रमेय आहे ना यावर? आज पहिल्यांदा असं झालंय की मी सोडून बाकी सगळे सजीव झोपलेत. अगदी झाडंसुद्धा.. ती लाडकी मोगऱ्याची फुलंसुद्धा.. त्यामुळेच मला इतकं शांत वाटतंय.. सजीवांचासुद्धा गलका होतो.. मेंदू न चुकता अगदी रोज ठणकतो.. आणि आयुष्यात आपण रोज गुंतत जातो.. समोरची व्यक्ती कोणतीही असू देत.. आई..बायको..Boss..मित्र..काका..मामा.. किंवा आपल्याला ज्याचा सगळ्यात जास्त राग येतो असा तो... मी शेजारी नाही म्हटल्यावर हिला जाग तर आली नसेल..? आणि ती आपल्या मागे उभी तर नसेल..? नाहीये.. मला अजून थोडयावेळ एकांत हवाय.. हे स्वप्न असेल तरीही..please मला कोणी स्वप्नातून उठवू नका.. हा आलाच बघ सूर्य. ए अरे..कशाला पाडतोयस किरणं तुझी? बघ उठायला लागले सगळे.. चिमण्या ओरडायला लागल्या.. झाडं जागी होतायत.. नको ना... त्या समोरच्या मोगऱ्याचा देखील मला राग येतोय आता.. म्हणजे मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलंच नाही का?... मी जातो आत.. दिवस उजाडायच्या आत मला थोडा वेळ झोपायचंय.. परत तेच सगळं सुरु व्हायच्या आत मला थोडावेळ झोपायचंय... नेमकी आत्ताच बाथरूमला लागायची होती..?

झोपेत सगळा गुंता सुटत असतो.पुन्हा गुंता होण्यासाठी..

Wednesday, February 23, 2011

चरित्र-मंथन


चरित्र-मंथन

खूप गोंधळ चालू आहे सध्या...खासगी आयुष्यातल्या गोष्टी आणि बाहेरच्या गोष्टी, दोन्ही तेवढ्याच तीव्रतेने जाणवत आहेत.....एकीकडे वरवरून दिसणाऱ्या सोयी पण आतून होणारा मनस्ताप , तर दुसरीकडून काहीच न मिळाल्यामुळे 'सगळाच आनंद'(उपरोधिक) ह्यांमुळे मनाचा दाह होतो आहे असं वाटतं. शिवाय, नको असलेलं आयुष्याचं वळण आणि त्यानुसार येणाऱ्या काळज्या-तक्रारी-जबाबदाऱ्या ह्यांच्यामुळे वैयक्तिक योजनांवर पाणी फिरल्यासारखं वाटत आहे.....अगदी ५-६ वर्षांपूर्वी वेगवान वाटणारया आयुष्याचा वेग मंदावत चालला आहे आणि त्याला मीच जबाबदार आहे असं वाटायला लागलंय....कधी-कधी फ्रेडी मर्क्युरीच्या 'बोहेमियन ऱ्हापसोडी' मध्ये एक ओळ आहे ......Sometimes I wish I was never been born at all.........तसं होतं......




चरित्र-मंथन चरित्र-मंथन 
लग्नाचे ते अरुंद भोजन
भेसळ सगळे ते रक्तचंदन
डालडा तुपात तुपकट निरांजन

चरित्र-मंथन||

विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन
विचित्र संध्या प्रेमळ अंजन
व्यर्थ सारे मृत्तिका पूजन
घनांच्या कडेला शेणसारवण


निषेध सारा प्रति-वाक्ताडन 
जगण्याचे ते सहा सोपान
प्रबोधनाचे मौलिक प्रकटन
क्रियाहीन तो भेकड सैतान



निरुंद पत्तन सुख-संमार्जन
कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन
समबुद्धी सुरा-प्राशन
निर्वात घरटे दीन भजन



तुडुंब अश्रू प्रचंड विघटन
क्रंदन नव्हे गुटिका मंजन
लोभस टेंभा निखील वर्तन
अचाट मेंदू निकृष्ट संजीवन


निर्जीव प्रक्रिया पालनपोषण
दु:सह जीवन उघडे दुकान
फेकाड तंतू अरि-वृंदावन
विदीर्ण रेशीम सुधीर भलामण



विलापशोचन हे कीटक-रोदन
प्रसिद्ध-सुमंत असत्य निरुपण
नको विरुद्ध महतीचे गोडवे गायन
प्रतिभा-गुंफन हेच नवयुग गर्जन




विचारमंथन चरित्रमंथन.........


-सारंग 02/23/2011

Wednesday, February 9, 2011

आत्मविश्वास

प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!

त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं. मी लगेच फोन काढून सारंगला कॉललो आणि गफ्फा सुरु केल्या! अगदी गाडी सुटायच्या वेळी एक मुलगी शेजारी येऊन बसली.

आश्चर्य! कारण गोर्‍या ललना आपल्या शेजारी फक्त 'इतरत्र जागेचा अभाव' या एकाच कारणास्तव बसतात. वर यांचा आविर्भाव तर असा की जणू शेजारी बसून यांनी मला एकदम पवित्रच करुन टाकलाय आणि या शेजारी बसल्या नसत्या तर मी ट्रेनमधून थेट नरकातच गेलो असतो वगैरे वगैरे! आणि ही पोरगी सगळा डबा रिकामा असताना शेजारी येऊन बसली, आणि अगदी दहा वर्षांची ओळख असल्यासारखं हसली. असला ब्येक्कार धक्का बसला राव! त्या धक्क्यातच मी सारंगला सांगितलं की घरी जाऊन कॉलतो परत आणि फोन कटवला. माझा फोन बंद झाल्याचं पाहून शेजारणीच्या गप्पा चालू!

मन में आश्चर्यका एक और फटाका फुट्या! मी तर पडायचाच बाकी राहीलो होतो. कारण याआधी अशी कधी वेळच आली नव्हती, आणि या ताई तर सुंदर, गोर्‍यापान, सोनेरी केस, निळे डोळे वगैरे होत्या. आता हा नेम कसा काय चुकला याचा विचार करत मी त्या इंग्रजी हल्ल्याला माझ्या पुणेरी इंग्रजीतून जमेल तसं तोंड देऊ लागलो.

त्यानंतर पुढला पाऊण तास त्या ललनेने गावभरच्या गप्पा मारल्या. तिचं नाव 'लिझ' (बहुधा एलिझाबेथ असावं)! पेशाने एक पर्फ्युमिस्ट असलेली लिझ लंडनमधल्या एका फ्येमस पेर्फ्युम फॅक्टरीत काम करीत होती. मग गप्पा सहाजिकच अत्तर, वास वगैरे गोष्टींवर गेल्या. तिच्या कामाच्या बाबतीत ती जाम एक्सपर्ट आहे हे पुरेपूर जाणवत होतं. माझी पण उगाच बॅटींग करुन झाली होतीच, आणि पाठ केलेल्या इंग्रजी शब्दांचा साठा संपत आला होता, तेव्हढ्यात तिचं स्टेशन आलं! जायला उठली, दारापर्यंत गेली, आणि वळून हाक मारून म्हणाली, "मला जरा उतरायला मदत करतोस का?" मी अवाक! म्हणजे शेजारी बसून गप्पा वगैरे ठीक आहे, पण उतरायला मदत वगैरे जरा अतीच होतं! असल्या अनपेक्षीत सलगीच्या धक्क्यातून मी जागा होईपर्यंत तिने पर्समधून एक वॉकींग-स्टिक काढली आणि म्हणाली, "मला दिसत नाही ना, आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपची मला थोडी भितीच वाटते." आणि तिला प्लॅटफॉर्मवर उतरवल्यावर गप्पा मारल्याबद्दल ठांकू म्हणून गेली!

त्यानंतर मी अक्षरश: सुन्न बसून होतो. कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं. इतका वेळ मी ज्या मुलीशी गप्पा मारल्या -गप्पा कसल्या, पाऊण तासाची टाईमपास बॅटींग केली- तिला अजिबात दिसत नव्हतं हे कळल्यावर डोकं भणाणून गेलं माझं! तिच्या वागण्या-बोलण्यातून असं एकदाही जाणवलं नाही की तिला दृष्टीदोष आहे. सगळं इतकं सहजपणे चाललं होतं, ती चक्क माझ्याकडे पाहून बोलत वगैरे होती.

मग मला एक एक संदर्भ जाणवायला लागले, की तिच्या बोलण्यातून एकदाही काही पाहिल्याचा, रंगांचा उल्लेख आला नव्हता. सुरुवातीला माझी भाषा मराठी आहे वगैरे गप्पा झाल्यावर तिने पर्फ्युमबद्दल बोलायला सुरु केलं होतं. अर्थातच, 'वास' हे तिचं क्षेत्र होतं आनि ती त्याबद्दल भरभरुन बोलत होती! ती पर्फ्युमिस्ट आहे म्हटल्यावर मी सहाजिकच तिला 'पर्फ्युम' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने "मला चित्रपट पहायला आवडत नाहीत" असं उत्तर देऊन विषय संपवला होता. बोलताबोलता ती बर्‍याच वेळा माझ्या मागे काचेत शून्यात पाहिल्यासारखं बोलायची. या सगळ्याकडे मी खूप सहज दुर्लक्ष केलं होतं हेही आठवलं.

दृष्टीदोषासारखा प्रॉब्लेम असलेली लिझ मला अगदी सहपणे भेटली आणि सहजपणे एक ठसा ऊमटवून गेली. ती मला भेटणं हा संपूर्ण योगायोगाचा भाग होता. म्हणजे तिला मी भेटलो नसतो, दुसरा कोणीही भेटला असता तरी तिला काहीही फरक नव्हताच. असं शेवटच्या क्षणी आपल्या गप्पेकर्‍याला एकदम शॉक देणं तिच्या नकळत ती करतच होती, आणि करत राहीलसुद्धा; पण माझ्या डोक्यात हा प्रसंग इतका फिट्ट बसलाय, की ही लिझ विसरणं केवळ अशक्य!

कुठेही दृष्टीदोषाचा उल्लेखही नाही, की त्यामुळे प्रॉब्लेम होतोय वगैरे तक्रार नाही. रोजच्यारोज घरून लंडनला जा-ये करताना तिचं कुठेही अडत असेल असं नाही! स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की!

Thursday, January 6, 2011

'फेसबुक' वर आहेस का?



फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो....कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....


 सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज... .
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या  मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....
काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे  किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........
शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....
अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........


असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !

ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ? 
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून,  आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून  आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत?  कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ? 



प्रिय वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....

धन्यवाद!


Saturday, November 6, 2010

पाळलेले केस

अतिशय साधी कविता आहे, वाचून विसरून जा !


माझे पाळलेले केस कधी कधी खूपच दंगा करतात
टोपीच्या खालून मानेच्या मागून वर येऊ पहातात
आरशासमोर नीट उभे असलेले 
बॉस समोर आला की उगाच शेळपटतात 

ह्यांना उत्साही ठेवायला चांगली जेल आणा
दिवाळीमध्ये उटणं लावा मध्ये मध्ये शाम्पू चोपडा
ह्यांना हवं तेच ते करणार 
घरी भेटायला आलेल्या मित्रांना जसा
आपलाच कुत्रा चावतो तसे हे पण 
आयत्या वेळी आपलाच गळा कापणार

वय वाढत गेलं की त्यांची मिजास वाढत जाते
त्यांना काळं ठेवायला सतत मशागत करावी लागते
मग आणा की बाजारातून काळ्या मेंद्या
थापा तुमच्या डोक्यावर आणि त्यातून वर बाकीच्यांचं हे ऐका,
म्हणे मेंदीने डोकं शांत राहतं !

केसाच्या लांबीवरून माणसाची ओळख ठरते,
हवंतर केस नसलेल्यांना विचारा !
नसले तरी बेचैनी आणि असले
तर येताजाता आरशात बघून आवरा!

प्रत्येकाला आपापले केस 
नको असले तरी पाळावेच लागतात
आपण चांगलं पौष्टिक खाऊन
त्यांना चार घास द्यावेच लागतात !!

Thursday, October 14, 2010

अजून काय..

बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला
पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला
आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल
आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय!

महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात
दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात
दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील
आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय!

आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत
अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत
परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील
आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय!

एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत
आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत
दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल
आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय!

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!

इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येतील पुन्हा छत्रपती, नि टिळक, नि सावरकर की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय!

Thursday, September 9, 2010

आणि आम्ही Engineer होत आलो...

(हा लेख मी Engineering च्या शेवटच्या वर्षात, अगदी वर्ष सरत आलं असताना, 'Engineer' होऊ घातलो असताना लिहिला होता!)


Engineer काय किंवा Doctor काय, या आपल्या भारतातल्या एक प्रकारच्या जमातीच आहेत..! अशा जमाती, ज्यांच्या वाटयाला फक्त कौतुकच यायचं.. पण आता या जमातींची लोकसंख्या एवढी वाढलीय, की जमातीतल्या लोकांचा अभिमान सोडाच, पण जमातीबाहेरच्या लोकांनाही याचे अप्रूप वाटेनासं झालंय! म्हणजे पूर्वी, ‘माझा मुलगा Engineering करतोय..’ ही एकच बाब कॉलर ताठ करायला पुरेशी होती. पण आता, पुढे तो M.Tech करणार आहे, MBA करणार आहे का MS?... यावर ते सगळं अवलंबून आहे!

‘Engineer’ हा शब्दच मोठा विचित्र वाटतो मला! याची संधी सोडवायला जावं, तर Engineचं ज्ञान असणारा किंवा Engine तयार करणारा तो Engineer अशी होते. पण असं जर असेल तर Civil , Metallurgy किंवा IT मधल्या लोकांना Engineers का म्हणावं असा प्रश्न पडतो! कारण, आम्ही Mech, Prod ची लोकंच Engine बद्दल शिकत असतो (असा समज तरी आहे!). हे जरा विविध धर्मांना समान स्थान असून भारताला ‘हिंदू’स्तान म्हटल्यासारखं झालं! एकात्मता वाढावी, ‘मी एक भारतीय आहे..’ सारखं ‘मी एक Engineer आहे..’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी, या कारणाने ते ‘Engineer’ असं नाव ठेवलं गेलं असावं (इथे ‘नामकरण करणं’ असा अर्थ अपेक्षित आहे, ‘नाव ठेवणं’ नाही!). पूर्वजांचा हेतू चांगलाच असावा.. पण Mechanical पासून Production, Computer पासून IT किंवा Electronics पासून Instrumentation सारख्या branches उदयाला आल्याचे पाहता झारखंड, उत्तरांचलची आठवण आल्याखेरीज राहत नाही!

आम्ही अगदी ‘खरे’ Engineers असलो तरी आम्हा Mechanical, Production वाल्यांना तरी ४ वर्षात Engine ची ओळख कुठे होते सगळी! एका Viva ला आम्हाला विचारलं होतं, ‘4-Stroke, Single Cylinder Engine ला Rocker Arm किती असतात?’ आता ‘Rocker Arm’ हा शब्द मी कधी जन्माच्या कर्मात ऐकला नव्हता! मग विचार केला की उत्तर तयार करूयात! ‘उत्तरं येत नसतील तरी ती तयार करता आली पाहिजेत!’ हे प्रत्येक Engineer न शिकवताच शिकलेला असतो! असा विचार करून मी Engine डोळ्यासमोर आणलं. तरी मला कुठे ते Rocker Arms बघितल्यासारखे वाटत नव्हते. त्या ऐवजी तो WWF चा ‘Rock’ आणि त्याचा तो पिळदार दंडच ‘Rocker Arm’ म्हटल्यावर डोळ्यासमोर यायला लागला! आणि मी तसाच मक्खासारखा चेहेरा करून बसलो..! खरंतर Engineering Viva म्हणजे प्रत्येक Engineer च्या आयुष्यातला एक रोमहर्षक अनुभव! त्या २०-२५ मिनटात एका वेगळ्याच विश्वाची सैर घडू येते! जणू एक नाटकंच चालू असतं! त्या नाटकात External Examiner इनिस्पेक्टर ची भूमिका (इन्स्पेक्टर नाही!), Internal Examiner पांडू हवालदाराची आणि विद्यार्थी आरोपीची भूमिका करत असतो! त्या पांडू हवालदाराला आनंद झालेलं असतो की आपण आरोपीला पकडून साहेबांसमोर उभं केलंय.. इनिसपेक्टर त्याला खोदून खोदून प्रश्न विचारात असतो आणि आरोपी मान खाली घालून त्याचे सगळे आरोप कबुल करत असतो. शेवटी ‘मला काहीही येत नाही, मी बिनडोक आहे!’ असं कबुल केल्यावर इनिसपेक्टर आणि पांडू हसतात आणि मगच त्या आरोपीची सुटका होते! पण मुलगी जेव्हा आरोपी असते, तेव्हा चित्र अगदी वेगळं असतं! ती गोड बोलून अशी काही जादू करते की इनिसपेक्टर आणि पांडू त्यांचे dialogues विसरतात आणि तिला पोतंभर मार्क देऊन टाकतात! आपल्याला शेंडी लावली गेलीय हे त्या बिचार्यांच्या ध्यानीही नसतं...! मुलींना असे आरामात मार्क मिळतात आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो, याची माझ्या एका मित्राला एवढी चीड होती की एक दिवस मुलीच्या वेशात viva ला जायचं, असं त्याने ठरवलं होतं! आमच्याकडे viva घ्यायची एक विशिष्ठ पद्धत आहे. एका वेळी तिघांना बसवतात. एकच प्रश्न एका पाठोपाठ एक असा तिघांना विचारला जातो. अशात जर कोणी तिसरा असेल, तर त्याच्यासारखा बिचारा तोच! आधीच्या दोघांनी एकाच प्रश्नाची दोन संपूर्ण वेगळी उत्तरे दिलेली असतात आणि या बिचाऱ्या तिसऱ्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटत असतात..! अशावेळी External Examiner पटकन कृष्णाच्या भूमिकेत शिरतो आणि, “तुला माझं लक्षावधी सैन्य हवंय का मी स्वतः!” असं विचारून त्या बिचाऱ्या तिसऱ्याची अवस्था दुर्योधानासारखी करून टाकतो! त्यामुळे ‘जग’ ही रंगभूमी आहे की नाही ठाऊक नाही, पण Engineering आणि मुख्यत्वे ‘Engineering Viva’ ही नक्की एक रंगभूमी आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय आता!

‘Submissions’ हा असाच एक अजब प्रकार! नुसतं हात तुटेपर्यंत लिहायचं. इकडचं तिकडे उतरवायचं आणि Journals पूर्ण करायची ही त्याची थोडक्यात व्याख्या! पण मग हे असं का करायचं असतं याचं उत्तर कधीच कोणाकडे नसतं. Syllabus मधे सांगितलंय, त्यामुळे पास व्हायचं असेल तर ते करायचं, एवढयाच विचाराने प्रत्येक वर्षी पोथ्या भरवल्या जातात. ह्यातून आणि काहीच मिळत नसतं. कृष्णाने गीतेत म्हटलेच आहे, “कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका.” आणि आम्ही सगळे Engineers तेव्हा गीता जगत असतो. गेली ४ वर्षे मीसुद्धा नुसता इकडचं तिकडे उतरवतोय.. त्या दिनानाथाची गीता जगतोय..!

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला एक दिवस खूप गंभीर प्रश्न पडला होता, की ‘आपण Engineer आहोत का Technical कारकून?!’ मला खात्री आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक होतकरू Engineerला एकदातरी पडला असणार! पण image आणि ego जपायचा म्हणून प्रत्येकच जण हा टोचणारा काटा हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून अस्वस्थता अनुभवत असतो.. हे एकमेकांना कधीच सांगितलं जात नाही. दोन Engineers मधलं हे mutual understanding असतं..!

असंच एक न उलगडलेलं कोडं म्हणजे Engineering चे Professors! ‘तुम्ही एकवेळ काहीही शिकवलं नाहीत तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे!’ असंच त्यांच्या मनावर जणू बिंबवलं असतं! कदाचित ‘Engineering हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. पदोपदी नरकयातना भोगाव्याच लागतात, तरच सिद्धी प्राप्त होते!’ हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो! बाहेर हा माणूस अगदी तुमच्या आमच्यासारखाच असतो. पण कॉलेजमधे आल्यावर तो अचानक बदलून जातो! बाहेर रस्त्यात कधी कुठल्या शिक्षकाने आपल्याकडे बघून मंद स्मित केले (Smile दिली!), तर, अनेकवेळा आपल्या sheets वर ‘Redo’ शेरा मारणारा, खंडीभर assignments देणारा, submissions साठी शेवटपर्यंत छळ छळ छळणारा, खुन्नस म्हणून पेपर अवघड काढणारा आणि viva च्या वेळेस External ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत की हळूच खुनशी हसणारा मनुष्य हाच का असा प्रश्न पडतो..! अशाच एका ‘हिटलर’ professorने रस्त्यात आपणहून दिलेली ओळख बघून मला ही नक्की ‘राम और श्याम’ किंवा ‘कुंभ के मेले मे बिछडे हुए भाई’ ची case आहे असं वाटलं होतं!

यानंतर ज्याची प्रत्येक जण ४ वर्षे आतुरतेने वाट पाहत असतो असा तो Engineers च्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उजाडतो.. दिवस असतो ‘placements’ चा..! सगळीकडे एकच लगीनघाई सुरु असते! असंख्य काका, मामा आणि ‘family friends’ कडे चौकश्या करून झालेल्या असतात. ‘थोडयाच वर्षात Software ची boom परत येईल..’, ‘पण Core ला काही मरण नाही यार..!’, ‘TCS मधे २ वर्षांच्या bond पेक्षा १ वर्षाच्या bond ची Infy बरी, असं माझ्या ताईचे मिस्टर सांगत होते, जे Wipro मधे आहेत!!’ अशी वाक्ये या काळात सगळीकडे सर्रास ऐकू येतात.. त्या दिवशी सगळेजण कडक इस्त्रीच्या स्वच्छ कपडयात असतात आणि मागच्या खिशातल्या कंगव्याने सारखा भंग पाडत असतात..! मधेच polish केलेल्या बुटांवर बसलेली धूळ पाय वर करून pant च्या मागे पुसत असतात.. ‘मी किती cool आहे’ हे दाखवण्याचा प्रत्येकच जण अयशस्वी प्रयत्न करत असतो! कारण प्रत्येकालाच चिंता असते आपल्या placement ची, आपल्या भवितव्याची!

दिवस जेव्हा सरतो तेव्हा आम्हा Engineers च्या चेहेऱ्यावरून निकाल ओळखणे सोपे असते. आमच्यातले काही लोक उडया मारत असतात, काही भावूक होऊन आईशी फोनवर बोलताना दिसतात. तिची स्वप्ने पूर्ण केलेली असतात ना त्यांनी! अगदी हळवा क्षण असतो तो.. तर काही हिरमुसून होस्टेलकडे निघालेले असतात. चेहऱ्यावर निराशा असली तरी मन कणखर असतं त्याचं. ‘अजून युद्ध संपलेलं नाहीये. अजून लढायचं..’ या भावनेने ते दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागतात.. पण आठवडा-दोन आठवडयातच चित्र स्पष्ट होतं.. हळूहळू विश्वास बसायला लागतो की आपण एक नव्हे तर दोन कंपनीत place झालोय! आणि मग आनंदाला काही पारावार उरत नाही..

Placement सारख्या खूप आनंद देणाऱ्या अशाच अजूनही काही गोष्टी या माझ्या Engineering च्या आयुष्यात घडून गेल्यात.. आज सगळं आठवतंय.. College चा पहिला दिवस.. Boat Club वर तासनतास मारलेल्या गप्पा.. पावसाच्या काळात दुथडी भरून वाहणारी ती नदी.. तिच्यातलं उसळून वाहणारं पाणी नकळत मनाला उभारी देऊन जायचं.. Freshers’ Party… Technical Events.. Zest मधली केलेली मजा.. Regatta मधले श्वास रोखून ठेवणारे ते events आणि तो दिव्यांचा अद्भूत खेळ.. इच्छेनुसार साजरी होणारी दिवाळी फक्त COEPतच! होस्टेलवर पडीक असणं..खूप खूप cricket खेळणं.. 1st year मधली ट्रीप.. आणि पुढील प्रत्येक वर्षातल्या अशाच सहली.. Traditional dayला ते भान हरपून नाचणं... Valentine’s Day ला लाल नाही निदान पिवळं तरी फुल मिळावं अशी भाबडी आशा.. आणि मिळालं नाही की ‘एक दिवस खूप मोठा होईन आणि मग मनासारखी मुलगी मिळेल मला.. सगळ्यात सुंदर..’ असं पाहिलेलं स्वप्न..! Gathering मधली मजा.. Cultural Group मधे मिळालेला तो अवर्णनीय आनंद..पुरुषोत्तम..फिरोदिया..सगळाच उत्सव, सगळाच सोहळा, सगळाच जश्न...! बेंबीच्या देठापासून अगदी कानठळ्या बसेपर्यंत ओरडून ओरडून आसमंत दणाणून सोडणारा C.O.E.P चा तो गजर... गजर कसला, गर्जनाच असतात त्या! C.O.E.P रूपी सिंहिणीच्या आम्ही केलेल्या छाव्यांनी..! मिळालेल्या करंडकाकडे बघून वाटणारी ती जग्गजेते झाल्याची भावना...

आता जाताना या सगळ्या आठवणी घेऊन जाऊ. जाता जाता प्रत्येक ‘मामू’ professor ला एक ‘जादू की झप्पी’ द्यावीशी वाटतीय! (ज्या शिक्षकांना मानलं त्यांना तर दंडवतच घालीन!) आणि म्हणावसं वाटतं.. “सर, तुमच्यामुळेसुद्धा मी इतक्या छान आठवणी घेऊन जाऊ शकतोय.. तुम्ही दिलेला त्रास आज खरंच प्रेमळ वाटतोय.. धन्यवाद सर!” सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावं लागतंय ह्याचं मात्र दु:ख आहे. त्यांच्याही खूप आठवणी आहेतच.. पण ‘एवढया सगळ्या आठवणी कायमच्या राहतील माझाबरोबर?’ असा प्रश्न पडतो, अन् वाटतं 200 GB memory हवी होती आपली! त्या computer नामक निर्जीव यंत्राचा हेवा वाटायला लागतो.. आणि अचानक मनात विचार येतो, ‘200 GB ची Hard Disk माणसात implant करता येऊ शकेल? सगळ्याच आठवणी कायमच्या राहू शकतील मग आपल्याकडे.. Natural आणि Artificial Intelligence चं असं हे hybridization शक्य आहे का..?’ आणि मग माझ्यातला ‘खरा Engineer’ विचार करायला लागतो...

Saturday, July 24, 2010

सप्रेम

बऱ्याच वर्षांपूर्वी मित्रांना सोडून परदेशी येताना खास त्यांच्यासाठी काहीतरी खरडलेलं ..
---------------------------------------------------------------------------------------------------------

मावळतीचा सूर्य पाहताना मला नेहमीच अस्वस्थ वाटतं...
ती प्तरंगाची उधळण, तो केशरी आसमंत दिसायला कितीही सुंदर दिसला तरीही मनाला हुरहूर लावूनच जातो..

मनात कुठेतरी दडलेलं असतं की उद्या पुन्हा एक नवी सकाळ उगवणार आहे, पण तरीही चुकल्यासारखं वाटतंच..
एका दिवसाचा अंत झालेला असतो, आणि पुढच्या दिवसाला अजून उशीर असतो.. अशा वेळेस कुठेतरी एकाकीपणा जाणवतो..
कारण आता काही क्षण एकटेच काढायचे असतात .. त्या मिट्ट काळोखात.. !

पण अशा वेळेस, आकाशातला चंद्र माझी सोबत करतो.. चंद्र - सुशील, शांत .. काळोखाला उजळणारा .. माझ्या एकटेपणाला सोबत करणारा, सांभाळून घेणारा..
अगदी जिवलग विश्वासू मित्रासारखा..

~*~*~

हे बदलतं आयुष्य या घटनेची मला नेहमी आठवण करवतं.. इथेसुद्धा 'एका गोष्टीचा अंत आणि पुढच्या गोष्टीची सुरुवात' हे चक्र नेहमीच चालू असतं..
मग गोष्टीचा अखेर कितीही सुखद असला तरीही तो मनाला चुटका लावतोच.. पण पुन्हा पुढच्या ध्येयासाठी सुद्धा तयार व्हायचं असतंच...
अशावेळेस डगमगायला होतंच.. एकाकीपणा जाणवतोच.. खोलवर कुठेतरी..
कारण आता नाविन्याच्या अडचणींना सामोरं तर जायचं असतंच.. !

पण यावेळेस तुम्हा मित्रांची मैत्रीच मला साथ देते.. ती मैत्री माझा आत्मविश्वास जागवते.. मला एक छानसा Comfort Zone मिळवून देते..
जणू काही त्या आकाशातल्या चंद्रप्रकाशासारखीच - सुशील, शीतल, शांत.. आणि एकटेपणात सदैव माझ्या सोबतीला..

~*~*~

पण प्रेमासारखाच मैत्रीलाही विरहाचा शाप हा असतोच.. आणि ती विरहाची वेळ आता इथेही येउन ठेपली आहे..
पण हीच माझ्यासुद्धा परीक्षेचीही वेळ आहे.. इथेच मला स्वतःला सावरायचं आहे.. काहीतरी करून दाखवायचं आहे..
अनेकांच्या अनेकानेक अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.. हाती घेतलेली कामं तडीस न्यायची आहेत..

यापुढे आपण सर्व एकत्र नसलो, तरीही आपली निखळ मैत्री, आपण सर्वांनी एकत्र घालवलेले क्षण, आपल्या picnics.. अगदी सगळ्या आठवणी माझ्यासोबत निरंतर असणार आहेत..
आणि माझ्या पुढील आयुष्यात त्या मला फारच उपयोगी पडणार आहेत.. आणि याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे..

आज माझ्यात इतका आत्मविश्वास येण्यास तुम्हा सर्वांचा, आपल्या मैत्रीचा फार मोठा हातभार आहे..

हे मैत्रीचं प्रेमळ नातं मी माझ्या मनात नेहमीच जपून ठेवीन..

आजच्या या दिवशी ही एक छोटीशी सदिच्छा तुम्हा सर्वांना एक सप्रेम भेट म्हणून देत आहे..
तुम्हाला आवडेल अशी खात्री बाळगूनच..

चूकभूल द्यावी घ्यावी...

मित्र - निरंतर.
संदीप

Monday, July 19, 2010

पूर्णब्रम्ह

‘आपण कशासाठी जगतो?’ हा प्रश्न मला अधूनमधून पडायचा. अजूनही पडतो! आता हा प्रश्नच इतका भयंकर philosophical असल्यामुळे त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाहीये. ‘आयुष्यात प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, ते पूर्ण करण्यासाठी..’, ‘आपल्या माणसांसाठी’, ‘आता आलोच आहोत तर जगायचं आणि वेळ झाली की मरायचं!’ ही त्यातलीच काही उत्तरं.. पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात पटलेलं उत्तर म्हणजे ‘आपण पोटासाठी जगतो’!

‘कशासाठी-पोटासाठी’ हे वर वर बघता फारच फालतू उत्तर वाटतं, पण नीट विचार केल्यावर त्यातली गंमत दिसून येते! मानवी शरीराला काही ठराविक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाच्या ठराविक अशा गरजा असतात. बाकी सगळ्या अवयवांच्या गरजा भागवणं सोपं असतं. म्हणजे गणितं सोडवली, विचार केला, की मेंदूची गरज भागली. सुंदर गोष्टी बघितल्या की डोळ्यांची गरज भागली. श्रवणीय संगीत ऐकलं की कानांची गरज भागली. खेळलं, व्यायाम केला, की हातापायांची गरज भागली. पण पोटाचं असं नाहीये बघा. कारण पोटाची गरज भागवायला अन्न लागतं आणि ते मिळवण्यासाठी आणि शिजवण्यासाठीच तर सगळा खटाटोप असतो!

अन्न मिळवण्यासाठी पैसे कमवा, पैसे कमावण्यासाठी नोकरी करा, नोकरीसाठी शिक्षण हे लागतंच आणि एकदा का नोकरी सुरु झाली की तुमचं काम अगदी रिटायर्ड होईपर्यंत करत बसा! नाहीतर ‘पोटा-पाण्याचे’ वांधे होतात! आणि फक्त एवढंच नाही. अन्न मिळवल्यावर ते शिजवायचं असतं. त्यासाठी घरातलं स्वयंपाकघर आयुष्यभर चालू ठेवा. मग ते एकटयाला कसं झेपणार? त्यामुळे लग्न करा! चार दिवस प्रेमात घालवा. पुढची चाळीस वर्षे भांडत बसा! पण ते स्वयंपाकघर अखंड चालू राहिलं पाहिजे..कशासाठी?..अहो पोटासाठीच नाही का!

तर अशा ह्या पोटासाठी जगण्यानेच ज्यात ‘scope’ आहे तिकडे माणूस वळाला, आणि ह्या जगाचा विकास झाला! शेती, मासेमारी, घरबांधणी, व्यापार, धातू, खनिजे, तंत्रज्ञानाची सुरुवात, रस्ते, गाडी, रेल्वे, विमानं, संगणक, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग... जे विकलं जाईल ते तो तयार करत गेला. एका कुठल्या व्यवसायात गर्दी झाली की तो दुसरं काहीतरी करू लागला. नवीन शोध लावू लागला..सगळं पोटासाठी, म्हणजेच जगण्यासाठी! असं हे पोटासाठी जगणंच हे जग अखंड चालू ठेवतं आणि या जगाचा विकास करतं.

आता हे जे अन्न आपण मिळवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवतो, ते खाऊन पोट भरायच्या आधी त्याला एका ‘जीभ’ नावाच्या Quality Assurance Inspector मार्फत जायला लागतं! आणि या ‘जीभ’ नावाच्या Quality Inspectorला जे आवडतं, तेच आपल्यालाही खावंसं वाटतं आणि त्याला जे आवडत नाही, ते आपल्यालाही आवडत नाही. प्रत्येक माणसाचा तो ‘Quality Inspector’ थोडयाफार फरकाने सारखाच असतो. त्याला पुरणपोळी, बासुंदी, जिलबी.. असे गोडधोड पदार्थ, वडापाव, समोसा, भजी.. यासारखे तळलेले पदार्थ, पावभाजी, चायनिज, पंजाबी किंवा नॉनव्हेज सारखे चमचमीत पदार्थ, बर्गर, पिझ्झा सारखं फास्ट फूड किंवा आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक सारखे गोड आणि गार पदार्थ खूप आवडतात. पण दोडकं,पडवळ, तोंडलं, कारलं या सारख्या फळभाज्या आणि माठ, आंबट-चुका, करडई यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत. आणि तिथेच निसर्ग एक खेळ मांडतो!

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की जे पदार्थ आपल्याला भयंकर आवडतात, ते नेहेमीच अपायकारक, हानिकारक किंवा शरीराला वाईट का असतात? आणि जे पदार्थ आपल्याला मुळीच आवडत नाहीत ते प्रचंड पोषण करणारे, शरीराची वाढ आणि विकास करणारे का असतात? कधी आई किंवा आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणतात का की, ‘तू रोज सकाळ संध्याकाळ बासुंदी पीत जा! भरपूर तेल घालून deep fried भजी खा! रोज एक बर्गर तर खाल्लंच पाहिजेस आणि आईस्क्रीमची एखादी बादली फ्रीजरमधे ठेवत जा!’ हे सगळे आवडणारे पदार्थ आपलं वजन वाढवतात, cholesterol वाढवतात, आपल्याला डायबेटीस होऊ शकतो आणि पुढे Heart Attack ही येऊ शकतो..
या उलट पथ्य-पाणी म्हणजे, ‘दुधी भोपळ्याचा रस प्या. उकडलेली कडधान्य खा. उपासाचे पदार्थ खा. बिनसाखरेचं दूध प्या. कमी तेलाची भाजी खा. Lettuce सारखा पालापाचोळा खा!’ म्हणजे अगदी त्या ‘Quality Inspector’ला काळ्यापाण्याची शिक्षा देऊन, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करा! म्हणजे तुम्ही तंदुरुस्त व्हाल!

लहानपणी आईने मला डब्यात कधी आंबट-चुक्याची भाजी दिली, तर मी तसाच न खाता डबा संध्याकाळी घरी आणायचो. आईला उघडून दाखवायचो. हात जोडायचो आणि विचारायचो, “आई माझ्या हातून काही ‘चुका’ झाल्यात का!” पडवळ, दोडकं या सारख्या बेचव भाज्या कसं काय पोषण करू शकतात? कारलं तर म्हणे भयंकर healthy असतं! पण ते खाताना मला कुठलीतरी शिक्षा भोगत असल्याची जाणीव होत असते! हिरवा माठ, लाल माठ खाऊन बुद्धी तल्लख होऊच कशी शकते? आणि जर होते, तर ‘माठ’ नाव ते कशाला! आणि बिनसाखरेचा चहा किंवा दूध प्यायचं असेल तर वासरू होऊयात किंवा मांजराचा जन्म घेऊयात! Sprouts किंवा lettuce ‘चरायचं’ असेल तर शेळी होण्यात काय वाईट आहे!

असा हा विरोधाभासाचा खेळ निसर्ग मांडतो आणि चविष्ट अन्नाच्या मोहात पाडून रोज जिभेची लढाई लढायला लावतो! पण अशावेळी निसर्ग मला आई-वडिलांसारखा वाटतो. ‘काय चांगलं आहे, पेक्षा काय योग्य आहे’ ते करत रहा असे संस्कार जणू तो करत असतो. हा त्याने मांडलेला खेळ ही वडीलकीच्या नात्यानेच केलेली गोष्ट आहे.
आता आपण पोटासाठी जगतो, अन्न मिळवतो. पण जे अन्न खूप चविष्ट आहे ते जर मुळीच हानिकारक नसतं, उलट जर का ते पौष्टिक असतं, तर ते आपण गरजेच्या पलीकडे जाऊन खाल्लं असतं. माणसाचं खाण्याचं प्रमाण वाढलं असतं. नावडत्या भाज्यांची शेतीच केली गेली नसती. अन्नधान्य साठा मर्यादित असल्याने आणि श्रीमंत लोकांचा आहार वाढल्याने गरीब नेहेमीच उपाशी राहिले असते. लोकं, जिभेचे आनंद उपभोगत बसले असते. जगाचा विकास थांबला असता. अपरंपार प्राणिहत्या झाली असती. एक दिवस अन्नधान्य संपूनही गेलं असतं. सगळंच विस्कळीत झालं असतं..

लहानपणी आई म्हणायची, “वरण भाताचे हे शेवटचे तीन घास खाल्लेस तर चॉकलेट मिळेल..” आणि मी ते तीन घास खायचो.
पोटासाठी असणाऱ्या या जगण्यात, निसर्गाचं ऐकायचं असतं. तीन घास ‘वरण भाताचे’ खाऊनच मग एक ‘चॉकलेट’ खायचं. जगण्याची लढाई आणि स्वतःशी लढाई एवढंच तर सगळं काही असतं. म्हणूनच कदाचित अन्नाला ‘पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात..