Thursday, May 20, 2010

साधनेला मन उपाशी हवं !




लहानपणी आजी बरोबर पोथ्या ऐकताना कधीतरी ही ओळ ऐकली असावी. पण तेव्हा मात्र , शाळेतून घरी आल्यामुळे पोटात जो भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा की, 'आजी, मला साधना नको मला आमटी-पोळी हवी आहे'. असं ओरडतच येत असे ! एकदा दोन घास पोटात गेले की मग तेवढा अध्यायाचा शेवट होईपर्यंत थांबावं लागे. समोरच्या रिकाम्या पाटावर अदृश्य स्वरूपात असलेल्या मारुतीबाप्पाला नमस्कार करण्याच्या उत्सुकतेमुळे फक्त दम निघत असे ! तो एकदा नमस्कार झाला आणि मग आजीच्या तोंडून 'गुणी आहे हो मुलगा, रोज देवापुढे बसतो' असे शब्द ऐकले की मग बाहेर खेळायला जायला तय्यार ! मग नंतर राणी सुद्धा तसंच करायला लागली तेव्हा तिला तिच्या छोट्या छोट्या बोटांनी फुलं वाहताना पाहून खूप मजा यायची. पुढे अजून मोठा झालो आणि साधारण पाचवी-सहावीत असेन तेव्हाही हे वाक्य मधून मधून कधी प्रवचनात , कधी सज्जनगडावर गेल्यावर किंवा एखादं पुस्तक वाचताना झळकून जायचं. तोपर्यंत नुसतीच मजा वाटायची की का बरं उपाशी हवं ? समजा मी जेवण करून बसलो तर मला लिहिता वाचता येईल ? अवघड गणित सुटेल ? हो ! सुटेल की ! त्यात काय , अभ्यास तयार असेल आणि वर्गात लक्ष असेल तर जगात काहीच अवघड नव्हतं !

दहावीत मात्र आजीचे ग्रंथ, पोथ्या आणि प्रवचन यामध्ये लक्षच गेलं नाही. 'कोणीही उपाशी असू दे मी जर आत्ता मार्क मिळवले नाहीत तर नंतर मी खरंच उपाशी राहीन !' असं धमकीवजा तत्वज्ञान डोक्यात भरलं गेलं. पुढच्या वर्षी मात्र थोडं पुन्हा वाचन चालू झालं आणि मग साधना वगैरे शब्दांची पुन्हा उजळणी झाली. फक्त हेच नव्हे तर विवेकानंदांची वेदान्तावरची पुस्तकं वाचण्याएवढी मजल गेली. वेगवेगळ्या मोठ्या लोकांना भेटलो, माहिती गोळा केली पण सगळं करताना मी उपाशी नव्हतो, अधाशी होतो कदाचित ! आयुष्यात ज्या क्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे तो शंकेचा क्षण आला आणि त्यानंतर वाचन थांबलं, पण हे वाक्य सतत मनात घोळत होतं.

बौद्ध-जातककथांमध्ये एक अशी कथा आहे की ज्यात एक अतिशय हुशार शिष्य गुरूला विचारतो, की मला समाधी का लागत नाही. त्यावर गुरु काही न बोलता एका तांब्यातून फुलपात्रात पाणी ओतू लागतो. पाणी ओसंडून वाहायला लागतं तरीही गुरु न थांबता ओततच असतो. खूप वेळानंतर म्हणतो 'तुझं मन हे ह्या फुलपात्राप्रमाणे काठोकाठ भरलं आहे. तू कितीही श्रम केलेस तरी ते वाहून जाणार!' 

खरंच आत्ताची अवस्था काही वेगळी नाही. एखाद्या विषयावर काही लिहावं म्हणलं तर सगळ्या टीपा आणि मुद्दे असूनही डोकं रिकामं होईल तेव्हाच हात आपोपाप चालतात! भरल्यापोटी आणि सगळ्यांभोवती क्वचितच काही सुचत असेल. कवी लोक ह्याला 'कवींची वेदना' म्हणत असतील, संगीतकार त्याला 'सुरांचं बोलावणं' म्हणत असतील, माझ्या बाबांसारखे चित्रकार त्याला 'रंगांची समाधी' म्हणत असतील किंवा सखाराम गटणेच्या शब्दांत ह्याला 'प्रतिभा-साधनेची वेळ !' म्हणत असतील, पण नवीन रचना उपाशी असल्याशिवाय होत नाही!

5 comments:

  1. खल्लास! जाम आवडला!
    'साधन' वापरून 'साध्य' साधणे म्हणजे 'साधना' असा म्हणायचं का आपण??
    अध्यात्मिक साधना की काय ती जमलीच नाही. तो आपला प्रांतच नव्हे... वेळीच कळलं हेच नशीब!
    बाकी स्वरांची, रंगांची, शब्दांची साधना करणाऱ्यांना आपला बालपणीपासून सलाम आहे.

    ReplyDelete
  2. Very well said...sadhya kharach man tudumb bharun vahat challay ani jya kahi goshti karaychya ahet tya saglya aat kuthetari haravlya ahet...

    Sam,Sarang - Keep writing me and my mom are big followers of ur blogs :)

    ReplyDelete
  3. enjoying your articles now a days. rather egar to receive them. so u two are good writers .keep writing and send me your varied articles i really enjoy. mala tumachya sarakhe alankarik lihita yet nahi. but i do enjoy evadha nakki.

    ReplyDelete
  4. hey sarang... mast ahe lekh... khoop avadala...

    ReplyDelete