Friday, May 21, 2010

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम, म्हणजे ते 'First and Last' प्रेम नाही म्हणायचं मला. 'प्यार जिंदगी में सिर्फ एक ही बार होता है' वगैरे असली काही भानगड नाहीये ही! हे Love, 'Love at first sight' जरी असलं तरी ती अगदीच 'First sight' आहे हो! आपण त्याला भाबडं प्रेम म्हणूयात. शाळेत होणारं प्रेम! आता शाळेत म्हणजे ८ वी , ९ वी, १० वी नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भाबडे मुळीच नसतो! आणि दुसरं म्हणजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षेची tensions वगैरे असतात. हे प्रेम, 'प्रेम कशाशी खातात' हेही कळायच्या आधीचं आहे! अगदी ३ री, ४ थीतलंच म्हणा ना...!

नवी कोरी वह्या-पुस्तकं आणि ती ठेवायला नवं कोरं दप्तर पाठीवर अडकवून आपण नवीन शालेय वर्षासाठी तयार होतो. पहिल्या दिवशी वर्ग भरतो आणि आपलं 'तिच्याकडे' लक्ष जातं. कडक इस्त्रीचा गणवेशाचा फ्रॉक, त्याला फ्रीलच्या फुगेदार बाह्या, खांद्यांपर्यंत लांब केस, डोक्यावर पांढरा hair-band, त्याला काळी क्लिप लावून त्यात ताज्या-टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अडकवलेला, डोळ्यात काजळ घातलेलं..पापण्यांची नाजूक तर नाहीच नाही, पण अतिशय स्पीडात फडफड! गौर वर्ण..दोन्ही गालांवर छानशा खळ्या..आणि तोंडाची कधीही न थांबणारी बडबड! हे असं सगळं पाहताना, आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यातल्या, हृदयाच्या पेटीतल्या, सगळ्यात आतल्या चोरकप्प्यात तिने क्षणार्धात जागा घेतली असते! आणि ती जागा एवढी लहान असते, की त्यात फक्त तीच मावू शकते. तिच्या वयाला, आडनावाला, आई-बाबांना त्यात मुळीच जागा नसते!

मराठीचा तास होतो, गणिताचा होतो, शास्त्राचा होतो, तरी अधून-मधून तिच्याकडे लक्ष जाणं काही थांबत नाही. मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसते. डब्याखाली मस्त मोठ्ठा टर्किश कापडाचा नॅपकिन अंथरते आणि त्यावर डबा ठेवून मैत्रिणींशी गप्पा मारत मारत मधेच फिदीफिदी हसत डबा खाते. आपण तिच्या गप्पा ऐकायला गेलो, तर ऐकू येतं, " अगं काय गंमत झाली..आमच्या त्या शोभाताई आहेत किनई, त्यांच्याकडे किनई, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे! ते किनई.." आणि गप्पा ऐकून झाल्यावर आपण त्या ‘किनई’ शब्दाच्या प्रेमात पडलेलो असतो! आत्तापर्यंत आयुष्यात आपण ३-४ हिंदी सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे 'हिरो', 'हिरोईन' या concepts अर्धवट का होईना कळलेल्या असतात. पण आपल्याला तिच्याकडे बघितल्यावर सिनेमातली नटी का आठवतीय, ते मात्र कळत नसतं..!

संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण घरी येतो. खांद्यावरचं दप्तराचं ओझं काढून, बूट न काढता तसेच आरशात बघायला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारे हसायचा प्रयत्न करून, कुठेतरी छोटीशी तरी खळी पडतीय का.. हे बघत असतो! आईला कळत नाही, ह्याला एकदम काय झालं! मग आपणच आईला म्हणतो, "आई, सांग ना, मी असा मोठ्ठं हसल्यावर मला इकडे उजवीकडे खळी पडते ना?" आई बघते आणि म्हणते, "नाही रे.." "आई पडते ग..छोटीशी पडते.." मग आई विचारते, " काय रे, डबा खाल्लास का? आवडला का?" "हो खाल्ला. आई पण किती भंगार नॅपकिन दिलायस! हा नको मला." "अरे, नवीन आहे तो राजा.." "नाही ग आई. भंगार आहे तो. मला तो, तसा टॉवेलसारखा पंचा असतो बघ..आणि तो पंचा कापून नॅपकिन बनवतात..तसा दे..!”

काही दिवसांनी 'मुलं फार दंगा करतात' म्हणून बाई मुलं-मुलींना शेजारी बसवायचं ठरवून उंचीप्रमाणे उभं करतात. तिकडे पोरींचा कलकलाट सुरु असतो, 'शी बाई! नको हो बाई! बाई आम्ही शांत बसतो. मुलांमुळे आम्हाला का शिक्षा..?" आणि इकडे आपण पहिल्यांदाच गणपतीबाप्पाचा धावा करत असतो! पण आपलं नशीब कुठे आलंय एवढं चांगलं..! आपल्या शेजारी दुसरीच कुठलीतरी मुलगी बसते. 'ती' वर्गातल्या कुठल्यातरी 'ढ' मुलाच्या शेजारी बसलेली असते. आणि 'देवबाप्पाला कधीपासून 'ढ' मुलं आवडायला लागली?!' असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो..

ती आपल्या शेजारी नसली म्हणून काय झालं..आपण स्वप्नांच्या नगरीत केव्हाच रममाण झालेलो असतो! 'समजा ती माझ्या शेजारी बसत असती आणि समजा लिहिताना तिच्या पेन्सिलीचं टोक तुटलं आणि तिच्याकडे दुसरी कुठलीच पेन्सिल नसली..तर मी माझ्या कंपासच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली, माझी सगळ्यात लाडकी पेन्सिल तिला लिहायला देईन!' आपणही कधी ती लाडकी पेन्सिल वापरत नसतो! जणू तिच्यासाठीच ती जपून ठेवलेली असते..संध्याकाळी मित्रांबरोबर घरी जाताना रस्त्यात चिंचा घ्यायला आपण थांबतो. एक रुपयाचा सगळ्यात मोठा आकडा आणि अजून थोड्या चिंचा विकत घेतो. 'ती आत्ता इथे असती, तर मी तिला हा सगळ्यात मोठा आकडा दिला असता!' स्वप्नांचे घोडे दौडतच असतात..

बाई तिला कधी रागावल्या की आपल्याला बाईंचाच राग येत असतो! तिला कधी हातावर पट्टी मारली की आपलाच हात खसकन मागे जातो..खेळात आपला हाउस जिंकला नाही तरी चालेल, पण तिचा जिंकावा असं मनोमनी वाटत असतं..तिला 'impress' करायला म्हणून आपण एवढा मनापासून अभ्यास करतो, की चक्क आपला पहिला नंबर येतो! आणि तेव्हा आई-बाबांना वाटतं आपल्या पोटी हिरा जन्माला आलाय..! खरं म्हणजे वार्षिक परीक्षेला थोडं वाईट वाटत असतं की आता सुट्टीत तिची भेट होणार नाही. सुट्टीत कुठेतरी रस्त्यात भेटावी असं वाटत राहतं.. पण ते तेवढ्यापुरतंच! एकदा सुट्टीतला दंगा सुरु झाला की थेट पुढच्या वर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळेसच तिची आठवण होते! आणि आता पुन्हा भेट होणार म्हणून आपण खुशीत शाळेत जातो!

पालक सभेला वाटतं, तिच्या आईने येऊन आपल्या आईशी बोलावं..म्हणावं, " तुमचा मुलगा केवढा हुशार आहे! कसा अभ्यास करतो तो..?" आणि मग त्यांच्या गप्पा व्हाव्यात..मैत्री व्हावी..पुढे लग्नाची बोलणी व्हावीत! स्वप्नांचे घोडे आता आकाशात उडत असतात..! पण दुसऱ्याच क्षणाला वाटतं, नको रे बाबा! तिची आई विचाराची, 'कसा अभ्यास करतो?' आणि आपली आई म्हणायची, " अहो, काय सांगू, करतंच नाही हा अभ्यास! सारखं मागे लागावं लागतं त्याच्या..!"

कधीतरी चुकून-माखून एकदाच ती आपल्याशी बोलते. गैरहजर राहिल्याने, बुडलेलं भरून काढायला तिला 'हुशार' मुलाची वही हवी असते..आपण ती वही तिला देताना दोनदा तपासून घेतो, की कधी घाईघाईत लिहिताना अक्षर तर खराब आलं नाहीये ना..! तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो..

पण या भाबड्या प्रेमाचं आयुष्य अगदीच कमी असतं. ते कधी संपतं, कळतही नाही. बरगड्यांच्या पिंजऱ्यातलं, हृदयाच्या पेटीतल्या त्या चोरकप्प्यातलं ते प्रेमाचं फुलपाखरू आपल्या नकळत उडून जातं..आणि ते एकटं उडत नाही, आपल्या निरागस बालपणालाही त्याच्याबरोबर घेऊन जातं..भाबडं प्रेम, ही भाबड्या वयाची शेवटची अवस्था असते. आणि हे प्रेम संपणं हीच मोठं झाल्याची पहिली खूण असते..


(हाच लेख http://sushant-thoughts.blogspot.com/ येथेही उपलब्ध)

1 comment:

  1. hey far mast ahe blog...asach ajun ajun lihi...bhari ahe..

    ReplyDelete