खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मत-प्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात.
मुळात आपण भारतीय लोक हे अतिशय लकी आणि सुखी आहोत. याचा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्य-संस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल? मी खाण्याचे प्रकार म्हणतोय, पदार्थ नाही. सांगून सांगून किती सांगणार? १०,२० फारतर ५०! आपल्याकडे अक्षरश: हजारो खाद्यप्रकार आहेत, आणि अस्सल सुगरिणी रोजच्यारोज नवनवे पदार्थ शोधून काढतायेत. माझ्यासारखा खाण्याच्या बाबतीत अतिशय अडाणी मनुष्यसुद्धा इथल्या कुठल्याही एक्स्पर्ट माणसाला बोलून झोपवून टाकेल. आता काही इंग्रजांचं असं म्हणणं आहे की 'चटणी' हा 'ओरिजिनल इंग्लिश' पदार्थ आहे. अरे, पण मग इंग्लिश जेवणात चटणी का नाहीये? येडे कुठले.. गो-ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराजांची तलवार ढापली, शहाजहानचं मयूर-सिंहासन ढापलं, कोहिनूर ढापून झाला, एवढंच काय पण टिपू सुलतानाच्या महालाचे खांब देखील सोडले नाहीत यांनी. आता चटणी ढापायला निघालेत, चोर लेकाचे! इंग्रज चोर आहेत की नाहीत यावर चर्चा होऊच शकत नाही, कारण ते आहेतच. असो!
मूळ विषय 'खाणे आणि त्याच्या गप्पा' हा आहे, आणि आपण लोक पट्टीचे खाणारे आहोत. सण-उत्सव हे आपोआप आलेले नसून, ते त्या-त्या सणाच्या 'नैवेद्य स्पेशल' पदार्थासाठी 'ॲरेंज' केलेले आहेत, असा माझा पक्का समज आहे. उदाहरणार्थ, मोदक! कधीही करा, चव बदलत नाही, पण गणपतीत करा, आहाहाहा! पुरण-पोळी आणि वाट्टेल तेव्हा वाट्टेल तितक्या पुरणपोळ्या करून वाढणारी आई असेल तर जेवणाच्या पंगतीत साक्षात स्वर्ग अवतरतो! पण ऐन होळीच्या दिवशी पुरणपोळीच्या ऐवजी मोदक केले तर बेत जमून येत नाही राव. 'तेव्हा असावे पुरणपोळीचे, कुणा मोदकाचे ते कामच नव्हे!' चकली हा पदार्थ कधीही टाईमपास करण्यासाठीच बनवला गेलाय! पण दिवाळीच्या दिवसात चिवडा, लाडवाच्या संगतीत चकली कशी शोभून दिसते. शिरा एरवीही आवडेल, पण चतुर्थीच्या नैवेद्याला केलेला शिरा एकदम सात्विकच बनवून टाकतो! त्यातही केळं,वेलची वगैरे घालून केलेला शिरा असेल तर एकदम सारसबागेचाच गणपती आठवणार बघा!
कालच मी आणि माझा मित्र 'मऱ्हाटी खाद्यप्रकार' यावर जरा गप्पा मारत बसलो होतो. जरा म्हणजे ऑफिस मध्ये जेवण करून सुस्ती येते त्या वेळी. थोडक्यात दुपारी २ ते ४:३०! दोन-अडीच तास आम्ही फक्त 'मिसळ' वर गप्पा मारल्या. पुण्याची रामनाथ, बेडेकर, श्रीकृष्ण, श्री इत्यादी अतिशय फेमस आणि बाकी नॉर्मल पुण्यातली वर्ल्ड फेमस 'मिसळ' नावाचं पूर्णब्रह्म पुरवणारी केंद्र, आणि ठाण्याचं 'मामलेदार'! (मित्र मुंबैकर आहे, थोडा मान ठेवावा लागतो!) अशी मैफिल जमलीये म्हणून सांगू! बास, त्याच्या नंतर फक्त एक प्लेट मिसळ, ४ पाव, एक जोरदार लालभडक तर्री आणि नंतर गार गार ताक ऑर्डर करायचं राहिलं होतं. पण हाय, आम्ही बसलो होतो गोऱ्या साहेबाच्या ऑफिसात; तिथे बर्गर, बिन्स, आणि पास्ता याच्या पलीकडे कोणी काही गिळेल तर शपथ आहे. डुक्कर खायला सांगा यांना, डुक्कर मेले! आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथल्या 'इंडियन' हॉटेलात गोऱ्यांची जितकी गर्दी असते तितकी गर्दी त्या हॉटेल च्या आजूबाजूच्या ४ इंग्रजी हॉटेलात मिळूनदेखील नसते. म्हणजे चव वगैरे कळते यांना थोडीफार, पण तिथेही नाक वर! त्या हॉटेलात खाणार आणि मग 'करी' इथेच कशी 'भारी' बनते याच्या बाष्फळ बाता मारणार.
फक्त मिसळीवर २ तास गेले, वडा-पाव वर तर चकार शब्द बोललो नाही आम्ही. पुरणपोळी आणि मोदक तर अजून लिस्ट मध्ये यायचेत. खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी हे तर मिडल-ऑर्डर बॅट्समन आहेत. स्वीकारचे पोहे, अण्णाचा चहा, अप्पाची खिचडी, वैशाली, रुपाली, सोलकडी, दुर्गाची कॉफी वगैरे तर एक्स्ट्रा मधेच! इथे सलामीचा पहिला फलंदाजच दुसऱ्याला बॅटिंग करू देत नाहीये अजून.
तसं पाहायला गेलं तर मला भारतीय पदार्थांचा अगदीच उपास वगैरे घडलेला नाहीये. देवाच्या कृपेने मी जिथे राहतो ते स्वत: 'मुंबै' कर आहेत, आणि मालकीणबाईंच्या जेवणाला झकासच चव आहे. अहो, होळीच्या दिवशी एकदम अस्सल साजूक तुपातली पुरणपोळी मिळाली आहे मला! रोजच्यारोज वरण-भात, कढी/आमटी, २ भाज्या, गरमागरम पोळी असा साग्रसंगीत आणि सणसणीत बेत असतो. भरपूर वेळ, मोकळ्याढाकळ्या गप्पा आणि त्या जोडीला मस्त जेवण. अजून काय हवं?
पण कधीतरी अचानकच 'पुणेरी' पदार्थ डोक्यात रुंजी घालायला लागतात, स्वत:ची महती सांगायला सुरुवात करतात आणि आमचा कलेजा पार खलास होऊन जातो. आम्ही आमचे रहात नाही, कश्शाकश्शाचं भान उरत नाही, 'देह इथे आणि मन थेट पुण्यात, स्वयंपाकघरात' अशी अवस्था होऊन जाते. आईच्या हातची चव, आत्त्याने केलेली चिंच-गुळाची आमटी, साउच्या हातचे मोदक, श्रद्धाचे स्पेशल 'दादा' साठी बनवलेले पोहे- सतराशे साठ पदार्थ आठवतात, आणि खरोखर हळवं होऊन जायला होतं. आपले लोक आणि आपली चव यांचं महत्व बाहेर राहिल्याशिवाय कळत नाही म्हणतात हेच खरं!!!
मित्रा, मिसळीविषयी लिहीताना कोल्हापूरला विसरलास रे!!! अर्थात मी कोल्हापुरी, म्हणून पुणेकरांसारखा मिसळीबाबत मलाही जाज्वल्य वगैरे म्हणतात तसला अभिमान आहे.... :P
ReplyDelete@हर्षद: विसरलो नाहीये रे! कोल्हापुरी मिसळीबद्दल लिहिण्याइतपत मला त्याचा अनुभव नाहीये. आणि इथे कोणी कोल्हापुरी मिसळ-तज्ञ नसल्यामुळे नाईलाजास्तव NH4 ला जाता आलेलं नाहीये. बाकी कोल्हापुरी झटक्याबद्दल ऐकून आहे! एकदा त्यासाठी यायचंय तिकडे. :D
ReplyDelete