माहित नाही ....
आजवर अनेक कविता केल्या
त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी
मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी
शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी
तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी
प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी
No comments:
Post a Comment