Saturday, November 6, 2010

पाळलेले केस

अतिशय साधी कविता आहे, वाचून विसरून जा !


माझे पाळलेले केस कधी कधी खूपच दंगा करतात
टोपीच्या खालून मानेच्या मागून वर येऊ पहातात
आरशासमोर नीट उभे असलेले 
बॉस समोर आला की उगाच शेळपटतात 

ह्यांना उत्साही ठेवायला चांगली जेल आणा
दिवाळीमध्ये उटणं लावा मध्ये मध्ये शाम्पू चोपडा
ह्यांना हवं तेच ते करणार 
घरी भेटायला आलेल्या मित्रांना जसा
आपलाच कुत्रा चावतो तसे हे पण 
आयत्या वेळी आपलाच गळा कापणार

वय वाढत गेलं की त्यांची मिजास वाढत जाते
त्यांना काळं ठेवायला सतत मशागत करावी लागते
मग आणा की बाजारातून काळ्या मेंद्या
थापा तुमच्या डोक्यावर आणि त्यातून वर बाकीच्यांचं हे ऐका,
म्हणे मेंदीने डोकं शांत राहतं !

केसाच्या लांबीवरून माणसाची ओळख ठरते,
हवंतर केस नसलेल्यांना विचारा !
नसले तरी बेचैनी आणि असले
तर येताजाता आरशात बघून आवरा!

प्रत्येकाला आपापले केस 
नको असले तरी पाळावेच लागतात
आपण चांगलं पौष्टिक खाऊन
त्यांना चार घास द्यावेच लागतात !!

Thursday, October 14, 2010

अजून काय..

बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला
पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला
आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल
आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय!

महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात
दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात
दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील
आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय!

आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत
अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत
परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील
आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय!

एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत
आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत
दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल
आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय!

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!

इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येतील पुन्हा छत्रपती, नि टिळक, नि सावरकर की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय!

Thursday, September 9, 2010

आणि आम्ही Engineer होत आलो...

(हा लेख मी Engineering च्या शेवटच्या वर्षात, अगदी वर्ष सरत आलं असताना, 'Engineer' होऊ घातलो असताना लिहिला होता!)


Engineer काय किंवा Doctor काय, या आपल्या भारतातल्या एक प्रकारच्या जमातीच आहेत..! अशा जमाती, ज्यांच्या वाटयाला फक्त कौतुकच यायचं.. पण आता या जमातींची लोकसंख्या एवढी वाढलीय, की जमातीतल्या लोकांचा अभिमान सोडाच, पण जमातीबाहेरच्या लोकांनाही याचे अप्रूप वाटेनासं झालंय! म्हणजे पूर्वी, ‘माझा मुलगा Engineering करतोय..’ ही एकच बाब कॉलर ताठ करायला पुरेशी होती. पण आता, पुढे तो M.Tech करणार आहे, MBA करणार आहे का MS?... यावर ते सगळं अवलंबून आहे!

‘Engineer’ हा शब्दच मोठा विचित्र वाटतो मला! याची संधी सोडवायला जावं, तर Engineचं ज्ञान असणारा किंवा Engine तयार करणारा तो Engineer अशी होते. पण असं जर असेल तर Civil , Metallurgy किंवा IT मधल्या लोकांना Engineers का म्हणावं असा प्रश्न पडतो! कारण, आम्ही Mech, Prod ची लोकंच Engine बद्दल शिकत असतो (असा समज तरी आहे!). हे जरा विविध धर्मांना समान स्थान असून भारताला ‘हिंदू’स्तान म्हटल्यासारखं झालं! एकात्मता वाढावी, ‘मी एक भारतीय आहे..’ सारखं ‘मी एक Engineer आहे..’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी, या कारणाने ते ‘Engineer’ असं नाव ठेवलं गेलं असावं (इथे ‘नामकरण करणं’ असा अर्थ अपेक्षित आहे, ‘नाव ठेवणं’ नाही!). पूर्वजांचा हेतू चांगलाच असावा.. पण Mechanical पासून Production, Computer पासून IT किंवा Electronics पासून Instrumentation सारख्या branches उदयाला आल्याचे पाहता झारखंड, उत्तरांचलची आठवण आल्याखेरीज राहत नाही!

आम्ही अगदी ‘खरे’ Engineers असलो तरी आम्हा Mechanical, Production वाल्यांना तरी ४ वर्षात Engine ची ओळख कुठे होते सगळी! एका Viva ला आम्हाला विचारलं होतं, ‘4-Stroke, Single Cylinder Engine ला Rocker Arm किती असतात?’ आता ‘Rocker Arm’ हा शब्द मी कधी जन्माच्या कर्मात ऐकला नव्हता! मग विचार केला की उत्तर तयार करूयात! ‘उत्तरं येत नसतील तरी ती तयार करता आली पाहिजेत!’ हे प्रत्येक Engineer न शिकवताच शिकलेला असतो! असा विचार करून मी Engine डोळ्यासमोर आणलं. तरी मला कुठे ते Rocker Arms बघितल्यासारखे वाटत नव्हते. त्या ऐवजी तो WWF चा ‘Rock’ आणि त्याचा तो पिळदार दंडच ‘Rocker Arm’ म्हटल्यावर डोळ्यासमोर यायला लागला! आणि मी तसाच मक्खासारखा चेहेरा करून बसलो..! खरंतर Engineering Viva म्हणजे प्रत्येक Engineer च्या आयुष्यातला एक रोमहर्षक अनुभव! त्या २०-२५ मिनटात एका वेगळ्याच विश्वाची सैर घडू येते! जणू एक नाटकंच चालू असतं! त्या नाटकात External Examiner इनिस्पेक्टर ची भूमिका (इन्स्पेक्टर नाही!), Internal Examiner पांडू हवालदाराची आणि विद्यार्थी आरोपीची भूमिका करत असतो! त्या पांडू हवालदाराला आनंद झालेलं असतो की आपण आरोपीला पकडून साहेबांसमोर उभं केलंय.. इनिसपेक्टर त्याला खोदून खोदून प्रश्न विचारात असतो आणि आरोपी मान खाली घालून त्याचे सगळे आरोप कबुल करत असतो. शेवटी ‘मला काहीही येत नाही, मी बिनडोक आहे!’ असं कबुल केल्यावर इनिसपेक्टर आणि पांडू हसतात आणि मगच त्या आरोपीची सुटका होते! पण मुलगी जेव्हा आरोपी असते, तेव्हा चित्र अगदी वेगळं असतं! ती गोड बोलून अशी काही जादू करते की इनिसपेक्टर आणि पांडू त्यांचे dialogues विसरतात आणि तिला पोतंभर मार्क देऊन टाकतात! आपल्याला शेंडी लावली गेलीय हे त्या बिचार्यांच्या ध्यानीही नसतं...! मुलींना असे आरामात मार्क मिळतात आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो, याची माझ्या एका मित्राला एवढी चीड होती की एक दिवस मुलीच्या वेशात viva ला जायचं, असं त्याने ठरवलं होतं! आमच्याकडे viva घ्यायची एक विशिष्ठ पद्धत आहे. एका वेळी तिघांना बसवतात. एकच प्रश्न एका पाठोपाठ एक असा तिघांना विचारला जातो. अशात जर कोणी तिसरा असेल, तर त्याच्यासारखा बिचारा तोच! आधीच्या दोघांनी एकाच प्रश्नाची दोन संपूर्ण वेगळी उत्तरे दिलेली असतात आणि या बिचाऱ्या तिसऱ्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटत असतात..! अशावेळी External Examiner पटकन कृष्णाच्या भूमिकेत शिरतो आणि, “तुला माझं लक्षावधी सैन्य हवंय का मी स्वतः!” असं विचारून त्या बिचाऱ्या तिसऱ्याची अवस्था दुर्योधानासारखी करून टाकतो! त्यामुळे ‘जग’ ही रंगभूमी आहे की नाही ठाऊक नाही, पण Engineering आणि मुख्यत्वे ‘Engineering Viva’ ही नक्की एक रंगभूमी आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय आता!

‘Submissions’ हा असाच एक अजब प्रकार! नुसतं हात तुटेपर्यंत लिहायचं. इकडचं तिकडे उतरवायचं आणि Journals पूर्ण करायची ही त्याची थोडक्यात व्याख्या! पण मग हे असं का करायचं असतं याचं उत्तर कधीच कोणाकडे नसतं. Syllabus मधे सांगितलंय, त्यामुळे पास व्हायचं असेल तर ते करायचं, एवढयाच विचाराने प्रत्येक वर्षी पोथ्या भरवल्या जातात. ह्यातून आणि काहीच मिळत नसतं. कृष्णाने गीतेत म्हटलेच आहे, “कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका.” आणि आम्ही सगळे Engineers तेव्हा गीता जगत असतो. गेली ४ वर्षे मीसुद्धा नुसता इकडचं तिकडे उतरवतोय.. त्या दिनानाथाची गीता जगतोय..!

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला एक दिवस खूप गंभीर प्रश्न पडला होता, की ‘आपण Engineer आहोत का Technical कारकून?!’ मला खात्री आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक होतकरू Engineerला एकदातरी पडला असणार! पण image आणि ego जपायचा म्हणून प्रत्येकच जण हा टोचणारा काटा हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून अस्वस्थता अनुभवत असतो.. हे एकमेकांना कधीच सांगितलं जात नाही. दोन Engineers मधलं हे mutual understanding असतं..!

असंच एक न उलगडलेलं कोडं म्हणजे Engineering चे Professors! ‘तुम्ही एकवेळ काहीही शिकवलं नाहीत तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे!’ असंच त्यांच्या मनावर जणू बिंबवलं असतं! कदाचित ‘Engineering हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. पदोपदी नरकयातना भोगाव्याच लागतात, तरच सिद्धी प्राप्त होते!’ हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो! बाहेर हा माणूस अगदी तुमच्या आमच्यासारखाच असतो. पण कॉलेजमधे आल्यावर तो अचानक बदलून जातो! बाहेर रस्त्यात कधी कुठल्या शिक्षकाने आपल्याकडे बघून मंद स्मित केले (Smile दिली!), तर, अनेकवेळा आपल्या sheets वर ‘Redo’ शेरा मारणारा, खंडीभर assignments देणारा, submissions साठी शेवटपर्यंत छळ छळ छळणारा, खुन्नस म्हणून पेपर अवघड काढणारा आणि viva च्या वेळेस External ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत की हळूच खुनशी हसणारा मनुष्य हाच का असा प्रश्न पडतो..! अशाच एका ‘हिटलर’ professorने रस्त्यात आपणहून दिलेली ओळख बघून मला ही नक्की ‘राम और श्याम’ किंवा ‘कुंभ के मेले मे बिछडे हुए भाई’ ची case आहे असं वाटलं होतं!

यानंतर ज्याची प्रत्येक जण ४ वर्षे आतुरतेने वाट पाहत असतो असा तो Engineers च्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उजाडतो.. दिवस असतो ‘placements’ चा..! सगळीकडे एकच लगीनघाई सुरु असते! असंख्य काका, मामा आणि ‘family friends’ कडे चौकश्या करून झालेल्या असतात. ‘थोडयाच वर्षात Software ची boom परत येईल..’, ‘पण Core ला काही मरण नाही यार..!’, ‘TCS मधे २ वर्षांच्या bond पेक्षा १ वर्षाच्या bond ची Infy बरी, असं माझ्या ताईचे मिस्टर सांगत होते, जे Wipro मधे आहेत!!’ अशी वाक्ये या काळात सगळीकडे सर्रास ऐकू येतात.. त्या दिवशी सगळेजण कडक इस्त्रीच्या स्वच्छ कपडयात असतात आणि मागच्या खिशातल्या कंगव्याने सारखा भंग पाडत असतात..! मधेच polish केलेल्या बुटांवर बसलेली धूळ पाय वर करून pant च्या मागे पुसत असतात.. ‘मी किती cool आहे’ हे दाखवण्याचा प्रत्येकच जण अयशस्वी प्रयत्न करत असतो! कारण प्रत्येकालाच चिंता असते आपल्या placement ची, आपल्या भवितव्याची!

दिवस जेव्हा सरतो तेव्हा आम्हा Engineers च्या चेहेऱ्यावरून निकाल ओळखणे सोपे असते. आमच्यातले काही लोक उडया मारत असतात, काही भावूक होऊन आईशी फोनवर बोलताना दिसतात. तिची स्वप्ने पूर्ण केलेली असतात ना त्यांनी! अगदी हळवा क्षण असतो तो.. तर काही हिरमुसून होस्टेलकडे निघालेले असतात. चेहऱ्यावर निराशा असली तरी मन कणखर असतं त्याचं. ‘अजून युद्ध संपलेलं नाहीये. अजून लढायचं..’ या भावनेने ते दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागतात.. पण आठवडा-दोन आठवडयातच चित्र स्पष्ट होतं.. हळूहळू विश्वास बसायला लागतो की आपण एक नव्हे तर दोन कंपनीत place झालोय! आणि मग आनंदाला काही पारावार उरत नाही..

Placement सारख्या खूप आनंद देणाऱ्या अशाच अजूनही काही गोष्टी या माझ्या Engineering च्या आयुष्यात घडून गेल्यात.. आज सगळं आठवतंय.. College चा पहिला दिवस.. Boat Club वर तासनतास मारलेल्या गप्पा.. पावसाच्या काळात दुथडी भरून वाहणारी ती नदी.. तिच्यातलं उसळून वाहणारं पाणी नकळत मनाला उभारी देऊन जायचं.. Freshers’ Party… Technical Events.. Zest मधली केलेली मजा.. Regatta मधले श्वास रोखून ठेवणारे ते events आणि तो दिव्यांचा अद्भूत खेळ.. इच्छेनुसार साजरी होणारी दिवाळी फक्त COEPतच! होस्टेलवर पडीक असणं..खूप खूप cricket खेळणं.. 1st year मधली ट्रीप.. आणि पुढील प्रत्येक वर्षातल्या अशाच सहली.. Traditional dayला ते भान हरपून नाचणं... Valentine’s Day ला लाल नाही निदान पिवळं तरी फुल मिळावं अशी भाबडी आशा.. आणि मिळालं नाही की ‘एक दिवस खूप मोठा होईन आणि मग मनासारखी मुलगी मिळेल मला.. सगळ्यात सुंदर..’ असं पाहिलेलं स्वप्न..! Gathering मधली मजा.. Cultural Group मधे मिळालेला तो अवर्णनीय आनंद..पुरुषोत्तम..फिरोदिया..सगळाच उत्सव, सगळाच सोहळा, सगळाच जश्न...! बेंबीच्या देठापासून अगदी कानठळ्या बसेपर्यंत ओरडून ओरडून आसमंत दणाणून सोडणारा C.O.E.P चा तो गजर... गजर कसला, गर्जनाच असतात त्या! C.O.E.P रूपी सिंहिणीच्या आम्ही केलेल्या छाव्यांनी..! मिळालेल्या करंडकाकडे बघून वाटणारी ती जग्गजेते झाल्याची भावना...

आता जाताना या सगळ्या आठवणी घेऊन जाऊ. जाता जाता प्रत्येक ‘मामू’ professor ला एक ‘जादू की झप्पी’ द्यावीशी वाटतीय! (ज्या शिक्षकांना मानलं त्यांना तर दंडवतच घालीन!) आणि म्हणावसं वाटतं.. “सर, तुमच्यामुळेसुद्धा मी इतक्या छान आठवणी घेऊन जाऊ शकतोय.. तुम्ही दिलेला त्रास आज खरंच प्रेमळ वाटतोय.. धन्यवाद सर!” सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावं लागतंय ह्याचं मात्र दु:ख आहे. त्यांच्याही खूप आठवणी आहेतच.. पण ‘एवढया सगळ्या आठवणी कायमच्या राहतील माझाबरोबर?’ असा प्रश्न पडतो, अन् वाटतं 200 GB memory हवी होती आपली! त्या computer नामक निर्जीव यंत्राचा हेवा वाटायला लागतो.. आणि अचानक मनात विचार येतो, ‘200 GB ची Hard Disk माणसात implant करता येऊ शकेल? सगळ्याच आठवणी कायमच्या राहू शकतील मग आपल्याकडे.. Natural आणि Artificial Intelligence चं असं हे hybridization शक्य आहे का..?’ आणि मग माझ्यातला ‘खरा Engineer’ विचार करायला लागतो...

Saturday, July 24, 2010

सप्रेम

बऱ्याच वर्षांपूर्वी मित्रांना सोडून परदेशी येताना खास त्यांच्यासाठी काहीतरी खरडलेलं ..
---------------------------------------------------------------------------------------------------------

मावळतीचा सूर्य पाहताना मला नेहमीच अस्वस्थ वाटतं...
ती प्तरंगाची उधळण, तो केशरी आसमंत दिसायला कितीही सुंदर दिसला तरीही मनाला हुरहूर लावूनच जातो..

मनात कुठेतरी दडलेलं असतं की उद्या पुन्हा एक नवी सकाळ उगवणार आहे, पण तरीही चुकल्यासारखं वाटतंच..
एका दिवसाचा अंत झालेला असतो, आणि पुढच्या दिवसाला अजून उशीर असतो.. अशा वेळेस कुठेतरी एकाकीपणा जाणवतो..
कारण आता काही क्षण एकटेच काढायचे असतात .. त्या मिट्ट काळोखात.. !

पण अशा वेळेस, आकाशातला चंद्र माझी सोबत करतो.. चंद्र - सुशील, शांत .. काळोखाला उजळणारा .. माझ्या एकटेपणाला सोबत करणारा, सांभाळून घेणारा..
अगदी जिवलग विश्वासू मित्रासारखा..

~*~*~

हे बदलतं आयुष्य या घटनेची मला नेहमी आठवण करवतं.. इथेसुद्धा 'एका गोष्टीचा अंत आणि पुढच्या गोष्टीची सुरुवात' हे चक्र नेहमीच चालू असतं..
मग गोष्टीचा अखेर कितीही सुखद असला तरीही तो मनाला चुटका लावतोच.. पण पुन्हा पुढच्या ध्येयासाठी सुद्धा तयार व्हायचं असतंच...
अशावेळेस डगमगायला होतंच.. एकाकीपणा जाणवतोच.. खोलवर कुठेतरी..
कारण आता नाविन्याच्या अडचणींना सामोरं तर जायचं असतंच.. !

पण यावेळेस तुम्हा मित्रांची मैत्रीच मला साथ देते.. ती मैत्री माझा आत्मविश्वास जागवते.. मला एक छानसा Comfort Zone मिळवून देते..
जणू काही त्या आकाशातल्या चंद्रप्रकाशासारखीच - सुशील, शीतल, शांत.. आणि एकटेपणात सदैव माझ्या सोबतीला..

~*~*~

पण प्रेमासारखाच मैत्रीलाही विरहाचा शाप हा असतोच.. आणि ती विरहाची वेळ आता इथेही येउन ठेपली आहे..
पण हीच माझ्यासुद्धा परीक्षेचीही वेळ आहे.. इथेच मला स्वतःला सावरायचं आहे.. काहीतरी करून दाखवायचं आहे..
अनेकांच्या अनेकानेक अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.. हाती घेतलेली कामं तडीस न्यायची आहेत..

यापुढे आपण सर्व एकत्र नसलो, तरीही आपली निखळ मैत्री, आपण सर्वांनी एकत्र घालवलेले क्षण, आपल्या picnics.. अगदी सगळ्या आठवणी माझ्यासोबत निरंतर असणार आहेत..
आणि माझ्या पुढील आयुष्यात त्या मला फारच उपयोगी पडणार आहेत.. आणि याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे..

आज माझ्यात इतका आत्मविश्वास येण्यास तुम्हा सर्वांचा, आपल्या मैत्रीचा फार मोठा हातभार आहे..

हे मैत्रीचं प्रेमळ नातं मी माझ्या मनात नेहमीच जपून ठेवीन..

आजच्या या दिवशी ही एक छोटीशी सदिच्छा तुम्हा सर्वांना एक सप्रेम भेट म्हणून देत आहे..
तुम्हाला आवडेल अशी खात्री बाळगूनच..

चूकभूल द्यावी घ्यावी...

मित्र - निरंतर.
संदीप

Monday, July 19, 2010

पूर्णब्रम्ह

‘आपण कशासाठी जगतो?’ हा प्रश्न मला अधूनमधून पडायचा. अजूनही पडतो! आता हा प्रश्नच इतका भयंकर philosophical असल्यामुळे त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाहीये. ‘आयुष्यात प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, ते पूर्ण करण्यासाठी..’, ‘आपल्या माणसांसाठी’, ‘आता आलोच आहोत तर जगायचं आणि वेळ झाली की मरायचं!’ ही त्यातलीच काही उत्तरं.. पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात पटलेलं उत्तर म्हणजे ‘आपण पोटासाठी जगतो’!

‘कशासाठी-पोटासाठी’ हे वर वर बघता फारच फालतू उत्तर वाटतं, पण नीट विचार केल्यावर त्यातली गंमत दिसून येते! मानवी शरीराला काही ठराविक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाच्या ठराविक अशा गरजा असतात. बाकी सगळ्या अवयवांच्या गरजा भागवणं सोपं असतं. म्हणजे गणितं सोडवली, विचार केला, की मेंदूची गरज भागली. सुंदर गोष्टी बघितल्या की डोळ्यांची गरज भागली. श्रवणीय संगीत ऐकलं की कानांची गरज भागली. खेळलं, व्यायाम केला, की हातापायांची गरज भागली. पण पोटाचं असं नाहीये बघा. कारण पोटाची गरज भागवायला अन्न लागतं आणि ते मिळवण्यासाठी आणि शिजवण्यासाठीच तर सगळा खटाटोप असतो!

अन्न मिळवण्यासाठी पैसे कमवा, पैसे कमावण्यासाठी नोकरी करा, नोकरीसाठी शिक्षण हे लागतंच आणि एकदा का नोकरी सुरु झाली की तुमचं काम अगदी रिटायर्ड होईपर्यंत करत बसा! नाहीतर ‘पोटा-पाण्याचे’ वांधे होतात! आणि फक्त एवढंच नाही. अन्न मिळवल्यावर ते शिजवायचं असतं. त्यासाठी घरातलं स्वयंपाकघर आयुष्यभर चालू ठेवा. मग ते एकटयाला कसं झेपणार? त्यामुळे लग्न करा! चार दिवस प्रेमात घालवा. पुढची चाळीस वर्षे भांडत बसा! पण ते स्वयंपाकघर अखंड चालू राहिलं पाहिजे..कशासाठी?..अहो पोटासाठीच नाही का!

तर अशा ह्या पोटासाठी जगण्यानेच ज्यात ‘scope’ आहे तिकडे माणूस वळाला, आणि ह्या जगाचा विकास झाला! शेती, मासेमारी, घरबांधणी, व्यापार, धातू, खनिजे, तंत्रज्ञानाची सुरुवात, रस्ते, गाडी, रेल्वे, विमानं, संगणक, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग... जे विकलं जाईल ते तो तयार करत गेला. एका कुठल्या व्यवसायात गर्दी झाली की तो दुसरं काहीतरी करू लागला. नवीन शोध लावू लागला..सगळं पोटासाठी, म्हणजेच जगण्यासाठी! असं हे पोटासाठी जगणंच हे जग अखंड चालू ठेवतं आणि या जगाचा विकास करतं.

आता हे जे अन्न आपण मिळवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवतो, ते खाऊन पोट भरायच्या आधी त्याला एका ‘जीभ’ नावाच्या Quality Assurance Inspector मार्फत जायला लागतं! आणि या ‘जीभ’ नावाच्या Quality Inspectorला जे आवडतं, तेच आपल्यालाही खावंसं वाटतं आणि त्याला जे आवडत नाही, ते आपल्यालाही आवडत नाही. प्रत्येक माणसाचा तो ‘Quality Inspector’ थोडयाफार फरकाने सारखाच असतो. त्याला पुरणपोळी, बासुंदी, जिलबी.. असे गोडधोड पदार्थ, वडापाव, समोसा, भजी.. यासारखे तळलेले पदार्थ, पावभाजी, चायनिज, पंजाबी किंवा नॉनव्हेज सारखे चमचमीत पदार्थ, बर्गर, पिझ्झा सारखं फास्ट फूड किंवा आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक सारखे गोड आणि गार पदार्थ खूप आवडतात. पण दोडकं,पडवळ, तोंडलं, कारलं या सारख्या फळभाज्या आणि माठ, आंबट-चुका, करडई यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत. आणि तिथेच निसर्ग एक खेळ मांडतो!

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की जे पदार्थ आपल्याला भयंकर आवडतात, ते नेहेमीच अपायकारक, हानिकारक किंवा शरीराला वाईट का असतात? आणि जे पदार्थ आपल्याला मुळीच आवडत नाहीत ते प्रचंड पोषण करणारे, शरीराची वाढ आणि विकास करणारे का असतात? कधी आई किंवा आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणतात का की, ‘तू रोज सकाळ संध्याकाळ बासुंदी पीत जा! भरपूर तेल घालून deep fried भजी खा! रोज एक बर्गर तर खाल्लंच पाहिजेस आणि आईस्क्रीमची एखादी बादली फ्रीजरमधे ठेवत जा!’ हे सगळे आवडणारे पदार्थ आपलं वजन वाढवतात, cholesterol वाढवतात, आपल्याला डायबेटीस होऊ शकतो आणि पुढे Heart Attack ही येऊ शकतो..
या उलट पथ्य-पाणी म्हणजे, ‘दुधी भोपळ्याचा रस प्या. उकडलेली कडधान्य खा. उपासाचे पदार्थ खा. बिनसाखरेचं दूध प्या. कमी तेलाची भाजी खा. Lettuce सारखा पालापाचोळा खा!’ म्हणजे अगदी त्या ‘Quality Inspector’ला काळ्यापाण्याची शिक्षा देऊन, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करा! म्हणजे तुम्ही तंदुरुस्त व्हाल!

लहानपणी आईने मला डब्यात कधी आंबट-चुक्याची भाजी दिली, तर मी तसाच न खाता डबा संध्याकाळी घरी आणायचो. आईला उघडून दाखवायचो. हात जोडायचो आणि विचारायचो, “आई माझ्या हातून काही ‘चुका’ झाल्यात का!” पडवळ, दोडकं या सारख्या बेचव भाज्या कसं काय पोषण करू शकतात? कारलं तर म्हणे भयंकर healthy असतं! पण ते खाताना मला कुठलीतरी शिक्षा भोगत असल्याची जाणीव होत असते! हिरवा माठ, लाल माठ खाऊन बुद्धी तल्लख होऊच कशी शकते? आणि जर होते, तर ‘माठ’ नाव ते कशाला! आणि बिनसाखरेचा चहा किंवा दूध प्यायचं असेल तर वासरू होऊयात किंवा मांजराचा जन्म घेऊयात! Sprouts किंवा lettuce ‘चरायचं’ असेल तर शेळी होण्यात काय वाईट आहे!

असा हा विरोधाभासाचा खेळ निसर्ग मांडतो आणि चविष्ट अन्नाच्या मोहात पाडून रोज जिभेची लढाई लढायला लावतो! पण अशावेळी निसर्ग मला आई-वडिलांसारखा वाटतो. ‘काय चांगलं आहे, पेक्षा काय योग्य आहे’ ते करत रहा असे संस्कार जणू तो करत असतो. हा त्याने मांडलेला खेळ ही वडीलकीच्या नात्यानेच केलेली गोष्ट आहे.
आता आपण पोटासाठी जगतो, अन्न मिळवतो. पण जे अन्न खूप चविष्ट आहे ते जर मुळीच हानिकारक नसतं, उलट जर का ते पौष्टिक असतं, तर ते आपण गरजेच्या पलीकडे जाऊन खाल्लं असतं. माणसाचं खाण्याचं प्रमाण वाढलं असतं. नावडत्या भाज्यांची शेतीच केली गेली नसती. अन्नधान्य साठा मर्यादित असल्याने आणि श्रीमंत लोकांचा आहार वाढल्याने गरीब नेहेमीच उपाशी राहिले असते. लोकं, जिभेचे आनंद उपभोगत बसले असते. जगाचा विकास थांबला असता. अपरंपार प्राणिहत्या झाली असती. एक दिवस अन्नधान्य संपूनही गेलं असतं. सगळंच विस्कळीत झालं असतं..

लहानपणी आई म्हणायची, “वरण भाताचे हे शेवटचे तीन घास खाल्लेस तर चॉकलेट मिळेल..” आणि मी ते तीन घास खायचो.
पोटासाठी असणाऱ्या या जगण्यात, निसर्गाचं ऐकायचं असतं. तीन घास ‘वरण भाताचे’ खाऊनच मग एक ‘चॉकलेट’ खायचं. जगण्याची लढाई आणि स्वतःशी लढाई एवढंच तर सगळं काही असतं. म्हणूनच कदाचित अन्नाला ‘पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात..

Monday, June 28, 2010

राखाडी रावण

बालवयात जे आपल्यावर संस्कार होतात त्यात गाणी आणि गोष्टींचा सिंहाचा वाटा असतो! ससा-कासवाच्या ‘classic’ गोष्टीपासून ह्या संस्कारांना सुरुवात होते आणि ‘आळस’ हा जो मित्र वाटणारा शत्रू पुढे आयुष्यभर पाठ सोडणार नसतो, त्याची या गोष्टीतून तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखं timepass गाणं, ‘गाणं’ म्हणजे काय असतं हे सांगायला शिकवतात. नंतर इसापनीतीतल्या ५०-१०० प्राण्यांच्या गोष्टींचा नंबर लागतो. ह्यात प्रत्येक गोष्टीला काहीतरी तात्पर्य असतंच! ह्या गोष्टी सतत काहीतरी शिकवतच असतात! आणि या गोष्टींचा आपल्यावर एवढा भडीमार होतो की नंतर कुठल्या काका किंवा मामाने ‘ये गोष्ट सांगतो’ म्हणून तात्पर्य नसलेली गोष्ट सांगितली, तर उगाचंच आपल्याला वेड्यात काढल्यासारखं वाटतं! ते झालं की टिळकांच्या शेंगांच्या टरफलावाटे पिल्लाच्या चोचीत संस्काराचा दाणा भरावला जातो! आणि मग पाळी येते सगळ्यात लाडक्या, संस्कारक्षम, ‘देव’ या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या दोन महान गोष्टींची.. रामायण आणि महाभारत!

रामायण आणि महाभारत ही दोन अफाट गाजलेली महाकाव्ये! आता त्या गोष्टी खऱ्या का खोट्या, राम-कृष्ण, कौरव-पांडव, हनुमान, वानरसेना हे सगळे खरेच होऊन गेले आहेत का, हा भाग जरा बाजूला ठेवूयात. मुख्य मुद्दा हा, की सगळ्यांना रामायण आणि महाभारत भयंकर आवडतं. पण जर असं कोणी विचारलं की तुम्हाला रामायण जास्त आवडतं का महाभारत? तर बहुतेक सगळ्याचं उत्तर ‘महाभारत’ असंच येईल! आणि ह्याला एक कारण आहे...

लहानपणी या दोन्ही गोष्टी एकाच पठडीत सांगितल्या जातात. म्हणजे बघा, रामायणात राम, लक्ष्मण, सीता हे देव असतात आणि रावण हा राक्षस असतो. दुष्ट रावण सीतेला पळवून नेतो आणि मग राम-लक्ष्मण, हनुमान आणि त्याच्या वानरसेनेच्या मदतीने लंकेवर स्वारी करतात. रावणाचा वध करतात. जिंकतात. सत्याचा विजय होतो! किंवा महाभारतात, कौरवांचा पांडवांवर राग असतो. पांडव ५ तर कौरव १०० असतात. पांडव चांगले आणि कौरव वाईट असतात. कृष्ण देव असतो आणि तो चांगलं वागणाऱ्यांची म्हणजे पांडवांची बाजू घेतो. कौरव आणि पांडवांच्यात घनघोर युद्ध होतं. भर युद्धात कृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतो! पांडव जिंकतात. सत्याचा विजय होतो! ह्या अशा ‘हिरो आणि व्हिलन’, ‘देव आणि राक्षस’ स्वरुपात आपण लहानपणी रामायण-महाभारत ऐकतो. मग त्यात हिरोला अजून हिरो करायला अर्जुनाची पक्ष्याच्या डोळ्याची किंवा लक्ष्मण-शूर्पणखेची गोष्ट असते आणि व्हिलनला आणखी व्हिलन करायला जयद्रथ, शकुनी मामा, दु:शासन, बिभीषण अशी पात्रं प्रवेश घेतात.

पण जसे आपण मोठे होतो तशी आपल्याला महाभारतातल्या प्रत्येक मुख्य पात्राची नव्याने ओळख होते. कृष्णाची आणि पांडवांची ‘धुतल्या तांदळाची’ आपल्या मनातली छबी साफ धुवून निघते! चंद्रावरचे डाग दिसतात. आणि प्रत्येक पात्र अतीव सुंदर असा करडा रंग धारण करतो. म्हणजे द्रोणाचार्य एकलव्याला शिकवायचं नाकारून ‘racism’ करतात. नेहेमी खरं बोलणारा युधिष्ठीर ऐन युद्धात ‘नरो वा कुंजरो’ अशी थाप मारून आपल्याच गुरूंना आत्महत्येला भाग पाडतो. द्रोपदी भर सभेत सूतपुत्र म्हणून कर्णाचा उगाचंच अपमान करते. आणि कृष्णाने खेळलेली ‘राजनीती’ तर विचारायलाच नको! कर्णाच्या हाती शस्त्र नसताना तो अर्जुनाला कर्णावर बाण मारायला भडकावतो. ही कुठली नीती? का, तर कृष्णालाही माहिती असतं अर्जुन कर्णाशी कधीच जिंकू शकणार नाही. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ वाचल्यानंतर तर मला कृष्णाचा एवढा राग आला होता ना...अशाप्रकारे कृष्णही करडाच होतो..

प्रत्येक जिवंत माणसाला जन्मतःच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपु म्हणजे सहा शत्रू आणि सहस्त्र वेगवेगळ्या भावना असतात. कुठलाच माणूस १००% शुद्ध, चांगला किंवा कुठलाच माणूस १००% वाईट असू शकत नाही. म्हणूनच, ही महाभारतातली राखाडी पात्रं आपल्याला जास्त जवळची वाटतात. मनाला पटतात..भिडतात..

पण रामायणाचं असं नाहीये बघा. रामायणाच्या अगदी शेवटी राम सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा घ्यायला लावतो, ही गोष्ट सोडल्यास राम नेहेमीच शुद्ध, चांगला असा देव असतो आणि रावण हा नेहेमीच दुष्ट राक्षस असतो.

मध्यंतरी रामायण आणि महाभारतावर २ चित्रपट आले. ‘राजनीती’ ह्या चित्रपटात आधुनिक महाभारत साकारलंय. पण ‘रावण’ या चित्रपटात मणिरत्नमने ‘रामायण’ नव्याने लिहायचं प्रयत्न केलाय...! रामायणात सीता खूप सुंदर असल्याचा उल्लेख आहे. आणि जर रामायणाच्या शेवटी सीता अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होते, तर एवढा बलशाली रावण हा नक्कीच एक महान व्यक्ती असला पाहिजे. सीतेचे फक्त सौंदर्यच नाही तर अंगभूत गुणांनीही तो चकित झाला असेल, अगदी तिच्या प्रेमातही पडला असेल. मग अशात रावणही रामासारखाच मर्यादापुरुषोत्तम ठरतो! रावणालाही स्वतःची अशी गोष्ट आहे. तो लहानपणी खूप उद्धट आणि चिडका होता. पण म्हणून काही तो outright वाईट ठरत नाही. आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्यानेच चिडून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रावणाला दहा तोंडं होती असं त्याचं वर्णन आहे. पण त्यापेक्षा १० पंडितांपेक्षा तो हुशार होता, तो अत्यंत हुशार व्यक्तीपेक्षा १० पट वेगाने विचार करू शकायचा किंवा त्याला ४ वेद आणि ६ उपनिशिदं असं सगळ्याचं ज्ञान होतं हे जास्त पटण्यासारखं आहे. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने सलग कित्येक वर्षे ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. आणि जर त्याचा वध करायला विष्णूला रामाचा अवतार घ्यायला लागला ह्याचा अर्थ किती सामर्थ्यशाली असेल रावण.. श्रीलंकेत आजही रावणाची मंदिरं आहेत आणि लोकं त्याला देव मानून नियमित दर्शनाला जातात.

ह्या सगळ्या गोष्टी रावणाचा काळा रंग राखाडी बनवतात. रावणाचं हे नवं (आणि कदाचित खरं) रूप मणिरत्नमने पडद्यावर साकारलंय. आणि म्हणूनच चित्रपट कितीही कंटाळवाणा झाला असला, त्याचा first half अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकत असला किंवा dialogues अतिशय फुसके असले तरी आता हयात नसलेल्या रावणाच्या मनात जाऊन त्याच्या पात्राचा विचार करून ते पडद्यावर उभ्या करणाऱ्या मणिरत्नमला माझा सलाम!

या नंतर एक विचार मनात येतो की जर राम आणि कृष्ण हे जर विष्णूचे म्हणजे साक्षात देवाचे अवतार असतील तर त्यांनी खऱ्या हिरो कर्णाचे किंवा अगदीच वाईट नसूनही रावणाचे प्राण घेऊन काही चूक केली का..? कदाचित नाही! कदाचित कृष्णाला अर्जुनापेक्षा जास्त कर्णच आवडत होता. पण नियतीमुळे म्हणा, कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कौरवांचं हारणं आणि पांडवांचं जिंकणं हे ‘सामाजिक हिताचं’ होतं. आज कदाचित आपणही पांडवांचेच वंशज असू आणि आपल्यालाही कौरवांपेक्षा पांडवांचेच वंशज होणं आवडलं असतं. तसंच रावणाचा वध करणं हेसुद्धा ‘सामाजिक हिताचं’च होतं. आणि भावनेच्या, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा फक्त विचारच नाही तर समाजासाठी जो कृती करतो त्याला ‘देवत्व’ प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. राम आणि कृष्ण करडया रंगाचे असूनही ह्या देवत्वाने त्यांच्यात एक लकाकी आहे. म्हणूनच त्यांचा करडा रंग स्वर्गीय चंदेरी दिसतो. आणि त्यांचं देवत्व तसूभरही कमी होत नाही..

पण हे काही असलं तरी रावणाचं हे नव्याने समजलेलं राखाडी रूप माझ्या मनाला खूप भावलंय. या राखाडी रावणाला माझे शतश: प्रणाम!

Sunday, June 20, 2010

स्वप्नास्तित्व

‘एक दिवस येईल माझा. मी एक मोठा माणूस असीन. माझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील तेव्हा. भरपूर पैसा, प्रसिद्धी, सुंदर, समजूतदार आणि प्रेमळ बायको, कौटुंबिक समाधान, सगळं काही असेल माझ्याकडे...’ हा विचार ज्या क्षणी मनात येतो, त्याक्षणी आपला आणि वर्तमानकाळाचा संबंध तुटतो. जणू कुठलंसं circuit break होतं आणि आपल्या स्वप्नातलं आपलं अस्तित्व आपण जगायला घेतो..!

एखादा पारंगत चित्रकार जसं पांढऱ्याशुभ्र कागदावर वेगवेगळे रंग फसाफस् पसरवून चित्र काढायला घेतो आणि काहीच क्षणात जसं ते चित्र अतीव सुंदर दिसायला लागतं, तसंच असतं हे स्वप्नास्तित्व! काहीच क्षणात प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्येनुसार भरभरून सुख प्रत्येकाच्या स्वप्नातल्या अस्तित्वाकडे असतं. मन लावून ते आल्हाददायी चित्र आपण रंगवायला घेतो. ते चित्र अगदी मनासारखं पूर्ण होईपर्यंत आपण रंगवत असतो. पण ज्या क्षणी ते चित्र पूर्ण होतं, त्याच क्षणी circuit पुन्हा जोडलं जातं आणि आपण भानावर येतो!

पण या सगळ्यात गंमत अशी होते की, स्वप्नातलं अस्तित्व हे केवळ मृगजळ असतं आणि त्यात जगल्याने आपलं खरोखरीचं अस्तित्व कमी होत असतं! म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीचा, कामाचा पूर्ण आनंद आपण कधी घेऊ शकतो? जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून ते काम करतो. पण जर त्यावेळी वर्तमानकाळातलं circuitच break झालं, तर कुठून एकाग्रता येणार आणि कुठून आपण त्या कामाचा आनंद उपभोगू शकणार! सतत परतत बसायला लावणारी भेंडीची भाजी नेमकी शिजल्याचा क्षण किंवा चहाला हवा तसा लाल रंग येण्यासाठी, दूध घालायच्या आधी तो किती वेळ उकळावा हे कळण्यासाठी आपल्याला एकाग्रताच लागते. बॅडमिंटन खेळताना हव्या त्या जागी हव्या तितक्या वेगाने शटल जाणं, बॅक्टेरिया कल्चर अगदी नीट बनवून microscopeचा exact focus adjust करून हवा तो result येणं किंवा ‘मृत्युंजय’ मधलं कर्णाच्या तोंडातलं एक जबरदस्त वाक्य पूर्णपणे मनाला भिडणं, हे आपण १००% वर्तमानात असल्याशिवाय होणं केवळ अशक्यच! म्हणजे मन सुखवायला आपण स्वप्नं बघतो खरी, पण स्वप्नं बघताना आपण वर्तमानातला आनंद, सुख गमावत असतो! केवढा हा विरोधाभास! नेहेमीच्या रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूच्या किती गोष्टी निरखून बघतो? मनात साठवतो? दोनच आठवडयापूर्वी ओळख झालेल्या आणि पुन्हा दिसलेल्या व्यक्तीचं नाव आपण का विसरतो? सध्या सहवासात नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तिच्या लकबींसकट आपण तंतोतंत डोळ्यासमोर उभं का करू शकत नाही? एवढी कमी निरीक्षण किंवा स्मरणशक्ती आहे का आपल्याला? नाही! हे सगळं पूर्णपणे वर्तमानात न जगल्याने होतं. आपण पूर्णवेळ आपल्या अस्तित्वात जगतंच नाही! कुठल्याश्या मृगजळापायी आपण आपले हातचे आनंद गमावत असतो. म्हणजेच याचाच अर्थ, आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो..!

पण मला वाटतं या नाण्याला अगदी खणखणीत अशी दुसरी बाजू आहे! असं म्हणतात, स्वप्नं बघावीत. खूप मोठी स्वप्नं बघावीत. त्यानेच पंखात बळ येतं. वर्तमानात राहून पूर्ण एकाग्रतेने एखादं काम आपण चोख करू, त्यात पारंगत होऊ. दुसरंही तसंच करू आणि तिसरंही..पण पुढे काय? आणि अशी कामं का करत बसावं? याचं उत्तर आपली स्वप्नं देतात. प्रत्येकाच्या मते त्याला काय मिळालं की तो सुखी होईल ह्याचं उत्तर म्हणजे त्याची स्वप्नं! ही स्वप्नं त्याच्या जगण्याला एक उद्दिष्ट देतात. स्वप्नातलं जगणं म्हणजे सत्यात अथक जगण्यासाठी लागणारं इंधन. रखरखत्या उन्हात मिळालेली किंचीतशी सावली. एक मृगजळ.. जे तहान भागवत नाही पण पुढे जायचं बळ मात्र देतं..!

बऱ्याच वेळा आपण दु:खी होतो, रडतो, आपला आत्मविश्वास खूप वेळा कोलमडतो. पण आपलं मनंच असं आहे ना, जे फार वेळ दु:खी राहू शकत नाही. ते मग काही वेळ स्वप्नात जगू पाहतं. मग इंधन भरलं जातं. मनाला उभारी येते आणि आपण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने सत्यात जगायला सुरुवात करतो.

ह्याचाच अर्थ असा की पूर्णवेळ स्वप्नात जगणं चांगलं नाही, पण पूर्णवेळ सत्यातही जगणं अशक्यच असतं. जगताना कुठे खरचटलं तर फुंकर मारावी. ती स्वप्नातल्या अस्तित्वात जगायची वेळ असते. मन तेव्हा जणू बुद्धीला आर्जवत असतं, ‘बेहेने दे, मुझे बेहेने दे.. बेहेने दे घनघोर घटा, बेहेने दे पानी की तरहा|’

हा circuit ‘make’ आणि ‘break’ चा खेळ अगदी ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळासारखाच असतो. निसर्गासारखा मस्तपणे आपल्याला तो खेळता आला पाहिजे. तरंच आयुष्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू शकेल...!

Monday, June 14, 2010

ब्रायटनचा किनारा!




"ब्रायटनचा किनारा" असं नाव असलेल्या लेखात प्रवास-वर्णन, सहलीची कहाणी आणि भरपूर फोटो पाहायला मिळणार असा जर तुमचा अंदाज असेल तर तो जरा चुकलाय. ब्रायटन हा इतर सर्वसामान्य बीचसारखाच बीच असला तरी त्याचं महत्व भारतीयांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. कारण याच किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक अजरामर काव्य स्फुरलं, 'ने मजसि ने'! सावरकरांच्या काव्याबद्दल सर्वाना माहिती आहेच, पण हे काव्य जिथे स्फुरलं तो ब्रायटनचा किनारा आहे हा तपशील आपण फारसा लक्षात ठेवत नाही. कारण भारतात बसून इंग्लंडमधले सगळे किनारे सारखेच वाटतात. फार लांब कशाला जा, मला स्वत:ला ब्रायटनचं नाव माहिती असून देखील ते कुठेतरी विसरून जायला झालं होतं.
पण विस्मरण होवो किवा काहीही, अश्या गोष्टी गरजेप्रमाणे आठवतात खऱ्या! या वेळी पण असंच झालं. भटकायला जायचा ठराव पास झाला आणि ठिकाण ब्रायटन ठरलं तेव्हा अंधुकपणे हे नाव कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. संदर्भ लागत नव्हता. मग काय, गुगल झिंदाबाद! १५-२० मिनिट गुगलशी झटापट केल्यावर माहिती मिळाली की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'ने मजसि ने' ची रचना केली तो हाच किनारा. उगाच खूप भारी वाटलं, सावरकर जिथे जाऊन आल्याचा ठोस पुरावा आहे ती ही जागा आहे कळल्यावर काय होणार दुसरं (एकदा अंदमानला सुद्धा जायचंय)! कारण म्हणजे सावरकरांबद्दल असणारा नितांत आदर! जेव्हा जेव्हा त्यांचं नाव ऐकतो, त्यांच्याबद्दल कुठे काही वाचतो, पाहतो, तेव्हा केवळ नतमस्तक व्हावंसं वाटतं. अजून थोडी माहिती मिळाली तेव्हा असं कळलं की सावरकरांच्या 'ने मजसि ने' काव्याचं हे शतक-महोत्सवी वर्ष आहे. ब्रायटनला जायचा चाललंच होतं, डायरी मध्ये संपूर्ण कविता लिहून घेतली.
ब्रायटनला पोहोचलो तेव्हा एकदम टाईमपास मूड होता. ज्या मित्रांबरोबर गेलो होतो ते मित्र आहेत उत्तर-भारतीय! सावरकरांविषयी फारशी माहिती नसलेले. (का असावी, कारण सावरकरांनी कधी दिल्लीवर आपला हक्क सांगितला नाही, आणि तत्कालीन नेत्यांनासुद्धा असा सडेतोड नेता/मंत्री दिल्लीत असणं धोक्याचंच वाटलं असणार) ब्रायटनला पोहोचल्यावर खूप वेळ तर भटकण्यातच गेला. फुल टाईमपास , समुद्रात खेळा, फोटो काढा, चकाट्या पिटत बीचवर फिरा आणि अजून काय काय!
दुपार होऊन गेली होती. 'ब्रायटन', 'सावरकर', 'ने मजसि ने' डोक्यात होतंच. मग मी मित्रांना सावरकरांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना वाटलंच की काय बोअर करतोय हा (माझ्या वक्तृत्वाचा दोष), पण मी आपलं रेटलं पुढे! जेव्हा त्यांना कळलं सावरकरांविषयी, ज्यांनी देशासाठी २ वेळा काळ्या-पाण्याची सजा भोगली, सर्व व्यक्तिगत सुख-दु:ख बाजूला ठेवून फक्त देशाची सेवा केली तेव्हा त्यांनाही सावरकरांबद्दल आदरमिश्रित कुतूहल वाटायला लागलं. सावरकरांच्या 'ने मजसि ने' ची स्टोरी त्यांना सांगितली तेव्हा (मला सगळं हिंदीत अनुवाद करून सांगावं लागलं) बहुतेक त्या कवितेचा इफेक्ट झाला असावा कारण जेव्हा मी 'ने मजसि ने' म्हणायची कल्पना त्यांना सांगितली तेव्हा एका मित्राने माझ्याबरोबर कविता म्हणायची इच्छा व्यक्त केली. व्वा!



घोटाभर पाण्यात उभे राहून आम्ही दोघं डायरी मधून कविता वाचायला लागलो. (सुरुवातीला एक-दोन वेळा फक्त वाचली, कारण त्याला मराठी शब्दांची थोडी ओळख व्हावी असा उद्देश होता) जेव्हा त्याला थोडं जमायला लागलं तेव्हा आम्ही मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला एखादा मिनिट बिचकायला झालं, कारण एक तर मला गाता वगैरे अजिबात येत नाही, आणि आजुबाजुनी जाणारे गोरे लोक आमच्याकडे विशेष कुतूहलाने पाहत होते. पण जशी लय सापडत गेली तसा सगळ्याचा विसर पडला आणि संपूर्ण कविता म्हणून झाल्यावरच थांबलो. माझा मित्र आधीच थांबला होता, पण तो चक्क हात जोडून उभा होता; मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं, अजूनही वाटतं. स्वत:बद्दल सांगायचं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही म्हणून म्हणायचं की मी रडत नव्हतो, पण खूप भरून आलं होतं. सांगता येत नाही शब्दात, पण अतिशय सुंदर अनुभव होता तो! आणि एका महाकाव्याच्या शंभराव्या वर्षी आम्ही त्या तीर्थक्षेत्री जाऊन ते म्हणून आलो याचा विलक्षण अभिमान वाटत होता. एखादी गोष्ट करण्यात 'धन्यता वाटणे' काय असतं हे कळलं! त्या उर्मीमध्ये थोडा वेळ आम्ही तिथेच उभे होतो. नंतर कधीतरी थोड्या वेळाने आजूबाजूचं भान आलं, आणि आम्ही तिथून जेवायला गेलो. उरलेली ट्रीप पण मस्तच झाली पण 'ने मजसि ने' चा अनुभव त्यात सगळ्यात सुंदर होता. आयुष्यभर लक्षात ठेवावा असा!!!




(टीप: स्वा. सावरकरांचा फोटो आंतरजालावरून साभार!)

Thursday, June 3, 2010

सखये तुझ्याचसाठी..

एक गवताचं पातं होतं..
रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..
उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..
चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..

पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..

आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..
आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..
कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..

कारण..

कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..
आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..
आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..
त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..

आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं..

मीसुद्धा अगदी तसाच होतो गं..
त्याच त्या गवताच्या पात्यासारखा..

अस्तित्वाला विसरलेला, स्वाभिमानाला दुरावलेला..
दुःखात निराश होणारा अन सुखात हरवून जाणारा..
चारचौघांसारखा असणारा आणि चारचौघांसारखाच दिसणारा..

माझ्या अशा नेहमीच्या जगण्याला सोनेरी किरण दिल्याबद्दल आणि मला तुझा मानण्याबद्दल शतशः धन्यवाद..
ही मैत्री, आपलं प्रेम, हे नातं असंच निखळ राहो हीच माझी सप्रेम सदिच्छा..

- संदीप

Sunday, May 30, 2010

उद्विग्न!

आज नेट वर सर्फिंग करताना एक लिंक मिळाली. २६/११!

मुंबई हल्ल्याच्या एका वर्षानंतर बनवलेली ही फिल्म! फक्त १० लोक येतात काय आणि ३ दिवस सगळा देश धारेवर धरतात काय? १७० लोक या हल्ल्यात बळी पडल्याचा सरकारी आकडा आहे, आणि ४०० लोक जखमी झाल्याचा. इतका सगळा आगीचा आणि रक्ताचा खेळ मांडला होता यांनी आणि लष्कराची कुमक यायला २४ तास लागले. सी.एस.टी. वर, ताज हॉटेल मध्ये, ट्रायडेंट, लिओपोल्ड मध्ये, नरीमन हाउस मध्ये आपले पोलीस रक्त सांडून सांडून शहीद झाले, तेव्हा आपले गृहमंत्री हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत होते. मन शब्दश: उद्विग्न झालं हे सगळं पाहून!
आपला देश इतका पुढारलेला, 'इंडिया शायनिंग'वाला, मग आपल्याकडे या गोष्टी कशा होतात? मुंबई मध्ये हे एकदा झालं, काश्मीर मध्ये तर रोजचंच आहे. २०-२५ वर्ष झाली तिथे हे असलं सगळं चालू आहे, आणि आपण काही नाही करू शकत? का? का नाही आपल्या पोलिसांना संरक्षणाची आणि स्व-संरक्षणाची पुरेशी साधनं मिळत? का त्यांची अशी बिनकामाची धावपळ होते? गणपती मध्ये यांनी राबायचं, आय. पी. एल. च्या सामन्यासाठी यांनीच सुरक्षा यंत्रणा उभी करायची, चोर, दरोडे, लुटमार, आणि अजून असले असंख्य गुन्हे यांनीच हाताळायचे, दहशदवादी आले, तरी त्यांच्याशी यांनीच लढायचं, तेही जुनाट बंदुका, फडतूस पिस्तुलं, आणि काठ्या घेऊन, हे सगळं करताना मरावं लागलं तरी बेहत्तर! आणि इतकं सगळं करून नंतर हे शिव्यांचे धनी! आज किती लोक असे आहेत, ज्यांना रस्त्यावर पोलिसाने लायसन्स मागितल्यावर 'साला, आता हा लुटणार' असा वाटतं? कधी हा विचार मनात येतो का, की कदाचित हि एखादी शोध-मोहीम असू शकते. मान्य आहे की शक्यता कमीच असते, पण त्या १% शक्यतेवर आपल्यातले १% लोक तरी विचार करतात का? मग पोलिसांना शिव्या देण्यात काय अर्थ आहे? आज ही लिंक पाहून खूप काय काय मनात येऊन गेलं. आय. पी. एल. चालू होती, तिथे असे हजारो पोलीस गुरासारखे राबले, पण आपण अक्षरश: सगळं विसरून परत त्यांना मिस-मॅनेजमेंट साठी शिव्या देणार.
पोलीस तरी कुठे कुठे पुरे पडणार? शशांक शिंदे, तुकाराम ओंबाळे, कामटे, साळसकर यांनी आपलं आयुष्य काय असंच दान केलं की काय असा प्रश्न पडण्यासारखं वातावरण अजून आहे. आजही तो हरामी कसाब जिवंत आहे, आणि आपलं षंढ सरकार आणि आंधळी न्याय-व्यवस्था त्याला पोसते आहे. आता निकाल लागायला १.५ वर्ष लागण्यासारखं या केस मध्ये काय आहे, किवा सरकारी वकिलांनी ही केस इतक्या हलगर्जीपणे तयार केली आहे की ज्यात आरोपीच्या वकिलाला 'आरोपीला जन्मठेप मिळावी, त्याच्या कमी वयाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार व्हावा' असं म्हणायचा चान्स मिळावा? सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना देखील कसाब हा अजून जिवंत कसा राहू शकतो? आता त्याला फाशी सुनावली आहे त्याबद्दल माननीय न्यायाधीशांचे शतश: आभार, पण आता हाय-कोर्ट, सुप्रीम-कोर्ट, मग आपले 'दयावंत' राष्ट्रपती इतक्या सगळ्यातून जायला अजून २-३ वर्ष सहज लागतील! कसाबला पाळणाघरात ठेवायचा खर्च ३१ कोटी आहे. अजून ३-४ वर्ष म्हणजे साधारण अजून फक्त ८०-८५ कोटी लागतील. तेही आपणच देणार आहोत, कारण आपण करदाते आहोत. अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली त्याला वर्ष लोटून गेली, अजून त्याला फाशी देत नाहीयेत, मग कसाबला फाशी सुनावल्यावर त्याचा नंबर कधी लागायचा? आणि उद्या अफजल गुरूसारखाच कसाबनंदेखील दयेचा अर्ज दाखल केला तर मग फक्त 'नैसर्गिक' मृत्यूच त्याला सोडवू शकेल असं म्हणावं लागण्याइतकी बेकार परिस्थिती आहे. संसदेवर हल्ला करण्याचा मुजोरपणा करणाऱ्या अफजलच्या दयेच्या अर्जावर विचार करायला राष्ट्रपतींना इतका वेळ का लागावा? ह्या मुद्द्यावर विचार करायला त्यांच्याकडे वेळच नाहीये का? त्यांना या मुद्द्यावर विचार करायला आपल्या गृहमंत्रालयाने हा मुद्दा त्यांच्याकडे पाठवला तरी आहे का? जर संसदेवरच्या हल्ल्यात कोणी सांसद जखमी झाला असता, किंवा त्याच्या जीवाचं काही बरवाईट झालं असतं तर अफजल इतके वर्ष जिवंत राहिला असता? किंवा ताज/ट्रायडेंट मध्ये एखादा 'बिगशॉट' चचला असता तर कसाबची केस अशीच लांबली असती? 'नेत्यांना एक न्याय आणि सामान्य जनतेला केवळ अन्याय' हे तर आपलं अलिखित सरकारी धोरण आणि आपल्या राज्य-घटनेचं दु;ख आहे. देशाच्या सुरक्षेशी थेट संबंध असलेल्या ह्या विषयांवर सरकारशी भांडायला आपल्या नेत्यांना वेळ का मिळू नये? थरूर आणि मोदी नावाच्या मस्तवाल खोंडात चाललेली साठमारी चर्चायला फक्त लोकसभाच उरली होती, तिथेही असल्या नासक्या मुद्द्यावरून गुद्दागुद्दीची वेळ यावी? नेतेमंडळींचं जाऊ द्या, ज्या हिणकस बुलेट-प्रुफ जॅकेटमुळे करकरेंचा मृत्यू झाला, ते जॅकेट कचराकुंडीत सापडलं. का, तर म्हणे हॉस्पिटल मधल्या कुणा कर्मचाऱ्याने 'चुकून' फेकलं होता. व्वा! आणि त्यावर जोरदार चर्चा करून नवीन अत्याधुनिक जॅकेट घ्यायचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला, त्या जॅकेटची खरेदी अजून झालीच नाहीये. कारण तसल्या जॅकेटना फार खर्च येतो म्हणे. साधारण २.५ लाखाचं एक जॅकेट आहे. जर ते महाग तर मग कसाब काय फुकट आलाय का? की आपल्या परम-मित्र शेजाऱ्याने आंदण म्हणून धाडलाय? आणि तरीसुद्धा आपली अर्थ-व्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे म्हणे! अरे, जिथे गरजेच्या गोष्टी विकत घ्यायला पैसे पुरत नाहीत, तिथे कसल्या विकासाच्या गप्पा करता? की विकास फक्त पैसे उडवण्यात आहे? दंतेवाडामध्ये ७७ जवान शहीद झाले, पण कुणाला फरक पडला? विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यासारखं केलं, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यासारखं केलं, पंतप्रधानांनी तो नाकारल्यासारखं केलं. पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'! असं का? मग गृहमंत्र्यांनी 'नक्षलवाद संपवण्याची' घोषणा केली. नक्षलवाद संपवला पाहिजे हा साक्षात्कार सरकारला होण्यासाठी ७७ जणांनी हौतात्म्य पत्करावं का? आणि इतकं होऊनही नक्षलवाद मिटवण्यासाठी काही ठोस पाऊल उचलल्याचं ऐकिवात नाही. का? बंदुकीच्या जोरावर मुद्दा संपवायची भाषा करून काही उपयोग नाही हे आमच्या 'अर्थ-तज्ञ' गृहमंत्री आणि पंतप्रधानांना कळत नसेल काय? नक्षलवादाचा मुद्दाच मुळी निखळ दारिद्र्यातून जन्माला आलाय, त्यावर या उधळपट्टी करीत 'विकासाच्या' मार्गावर चालणाऱ्या 'गरीब' देशात काय आणि कसा उपाय निघणार? स्वातंत्र्यानंतर मिळालेली निष्क्रिय धर्म-निरपेक्षता, आणि आताची अमर्याद सहनशीलता - या असल्या कुबड्या घेऊन आपला देश एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाहीये याची जाणीव कधी होणारच नाही का? पेशन्स संपायच्या आत काहीतरी चांगलं घडावं अशी किमान अपेक्षा सामान्य नागरिकाने मनात बाळगूच नये का? की जे काही चाललंय त्याकडे डोळे विस्फारून पाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही ही अगतिकताच आता मानसिकता म्हणून स्विकारावी? असं गुमान सगळं सोसण्यापलीकडे आपण काहीच करू शकणार नाही का? जिथे देशाच्या सार्वभौमत्वालाच काळिमा फासणाऱ्या घटना घडतायेत आणि त्यावर कुठलीही ठोस कारवाई कारण सरकारला जमत नाहीये, तिथे असल्या समस्यांकडे कोण लक्ष देणार? 'आम्ही ह्यांव करू, आम्ही त्यांव करू' असल्या फालतू गप्पा आणि घोषणा यापलीकडे कोणीही काहीही करत नाहीये.
हे सगळं माझ्याच देशात का घडावं? इतके सगळे प्रश्न माझ्याच देशात का जन्माला यावेत? आणि त्यांच्या उत्तरांऐवजी अजून प्रश्नच का समोर यावेत? ही हजारो प्रश्नांची कहाणी कधी सुफळ संपूर्ण होणार?

Wednesday, May 26, 2010

मला काय आवडतं?

मला बरंच काय काय आवडतं.
मला लोळायला खूप आवडतं.
लोळता-लोळता पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला बसून, उभ्याने, प्रवासात, ऑफिसमध्ये, शाळेत, कॉलेजात - सगळीकडे पुस्तक वाचायला खूप आवडतं.
क्रिकेटची मॅच बघायला आवडतं. वन-डे मॅचमध्ये ओवर २५ नंतर ओवर ४० पर्यंत मी एखादा पुस्तक घेऊन बसतो. कारण मॅचमधला सगळा रटाळपणा तेव्हाच चालू असतो.
मला फुटबॉलची मॅच पाहायला खूप आवडतं. दीड-दोन तास एकाच जागी गुमान बसायचे असे प्रसंग फार थोडे आहेत. फुटबॉलची मॅच चालू असताना धनूला फोन करून मॅच बद्दल सविस्तर आणि बाकी अवांतर चर्चा करायला फार आवडतं.
मला कुठलाही खेळ पाहायला आवडतो. मला कार्टून्स पाहायला खूप आवडतं. मला पिक्चर पाहायला आवडतात. मला हळू आवाजात गाणी ऐकायला आवडतात.
मला मित्र जमवून दंगा घालायला फार आवडतं. धनूच्या गाडीतून रात्र-रात्र भटकायला आवडतं. स्वत:ची सगळी गुपितं आणि अनुभव शेअर करायला याहून सेफ जागाच नाहीये असं वाटतं. मग पहाटे पहाटे 'स्वीकार'चे पोहे; वा!
मला फोनवर बोलायला आवडतं. मुद्दलात मला बोलायलाच फार आवडतं. त्यामुळे समंजसपणे माझी बडबड ऐकणारे दर्शनसारखे मित्र मला खूप आवडतात. धनू आणि सारंगशी वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्या विषयावर गप्पांचं गुऱ्हाळ लावायला जाम आवडतं.
अनुपबरोबर 'क्रिकेट' या देशव्यापी विषयावर अतिशय गंभीरपणे बोलायला आवडतं. अनुपच्या बाईकवर बसून झुंsग फिरायला आवडतं. लोक कितीही शिव्या देवोत, मला त्याचं ड्रायव्हिंग जाम आवडतं. आणि इतकं आवडूनही त्याच्या ड्रायव्हिंगबद्दल कंड्या पिकवायलाही खूप आवडतं.
योगेश भेटला की मला 'बाजारबुणग्या ' म्हणतो. मी पण त्याला 'बुजगावण्या' म्हणतो. मग आम्ही दोघं एकमेकांना १५-२० वेळा तरी असंच म्हणून घेतो. मस्त वाटतं एकदम!
मला खेळायला आवडतं. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, पत्ते सगळं सगळं खेळायला आवडतं. मला जिंकायला पण खूप आवडतं. मी आणि धनू बॅडमिंटनमध्ये अनुप आणि सारंगला हरवतो तेव्हा आरडा-ओरडा करायला आवडतं. आणि हरलो तरीपण खुन्नसमध्ये पुढची मॅच खेळायला खूप आवडतं! अशा वेळी 'आता हरलो तर कुणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही' असं एक वातावरण तयार होतं, मला ते टेन्शन आवडतं! त्या वेळी एकेका पॅाइंट वरून भांडाभांडी करायला आवडतं.
अमृताबरोबर पुस्तकांबद्दल बोलायला खूप आवडतं. आम्ही वाचलेली पुस्तकं, मी वाचलेली पुस्तकं, तिने वाचलेली पुस्तकं, त्याचं डिस्कशन. अनेक कंगोरे असलेले विषय असतात. एखाद्या पुस्तकाची सगळी ष्टोरी देखील काही वेळा एकमेकांना सांगितली आहे. मला ते पण खूप आवडतं.
मला स्मिताबरोबर कुठल्याही गप्पा मारायला आवडतं. मजाच येते एकदम! मग त्या गप्पा आठवून-आठवून हसायला आवडतं!
मला श्वेताला चिडवायला आवडतं, मग ती पण खोटं खोटं चिडते, सगळी गम्मतच! तिच्या डॉक्टरकीला आणि तिच्या साबुदाण्याच्या गोळ्यांना चिडवायला मला आवडतं बुवा. मग ती मला चुकीच्या गोळ्या देऊन आजारी पाडायच्या धमक्या देते ते पण आवडतं.
मला श्रद्धाला त्रास द्यायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूपच! तिच्याशी भांडायला पण खूप आवडतं. सगळी भांडणं करून ती गाल फुगवून बसली की तिच्याकडे बघून हसत बसायला आवडतं. मग मी असा हसायला लागलो की ती 'माझा भाऊ अतिशय नालायक आहे' असा चेहरा करते, मग तर मी पोटात स्फोट झाल्यासारखा हसायला लागतो. मला ते पण खूप आवडतं.
मला बाबांशी घरातल्या प्रत्येक विषयावर बोलायला आवडतं. मग तो विषय नवीन टूथ-पेस्ट आणण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंत कुठलाही असो. मला आवडतं. बाबा माझं ऐकून घेतात तेच मला जाम भारी वाटतं!
मला माझी आई खूप आवडते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत टी. व्ही. पाहायला मला खूप आवडतं. ती जेव्हा डोक्याला तेल लावून देते तेव्हा तिथेच झोपून जायला खूप आवडतं. आईच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात.
मला आजीला नमस्कार करायला आवडतं. नमस्कार करायला वाकलो की ती पाठीवर जोरात शाबासकी देते ते मला खूप आवडतं. ती माझ्या गालावर हात फिरवून आशीर्वाद देते तेव्हा मला फार मस्त वाटतं; म्हणजे पोटातून एकदम असं उबदार फिलिंग येतं.
आशुला फोन करून नवीन गाणी आणि कविता चघळायला खूप आवडतात. आम्ही दोघं तासनतास बोलत बसतो, विषय नुसते आकाशातल्या ढगांसारखे इकडून तिकडे भटकत असतात. मला ते फार आवडतं.
अवनी आणि रीधूशी खेळायला खूप आवडतं. रीधू जेव्हा पाठीवर किवा पोटावर बसून उड्या मारते तेव्हा खूप मजा वाटते. मला रीधूचं बोट पकडून फिरायला जायला खूप आवडतं.
मला ऑफिसला जायला आवडतं. ऑफिसमधल्या कुठल्याही गप्पांचा शेवट अनुपला चिडवण्यात करायला जाम मजा येते. वैभवला 'भूभू' म्हणायला आवडतं. अनुप, वैभव आणि संदीपबरोबर जाऊन त्या 'उपाला' नावाच्या लोकोत्तर टपरीमध्ये ऑम्लेट खायला खूप आवडतं. दीपेनबरोबर टाईमपास करायला आवडतं. आम्ही नवीन पुस्तकं, सिनेमे, टेनिस, क्रिकेटच्या गप्पा मारत बसतो, मला ते खूप आवडतं. टपरीवर जाऊन चहा प्यायला आवडतं. निवेदिताला त्रास द्यायला आवडतो. रश्मीला चिडवायला आवडतं.
मला संदीपच्या घरी जाऊन टाईमपास करायला खूप आवडतं. सोनू काय मस्त चहा बनवते. ते दोघं मधेच काश्मिरीमधून बोलतात. ते काय बोलत असतील याचे तर्क लावायला खूप आवडतं.
गोलू, सँडी, केतन बरोबर टवाळक्या करायला खूप आवडतं. मी आणि केतन बाईक्सवरून एफ. सी. रोडवर भटकायला जातो ते खूप आवडतं. मी आणि गोलू खूप वेळा खूप सिरीयस चर्चा करतो ते पण मला आवडतं. आम्ही सगळे मिळून गणूची शाब्दिक धुलाई करतो ते पण आवडतं!
काय सांगू आणि किती सांगू? थोडसंच सांगितलं आणि खूप काय काय राहून गेलं. मला सगळंच खूप आवडतं. इतक्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, माझी मजा आहे एकूणच!!!

Tuesday, May 25, 2010

फुगेवाला

प्रत्येक माणूस एक फुगा घेऊन जन्माला येतो. इगोचा फुगा! बालवयात तो न फुगलेल्या अवस्थेत असतो. पण जसं जसं कळायला लागतं तशी तशी त्या फुग्यात हवा भरायला सुरुवात होते...

३री-४थीत असताना ‘अरे, तो ‘ढ’ मुलगा आहे. त्याला नको आपल्या ग्रुपमधे घ्यायला.’ असं कधी आपण मित्रांना म्हणतो. आता हे चूक की बरोबर हा भाग बाजूला ठेवूयात. पण तो मुलगा ‘ढ’ वाटतो कारण आपण स्वतःला हुशार वाटत असतो. आणि आपण हुशार का, तर आपल्याला परीक्षेत जास्त मार्क असतात! म्हणजेच ‘sense of achievement’ आपली ‘image’ तयार करत असते. आपल्या इगोच्या फुग्यात हवा भरत असते. प्रत्येक achievement बरोबर, प्रत्येक झालेल्या कौतुकाबरोबर हवा भरली जाते.

आता achievement किंवा केलेलं कौतुक हे अभ्यासातल्या हुशारीपुरतंच मर्यादित नसतं. कोणी खेळात पुढे असतं, कोणी कुठल्या कलेत पुढे असतं, तर कोणी सगळ्यांकडून ‘गुणी मुलगा’ अशी पदवी मिळालेलं असतं! आणि या प्रत्येक माध्यमातून फुगा फुगवला जात असतो. त्यामुळे होतं असं, की जेव्हा ९वी-१०वी येते, तेव्हा प्रामुख्याने मुलांचे ३ गट पडलेले असतात. पहिला गट असतो हुशार मुलांचा! या गटात ५-६ मुलं असतात. त्यांच्यात पहिल्या तीनात नंबर येण्यासाठी चुरस असते. आपलं करियर उत्कृष्टच होणार असा विश्वास त्यांचा फुगा त्यांना देत असतो आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांची नाही म्हटलं तरी त्यांना थोडीफार कीव येत असते. दुसरा गट असतो ‘हिरो’ मुलांचा! जे खेळात नाहीतर ‘Extracurricular activities’ मधे पुढे असतात आणि अभ्यासात बऱ्यापैकी असतात. त्यांचा फुगा त्यांना सांगतो की ही पहिली पाच मुलं म्हणजे फक्त पुस्तकी किडे आहेत! पुस्तकं चावून आयुष्यात काही होत नसतं. सर्वांगाने विकास झाला पाहिजे. तुम्हीच खरे ‘हिरो’ आहात! आणि तिसरा गट असतो थोडा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांचा. त्यांच्या achievements तशा कमी असतात. कौतुकही कदाचित फारसं झालेलं नसतं. त्यांच्या फुग्यात खूप कमी हवा असते. त्यामुळे त्यांचे फुगे काही बोलण्याच्या अवस्थेत नसतात!

पुढे कॉलेजमधे गेल्यावर कला-गुणांना व्यक्त करायला मोठा मंच मिळतो. तिथे फुगे फुगतात. काही मुली सौंदर्याच्या जोरावर किंवा आपल्याला मुलं किती भाव देतात या गोष्टीमुळे हवा भरत असतात. कॉलेजच्या cultural ग्रुप मधल्या मुलांचे फुगे तर एवढे मोठे असतात की एखादा जुनियर, त्याला अनुभव नसल्यामुळे काही चांगलं करूच शकत नाही यावर त्यांचा गाढ विश्वास असतो! ऑफिसमधे बॉसच्या फुग्यात हवा असते ती त्याला मिळालेल्या खुर्चीमुळे. आणि ‘आपला बॉस बिनडोक आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर आज तो तिथे आहे.’ असा विचार जो जुनियर लोकांच्या मनात येतो, तो त्यांच्या फुग्यातल्या हवेमुळेच, नाही का!

हा इगोचा फुगा कधीकधी पंक्चर सुद्धा होतो! आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्याच गोष्टीत कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितल्यावर आपल्या फुग्याला भोक पडतं आणि हवा निघून जाते. पण निसर्ग तात्काळ आपल्याला पंक्चर काढून देतो आणि आपण पुन्हा त्यात हवा भरायला सज्ज होतो!

हाच फुगा कारणीभूत ठरतो नवरा-बायकोच्या ‘Classic’ भांडणांना! २ पिढ्यांपूर्वी बायका फक्त चूल आणि मूल करायच्या. तेव्हा फक्त पुरुषांच्या फुग्यात हवा असायची! नवऱ्याने उठ म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं! पण आज मुली शिकल्या. मुलांच्या खांद्याला खांदा लावून achieve करायला लागल्या. आता दोघांचे फुगे फुगलेले असतात. त्यामुळे ‘एवढं असेल तर तू कर ना स्वयंपाक. घर सांभाळ. मी जाते फक्त कमवायला.’ किंवा ‘नेहेमी तुझाच मुद्दा कसा काय रे बरोबर असतो? भांडण तुझ्याच वाक्याने संपलं पाहिजे का?’ ही अशी वाक्यं हमखास बोलली जातात!

‘बघितलंस, तिने स्वत:हून ओळखही नाही दाखवली. मीपण नाही दाखवणार!’, ‘मी का सॉरी म्हणू? तो पण चुकलाय. माझं घोडं काही त्याच्यावाचून अडत नाही!’... ही सगळी त्या फुग्यातल्या हवेचीच करामत..!

पण जरा विचार केला तर लक्षात येईल की हा हवा भरलेला फुगा जगायला आवश्यक असतो. जर त्याची काही गरजच नसती, तर निसर्गाने माणसाला त्याच्या जन्माबरोबर तो दिलाच नसता. माकडाचा माणूस होताना जसं गरज नसल्यामुळे निसर्गाने शेपटी काढून घेतली, तसंच त्याला फुगाही काढून घेता आला असता. आणि त्या फुग्यात हवाही असणं महत्वाचं आहे. नाहीतर अवस्था ९वी-१०वीतल्या त्या तिसऱ्या गटातल्या मुलांसारखी होईल. हवा भरलेला फुगा आपल्याला आत्मविश्वास देतो. फक्त त्या भरल्या जाणाऱ्या हवेवर आपलं नियंत्रण हवं. कुठली आणि किती हवा भरावी हे आपणच ठरवायचं. पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. फुग्यातल्या हवेने मनाला उभारी यावी, पण त्याच हवेने आयुष्य ‘पोकळ’ होणार नाही ना ह्याची काळजी आपण घ्यायची..

Friday, May 21, 2010

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम, म्हणजे ते 'First and Last' प्रेम नाही म्हणायचं मला. 'प्यार जिंदगी में सिर्फ एक ही बार होता है' वगैरे असली काही भानगड नाहीये ही! हे Love, 'Love at first sight' जरी असलं तरी ती अगदीच 'First sight' आहे हो! आपण त्याला भाबडं प्रेम म्हणूयात. शाळेत होणारं प्रेम! आता शाळेत म्हणजे ८ वी , ९ वी, १० वी नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भाबडे मुळीच नसतो! आणि दुसरं म्हणजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षेची tensions वगैरे असतात. हे प्रेम, 'प्रेम कशाशी खातात' हेही कळायच्या आधीचं आहे! अगदी ३ री, ४ थीतलंच म्हणा ना...!

नवी कोरी वह्या-पुस्तकं आणि ती ठेवायला नवं कोरं दप्तर पाठीवर अडकवून आपण नवीन शालेय वर्षासाठी तयार होतो. पहिल्या दिवशी वर्ग भरतो आणि आपलं 'तिच्याकडे' लक्ष जातं. कडक इस्त्रीचा गणवेशाचा फ्रॉक, त्याला फ्रीलच्या फुगेदार बाह्या, खांद्यांपर्यंत लांब केस, डोक्यावर पांढरा hair-band, त्याला काळी क्लिप लावून त्यात ताज्या-टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अडकवलेला, डोळ्यात काजळ घातलेलं..पापण्यांची नाजूक तर नाहीच नाही, पण अतिशय स्पीडात फडफड! गौर वर्ण..दोन्ही गालांवर छानशा खळ्या..आणि तोंडाची कधीही न थांबणारी बडबड! हे असं सगळं पाहताना, आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यातल्या, हृदयाच्या पेटीतल्या, सगळ्यात आतल्या चोरकप्प्यात तिने क्षणार्धात जागा घेतली असते! आणि ती जागा एवढी लहान असते, की त्यात फक्त तीच मावू शकते. तिच्या वयाला, आडनावाला, आई-बाबांना त्यात मुळीच जागा नसते!

मराठीचा तास होतो, गणिताचा होतो, शास्त्राचा होतो, तरी अधून-मधून तिच्याकडे लक्ष जाणं काही थांबत नाही. मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसते. डब्याखाली मस्त मोठ्ठा टर्किश कापडाचा नॅपकिन अंथरते आणि त्यावर डबा ठेवून मैत्रिणींशी गप्पा मारत मारत मधेच फिदीफिदी हसत डबा खाते. आपण तिच्या गप्पा ऐकायला गेलो, तर ऐकू येतं, " अगं काय गंमत झाली..आमच्या त्या शोभाताई आहेत किनई, त्यांच्याकडे किनई, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे! ते किनई.." आणि गप्पा ऐकून झाल्यावर आपण त्या ‘किनई’ शब्दाच्या प्रेमात पडलेलो असतो! आत्तापर्यंत आयुष्यात आपण ३-४ हिंदी सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे 'हिरो', 'हिरोईन' या concepts अर्धवट का होईना कळलेल्या असतात. पण आपल्याला तिच्याकडे बघितल्यावर सिनेमातली नटी का आठवतीय, ते मात्र कळत नसतं..!

संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण घरी येतो. खांद्यावरचं दप्तराचं ओझं काढून, बूट न काढता तसेच आरशात बघायला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारे हसायचा प्रयत्न करून, कुठेतरी छोटीशी तरी खळी पडतीय का.. हे बघत असतो! आईला कळत नाही, ह्याला एकदम काय झालं! मग आपणच आईला म्हणतो, "आई, सांग ना, मी असा मोठ्ठं हसल्यावर मला इकडे उजवीकडे खळी पडते ना?" आई बघते आणि म्हणते, "नाही रे.." "आई पडते ग..छोटीशी पडते.." मग आई विचारते, " काय रे, डबा खाल्लास का? आवडला का?" "हो खाल्ला. आई पण किती भंगार नॅपकिन दिलायस! हा नको मला." "अरे, नवीन आहे तो राजा.." "नाही ग आई. भंगार आहे तो. मला तो, तसा टॉवेलसारखा पंचा असतो बघ..आणि तो पंचा कापून नॅपकिन बनवतात..तसा दे..!”

काही दिवसांनी 'मुलं फार दंगा करतात' म्हणून बाई मुलं-मुलींना शेजारी बसवायचं ठरवून उंचीप्रमाणे उभं करतात. तिकडे पोरींचा कलकलाट सुरु असतो, 'शी बाई! नको हो बाई! बाई आम्ही शांत बसतो. मुलांमुळे आम्हाला का शिक्षा..?" आणि इकडे आपण पहिल्यांदाच गणपतीबाप्पाचा धावा करत असतो! पण आपलं नशीब कुठे आलंय एवढं चांगलं..! आपल्या शेजारी दुसरीच कुठलीतरी मुलगी बसते. 'ती' वर्गातल्या कुठल्यातरी 'ढ' मुलाच्या शेजारी बसलेली असते. आणि 'देवबाप्पाला कधीपासून 'ढ' मुलं आवडायला लागली?!' असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो..

ती आपल्या शेजारी नसली म्हणून काय झालं..आपण स्वप्नांच्या नगरीत केव्हाच रममाण झालेलो असतो! 'समजा ती माझ्या शेजारी बसत असती आणि समजा लिहिताना तिच्या पेन्सिलीचं टोक तुटलं आणि तिच्याकडे दुसरी कुठलीच पेन्सिल नसली..तर मी माझ्या कंपासच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली, माझी सगळ्यात लाडकी पेन्सिल तिला लिहायला देईन!' आपणही कधी ती लाडकी पेन्सिल वापरत नसतो! जणू तिच्यासाठीच ती जपून ठेवलेली असते..संध्याकाळी मित्रांबरोबर घरी जाताना रस्त्यात चिंचा घ्यायला आपण थांबतो. एक रुपयाचा सगळ्यात मोठा आकडा आणि अजून थोड्या चिंचा विकत घेतो. 'ती आत्ता इथे असती, तर मी तिला हा सगळ्यात मोठा आकडा दिला असता!' स्वप्नांचे घोडे दौडतच असतात..

बाई तिला कधी रागावल्या की आपल्याला बाईंचाच राग येत असतो! तिला कधी हातावर पट्टी मारली की आपलाच हात खसकन मागे जातो..खेळात आपला हाउस जिंकला नाही तरी चालेल, पण तिचा जिंकावा असं मनोमनी वाटत असतं..तिला 'impress' करायला म्हणून आपण एवढा मनापासून अभ्यास करतो, की चक्क आपला पहिला नंबर येतो! आणि तेव्हा आई-बाबांना वाटतं आपल्या पोटी हिरा जन्माला आलाय..! खरं म्हणजे वार्षिक परीक्षेला थोडं वाईट वाटत असतं की आता सुट्टीत तिची भेट होणार नाही. सुट्टीत कुठेतरी रस्त्यात भेटावी असं वाटत राहतं.. पण ते तेवढ्यापुरतंच! एकदा सुट्टीतला दंगा सुरु झाला की थेट पुढच्या वर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळेसच तिची आठवण होते! आणि आता पुन्हा भेट होणार म्हणून आपण खुशीत शाळेत जातो!

पालक सभेला वाटतं, तिच्या आईने येऊन आपल्या आईशी बोलावं..म्हणावं, " तुमचा मुलगा केवढा हुशार आहे! कसा अभ्यास करतो तो..?" आणि मग त्यांच्या गप्पा व्हाव्यात..मैत्री व्हावी..पुढे लग्नाची बोलणी व्हावीत! स्वप्नांचे घोडे आता आकाशात उडत असतात..! पण दुसऱ्याच क्षणाला वाटतं, नको रे बाबा! तिची आई विचाराची, 'कसा अभ्यास करतो?' आणि आपली आई म्हणायची, " अहो, काय सांगू, करतंच नाही हा अभ्यास! सारखं मागे लागावं लागतं त्याच्या..!"

कधीतरी चुकून-माखून एकदाच ती आपल्याशी बोलते. गैरहजर राहिल्याने, बुडलेलं भरून काढायला तिला 'हुशार' मुलाची वही हवी असते..आपण ती वही तिला देताना दोनदा तपासून घेतो, की कधी घाईघाईत लिहिताना अक्षर तर खराब आलं नाहीये ना..! तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो..

पण या भाबड्या प्रेमाचं आयुष्य अगदीच कमी असतं. ते कधी संपतं, कळतही नाही. बरगड्यांच्या पिंजऱ्यातलं, हृदयाच्या पेटीतल्या त्या चोरकप्प्यातलं ते प्रेमाचं फुलपाखरू आपल्या नकळत उडून जातं..आणि ते एकटं उडत नाही, आपल्या निरागस बालपणालाही त्याच्याबरोबर घेऊन जातं..भाबडं प्रेम, ही भाबड्या वयाची शेवटची अवस्था असते. आणि हे प्रेम संपणं हीच मोठं झाल्याची पहिली खूण असते..


(हाच लेख http://sushant-thoughts.blogspot.com/ येथेही उपलब्ध)

फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात फिफा वर्ल्ड कप २०१०!!! (२)

भाग-२
(भाग १ इथे वाचायला मिळेल!)

गेल्या वेळी फुटबॉल वर्ल्डकपच्या फक्त गप्पा झाल्या. यावेळी थोडी टेक्निकल माहिती द्यायचा प्रयत्न आहे. सुरुवात आपण पात्रता फेरीपासून करूयात. कारण फिफा वर्ल्डकपशी संबंधित भारताचं नाव फक्त पात्रता फेरीतच येऊ शकतं. खरं सांगायचं तर १९५० साली भारत वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरला होता, पण अनवाणी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूना बुटांची सवय नव्हती, आणि वर्ल्डकप मध्ये बूट घालूनच खेळण्याचा फिफाचा नियम आहे. त्यामुळे तेव्हा पात्र ठरूनही आपण संघ पाठवला नव्हता (कमाल आहे). तेव्हापासून पात्रता फेरीच्या पुढे आपली मजल कधी गेलीच नाही (माज नडला). असो!
तर, फिफाने जगभरातील संघांचे सहा विभाग केले आहेत.
१. AFC (एशियन फुटबाल कॉन्फेडरेशन),
२. OFC (ओशेनिक (पॅसिफिक) फुटबॉल कॉन्फेडरेशन),
३. CONCACAF (कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ, सेन्ट्रल अमेरिकन ॲन्ड कॅरीबियन आसोसिएशन फुटबॉल),
४. UEFA (युरोपिअन फुटबॉल असोसिएअशन),
५. CAF (कॉन्फेडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉल),
६. CONMEBOL (साउथ अमेरिकन फुटबॉल कॉन्फेडरेशन).
यात भारत हा AFC (एशियन फुटबाल कॉन्फेडरेशन) गटात आहे. पात्रता फेरीच्या पहिल्याच राउंड मध्ये लेबनॉन कडून ६-३ (४-१, २-२) असा पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचं आव्हान यावेळी सुरुवातीलाच संपुष्टात आलं. पात्रता फेरीतून अंतिम ३२ संघांमध्ये गेलेल्यांची विभागवार नावे दिली आहेत. त्याकडे पाहिलं असता असं लक्षात येतं की जगाच्या पाठीवरील खूप छोटे, आणि एरवी आपल्या खिजगणतीत देखील नसलेले देश (यात अनेक गरीब देशही आहेत) वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत पण १ अब्ज लोकसंख्येच्या भारताला ३० गुणी खेळाडूंचा संघ बनवणं खूप जड जातंय. गेल्या ६० वर्षात तरी हे जमलेलं नाहीये. जागतिक क्रमांक १३२ असलेल्या भारतीय संघाला नजीकच्या काळात तरी अशी संधी मिळण्याचा चान्स जवळपास नाही. अतिशय उच्च प्रतीचे खेळाडू एकाच वेळी खेळले तर कदाचित जमू शकेल. सध्या भारतीय फुटबॉलला बरे दिवस येतायेत. 'नाईके' सारख्या प्रयोजकामुळे काही आर्थिक आघाड्यांवर विशेष प्रगती होऊन खेळाचा किमान दर्जा सुधारलाय हे मात्र नक्की! खालील पात्र संघांच्या यादीत भारताचे नाव यावे अशी मनापासून इच्छा आहे.

पात्र संघांची विभागवार नावे:
एशियन संघ (४ जागा / ४३ देश): ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया
ओशेनियन संघ (१ जागेची शक्यता / १० देश): न्यूझीलंड (एशियन ओशेनिक यांच्यातील कॉमन जागा जिंकून पात्र ठरले आहेत)
उत्तर, मध्य अमेरिकन आणि कॅरीबियन संघ (३ जागा / ३५ देश): अमेरिका, मेक्सिको, होन्डुरास
युरोपियन संघ (१३ जागा / ५३ देश): डेन्मार्क, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, ग्रीस, इटली, हॉलंड, पोर्तुगाल, सर्बिया, स्लोवेनिया, स्लोवाकिया, स्पेन, स्वित्झर्लंड
आफ्रिकन संघ (५ जागा / ५३ देश): अल्जेरिया, कॅमेरून, आयव्हरी कोस्ट, घाना, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका (यजमान असल्याने पात्र ठरले आहेत)
दक्षिण अमेरिकन संघ (४ जागा / १० देश): आर्जेन्टिना, ब्राझील, चिली, पॅराग्वे, युरुग्वे (उत्तर अमेरिका-दक्षिण अमेरिकेमधील कॉमन जागा जिंकून पात्र ठरले आहेत)

या पात्रता फेऱ्या झाल्यानंतर ४ डिसेंबर २००९ ला मुख्य स्पर्धेचे ड्रॉ काढले गेले. त्यामध्ये पात्र ठरलेल्या ३२ संघांना ८ वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. स्पर्धेची मुख्य फेरी या ८ गटात होईल. प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

ग्रुप ' A ' : दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, युरुग्वे, फ्रांस
या गटातून फ्रांस आणि मेक्सिको आगेकूच करतील अशी अपेक्षा आहे. पण युरुग्वेचा संघ एक जागा बळकावू शकतो, त्यामुळे या गटात थोडीफार चुरस आहे.

ग्रुप ' B ' : आर्जेन्टिना, नायजेरिया, दक्षिण कोरिया, ग्रीस
'B' गटातून मधून आर्जेन्टिनाची आगेकूच स्पष्ट आहे. दुसऱ्या जागेसाठी उरलेले तीन संघ तुल्यबळ आहेत. आर्थिक डबघाईला आलेल्या ग्रीसला बाद फेरीतला प्रवेश सुखावह ठरावा. पण ग्रीसच्या या सुखस्वप्नात दक्षिण कोरिया बिब्बा घालू शकतो. दक्षिण कोरियाचा संघ प्रतिस्पर्ध्याला दमवून हरवण्यात वाकबगार आहे. ग्रीसच काय, पण आर्जेन्टिनासुद्धा दक्षिण कोरियाविरुद्ध जपूनच खेळताना दिसेल.

ग्रुप ' C ' : इंग्लंड, अमेरिका, अल्जेरिया, स्लोवेनिया
ग्रुप 'C' मधून इंग्लंड आणि अमेरिका हे थेट पुढे जाऊ शकतात. बाकीचे ग्रुप पाहता हा ग्रुप सगळ्यात सोपा म्हणावा लागेल.

ग्रुप ' D ': जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, घाना
'D' गटातून जर्मनी पुढे जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. माझ्यातला जर्मन समर्थक उड्या मारून मारून हे वाक्य बदलून 'जर्मनी नक्की पुढे जाणार' असं लिहायला सांगतोय. पण पूर्णपणे निष्पक्ष राहून शक्यता मांडण्याचा प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलिया अतिशय धोकादायक संघ आहे. तसेच घानाला कमी लेखून चालणार नाही.

ग्रुप ' E ' : हॉलंड, जपान, डेन्मार्क, कॅमेरून
'E' गटातून दोन चांगल्या संघाना मुख्य फेरीतूनच स्पर्धेबाहेर जावे लागेल. हॉलंड, जपान, डेन्मार्क आणि कॅमेरून हे चारही गुणी संघ एकाच गटात आल्याने अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. फुटबॉल शौकिनांसाठी मेजवानी असलेला हा गट आहे.

ग्रुप ' F ' : इटली, पॅराग्वे, न्यूझीलंड, स्लोवाकिया
'F' गटातून इटली नक्की पुढे जाईल. पराग्वे हा दुसरा संघ पुढे जाऊ शकतो. न्यूझीलंड आणि स्लोवाकिया हे तुलनेने नवीन आणि पात्रता फेरीत फारशी दिमाखदार कामगिरी न केलेले संघ असल्याने हा दुसरा सोपा गट आहे. इटलीचा 'आयर्न डिफेन्स' ही विशेष पाहण्यासारखी बाब असल्याने या लढती चुकवू नयेत.

ग्रुप ' G ' : ब्राझील, उत्तर कोरिया, आयव्हरी कोस्ट, पोर्तुगाल
'G' गट हा अजून एक कडवी चुरस असलेला गट आहे. ब्राझील आणि पोर्तुगाल यांना पुढे जाण्यास प्रत्यवाय नसावा. पण आयव्हरी कोस्ट चा संघ धक्के देऊ शकतो. पात्रता फेरीतील आकडे आणि दिदिएर ड्रोग्बा सारखा आंतरराष्ट्रीय प्रतीचा खेळाडू आयव्हरी कोस्ट खरोखर धोकादायक असल्याचं स्पष्ट करतायेत. ब्राझील आणि पोर्तुगाल बद्दल काही सांगायची गरज नाहीये. रोनाल्डोला पाहायला सगळेच शौकीन उत्सुक असतील. या गटात 'इंडीविज्युअल टॅलेंट' अगदी ठासून भरलाय. एकांडे गोल पहायची उत्तम संधी असे या गटाचे शलके वर्णन करता येईल. उत्तर कोरियाबद्दल आत्ताच काही भाकीत करणे अवघड आहे.

ग्रुप ' H ' : स्पेन, स्वित्झर्लंड, होन्डुरास, चिली
'H' गटातून स्पेन आणि चिली पुढे जातील असे वाटते आहे. होन्डुरास संघाबद्दल फारशी माहिती नाही. पण पात्रता फेरीतील भक्कम कामगिरी त्यांना मुख्य स्पर्धेसाठी आत्मविश्वास देत असेल. पात्रता फेरीत शब्दश: डझनावारी गोल करून होन्डुरास संघाने ते 'जायंट किलर' बनू शकतात हे दाखवून दिलंय.

अनेक तज्ञ लोकांच्या मते यावेळी कुठलाही गट हा 'ग्रुप ऑफ डेथ' नाहीये. पण 'E' गटात ४ चांगले संघ आल्याने त्यातील दोन संघांना मुख्य फेरीतूनच घरी जायचं तिकीट मिळेल हे नक्की. बाकी गटातून सुद्धा खूप चुरस आहे. मुख्य संघ बाद फेरीत पोहोचावेत आणि एक सुरेख बाद फेरी पाहायला मिळावी अशी अपेक्षा आहे. जर्मनी आणि स्पेनला अनेक शुभेच्छा आणि इंग्लंड संघाने यावेळी तरी काही कामगिरी करून दाखवावी ही विनंती.
पुढच्या वेळी काही विशेष संघ आणि त्यांचे फेमस प्लेयर्स यांनी काय 'उजेड' पाडलाय याच्यावर आपण उजेड पाडूयात.

जाता जाता: ही लिंक नक्की पहा! फुटबॉलची अफलातून सेलीब्रेशन्स आहेत ही!
क्रमश:

Thursday, May 20, 2010

गजा


मला वाटतं, तीन-एक  वर्षांपूर्वी मी ही अतिशय छोटी गोष्ट लिहिली होती. तिला रूपक-कथा म्हणावं का नाही ह्यावर वाद होईल,  पण तीच आता परत इथे प्रकाशित करत आहे. प्रस्तावना अशी आहे:
 आपण सगळेजण आयुष्य जगत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. पण ह्यातही कधी कधी आयुष्यातल्या वारंवारितेचा आणि असहाय नकली खोट्या वागण्याचा वैताग येतो. नाटकाचा अंक संपल्यावर नटाने कपडे बदलावे तसे मुखवटे बदलताना मध्येच प्रश्न पडतो की आपला खरा चेहेरा तरी कसा आहे ? आजच्या जगात माणसाकडे चेहेरा उरलेला नाही पण त्याच्याकडे मुखवटे मात्र भरपूर आहेत असा एक भास होतो.  टी.व्ही. म्हणजे एक सतत बदलणाऱ्या गोष्टींचा हलता पडदा, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, टी.व्ही. म्हणजे असं एक स्वत:बद्दलचं चित्र  जे आपण त्या त्या प्रेक्षकांना दाखवू इच्छ्छितो. कॅमेरा म्हणजे हालचाली टिपून घेणारा मेंदू. आपल्या प्रतिनिधीच्या मनातले विचार आणि त्याची इतरांनी घेतलेली दाखल ह्यावर ही कथा बेतली आहे.





गजा कलर TV च्या दुकानात गेला. सगळे TV चालू होते. कोणीही प्रेमळ नव्हतं. कोणी निरागस नव्हतं. TV वरच्या कार्यक्रमात गर्दी होती. गर्दीतही माणसांचे TV आणि तेही सगळे चालू.
तो आत गेला.
" चालू TV बंद पडत नाहीत. आमच्याकडे कधी वीज जात नाही. TV वरचे कार्यक्रम ठरलेले. त्यात तीच गर्दी आणि त्याच गर्दीतले तेच चालू TV.  बरं,  TV बरोबरच आमच्याकडे कॆमेरे आहेत. मुखवट्यांचे फोटो उत्तम प्रकारे काढून मिळतात....... काय म्हणता, माणसांचे फोटो नाही का मिळत ? अहो मिळतात ना, पण काय हो, तुम्हाला कसं कळतं की कोणता माणूस आणि कोणता मुखवटा ? "
" आणि काय म्हणता, मुखवट्याच्या रंगात थोडा फरक आहे? शक्य नाही, म्हणतात या कंपनीच्या मुखवट्याने कधी माणूस बनवलेला आहे. "
" बरं चला, दया माया वगैरे सगळं TV मधे पाहून घ्या, नंतर स्टुडियो मधे गर्दी नको. पुढचे सुद्धा TV अजून यायचे आहेत. त्यांनाही कॆमेरे दाखवायचे आहेत. आणि शिवाय या दुकानानंतर उरलेल्या दुकानांनाही वेळ आहे. "
 " तुम्ही मात्र जरा वेगळेच दिसता. डोळे रोखून मुखवट्याकडे पाहता. अहो, इतकेच जर प्रश्न असतील ना, तर स्वत: च्या TV मधे पहा......."
गजा गर्दीत परतला. सगळ्या गोष्टी टिपणाय्रा CAMERA नं त्यालाही टिपलं. मुखवट्याचे डोळे मिटले. आकाशावर आभाळ आलं

साधनेला मन उपाशी हवं !




लहानपणी आजी बरोबर पोथ्या ऐकताना कधीतरी ही ओळ ऐकली असावी. पण तेव्हा मात्र , शाळेतून घरी आल्यामुळे पोटात जो भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा की, 'आजी, मला साधना नको मला आमटी-पोळी हवी आहे'. असं ओरडतच येत असे ! एकदा दोन घास पोटात गेले की मग तेवढा अध्यायाचा शेवट होईपर्यंत थांबावं लागे. समोरच्या रिकाम्या पाटावर अदृश्य स्वरूपात असलेल्या मारुतीबाप्पाला नमस्कार करण्याच्या उत्सुकतेमुळे फक्त दम निघत असे ! तो एकदा नमस्कार झाला आणि मग आजीच्या तोंडून 'गुणी आहे हो मुलगा, रोज देवापुढे बसतो' असे शब्द ऐकले की मग बाहेर खेळायला जायला तय्यार ! मग नंतर राणी सुद्धा तसंच करायला लागली तेव्हा तिला तिच्या छोट्या छोट्या बोटांनी फुलं वाहताना पाहून खूप मजा यायची. पुढे अजून मोठा झालो आणि साधारण पाचवी-सहावीत असेन तेव्हाही हे वाक्य मधून मधून कधी प्रवचनात , कधी सज्जनगडावर गेल्यावर किंवा एखादं पुस्तक वाचताना झळकून जायचं. तोपर्यंत नुसतीच मजा वाटायची की का बरं उपाशी हवं ? समजा मी जेवण करून बसलो तर मला लिहिता वाचता येईल ? अवघड गणित सुटेल ? हो ! सुटेल की ! त्यात काय , अभ्यास तयार असेल आणि वर्गात लक्ष असेल तर जगात काहीच अवघड नव्हतं !

दहावीत मात्र आजीचे ग्रंथ, पोथ्या आणि प्रवचन यामध्ये लक्षच गेलं नाही. 'कोणीही उपाशी असू दे मी जर आत्ता मार्क मिळवले नाहीत तर नंतर मी खरंच उपाशी राहीन !' असं धमकीवजा तत्वज्ञान डोक्यात भरलं गेलं. पुढच्या वर्षी मात्र थोडं पुन्हा वाचन चालू झालं आणि मग साधना वगैरे शब्दांची पुन्हा उजळणी झाली. फक्त हेच नव्हे तर विवेकानंदांची वेदान्तावरची पुस्तकं वाचण्याएवढी मजल गेली. वेगवेगळ्या मोठ्या लोकांना भेटलो, माहिती गोळा केली पण सगळं करताना मी उपाशी नव्हतो, अधाशी होतो कदाचित ! आयुष्यात ज्या क्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे तो शंकेचा क्षण आला आणि त्यानंतर वाचन थांबलं, पण हे वाक्य सतत मनात घोळत होतं.

बौद्ध-जातककथांमध्ये एक अशी कथा आहे की ज्यात एक अतिशय हुशार शिष्य गुरूला विचारतो, की मला समाधी का लागत नाही. त्यावर गुरु काही न बोलता एका तांब्यातून फुलपात्रात पाणी ओतू लागतो. पाणी ओसंडून वाहायला लागतं तरीही गुरु न थांबता ओततच असतो. खूप वेळानंतर म्हणतो 'तुझं मन हे ह्या फुलपात्राप्रमाणे काठोकाठ भरलं आहे. तू कितीही श्रम केलेस तरी ते वाहून जाणार!' 

खरंच आत्ताची अवस्था काही वेगळी नाही. एखाद्या विषयावर काही लिहावं म्हणलं तर सगळ्या टीपा आणि मुद्दे असूनही डोकं रिकामं होईल तेव्हाच हात आपोपाप चालतात! भरल्यापोटी आणि सगळ्यांभोवती क्वचितच काही सुचत असेल. कवी लोक ह्याला 'कवींची वेदना' म्हणत असतील, संगीतकार त्याला 'सुरांचं बोलावणं' म्हणत असतील, माझ्या बाबांसारखे चित्रकार त्याला 'रंगांची समाधी' म्हणत असतील किंवा सखाराम गटणेच्या शब्दांत ह्याला 'प्रतिभा-साधनेची वेळ !' म्हणत असतील, पण नवीन रचना उपाशी असल्याशिवाय होत नाही!

Wednesday, May 12, 2010

फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात फिफा वर्ल्डकप २०१०!!! (१)

(भाग १)
अजून बरोब्बर एका महिन्याने जून महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी (ता. ११), वैशाख कृष्ण अमावास्येच्या अतिशय उच्च मुहूर्तावर फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याची सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका देशातील 'लीम्पोपो' आणि 'ऑरेंज' नद्यांच्या काठी सर्व फुटबॉल भाविक या दशकातल्या शेवटच्या महाकुंभमेळ्यासाठी एकत्र जमणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको या दोन देशातील सामन्याने सुरुवात होणाऱ्या या कुंभमेळ्यात अनेक देशांचे संघ सहभागी होणार आहेत. खऱ्या अर्थाने जागतिक असलेला हा खेळ आणि त्या खेळाची ही सर्वोच्च स्पर्धा! प्रत्येक सर्वोत्तम संघ यात सहभागी होतायेत. गत-विजेते इटली, उप-विजेते फ्रांस यांच्या बरोबरीने जर्मनी, ब्राझील, आर्जेन्टिना, स्पेन, पोर्तुगाल असे दिग्गज संघ, आणि आयवरी कोस्ट, दक्षिण कोरिया, यांच्यासारखे 'डार्क हॉर्स', आणि दक्षिण आफ्रिका, उत्तर कोरिया सारखे नवखे संघ... एकूणच धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता असणारे हे संघ स्पर्धेतील चुरस वाढवणार हे नक्की!
फुटबॉल इतका लोकप्रिय का?? कदाचित याचं उत्तर याच्या साधेपणातच आहे. एक फुटबॉल, थोडेफार भिडू लोक, आणि भरपूर धावायचा उत्साह इतक्या स्वस्त भांडवलावर आधारलेला हा खेळ जागतिक नसता तरच नवल होतं. आता आपल्याकडचे विट्टी-दांडू, गोट्या, भोवरे हे खेळ अति-स्वस्त आणि अति साधे असूनही जागतिक का झाले नाहीत हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. क्रीडा-मंत्रालय आणि तज्ञ लोक याकडे लक्ष देतील काय? (पुणेरी पाटी: कृपया आपापले विचार मांडावेत, भांडू नये; अन्यथा नारळ दिला जाईल!)
फुटबॉल हा आमचा अतिशय आवडता खेळ असून एके काळी काही फुटबॉल आम्ही चरणस्पर्श करून धन्य केल्याचे आम्हास स्मरते आहे. तसेच श्री. अनुप बडवे यांनी न आणल्यामुळे हरवलेल्या फुटबॉलचे स्मरण होऊन या क्षणी आमचे डोळे पाणावले आहेत. एरवी हजार लाथा खाऊनही ढिम्म असणाऱ्या त्या फुटबॉलची 'मालक विसरोनी गेला' या दु:खापायी अक्षरश: हवा निघून गेली असेल. ऐन पावसाळ्यात सर्वत्र सोसायटीच्या ग्राउंडवर खेळलेले काही अविस्मरणीय सामने आठवून हसू देखील येत आहे. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असे तिरळे भाव घेऊन हा लेख लिहायला घेतला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
या फुटबॉलची गोडी लावण्याचे पवित्र कार्य केलं ते धनंजयरावांनी. धनंजयने फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे माहिती असणाऱ्या सगळ्या खेळात बालपणीच प्राविण्य मिळवून अभ्यासाशी काडीमोड घेतला होता हेसुद्धा जाता-जाता नमूद करावेसे वाटते. असो. विषय फक्त फुटबॉल असला आणि प्रयत्न वर्ल्डकपची माहिती द्यायचा असला तरी फुटबॉल हा खेळण्याइतकाच दर्शनीय, श्रवणीय, आणि चर्चनीय अनुभव आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तज्ञ मित्रांची अतिशय गरज असते. तज्ञ मित्रांनासुद्धा गुमान ऐकणारे श्रोते हवेच असतात.
तर, सुरुवात अशी होते. काळ: इसवी सन १९९४. स्थळ: श्री. अनुपरावजी बडवेसाहेबांच्या घराचा दिवाण-खाना. वेळ: फिफा-१९९४ 'वर्ल्डकप इन अमेरिका' ची फायनल. सगळी अमेरिका, ब्राझील, इटली आणि उरलं-सुरलं सगळं जग डोळ्यात प्राण आणून रॉबर्टो बॅजिओला बघत होतं. काहीश्या निरस फुल-टाईम नंतर पेनल्टी शूट-आउटचा खतरनाक खेळ. म्हणजे पेनल्टी गोलात गेली तर हिरो, नाहीतर झिरो! पहिली पेनल्टी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मिस केली. मग सलग २ पेनल्टी गोलात गेल्या. २-२ अश्या गोल-बरोबरीनंतर इटलीची एक किक मिस झाली. ब्राझीलच्या कॅप्टनने (डुंगा त्याचं नाव) चौथी पेनल्टी नेम धरून गोलात मारली. आता ब्राझील कडे ३-२ चा लीड होता. इटलीचा कॅप्टन आणि 'भरवश्याचा खेळाडू' अशी ख्याती असणाऱ्या रॉबर्टो बॅजिओने चक्क एक उंच झाड लावलं! त्याची किक गोल वरून मागे प्रेक्षकात निघून गेली आणि संपूर्ण स्टेडीयम "ब्राझील ब्राझील " जयघोषात जे काय न्हाऊन निघालंय महाराजा. अशा वेळी झालेला 'फुटबॉलु' चा 'आनंदू' माझे मुखी काय वर्णू?
त्यानंतरचा १९९८चा 'सबकुछ झिदान' वर्ल्डकप, २००२चा ब्राझीलने विक्रमी पाचव्यांदा जिंकलेला वर्ल्डकप, २००६चा जर्मनीमध्ये झालेला आजपर्यंतचा सगळ्यात भव्यदिव्य वर्ल्डकप! प्रत्येक वर्ल्डकप संपताना एक आठवण मागे ठेवून गेला. यातली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे २००२ मध्ये वर्ल्डकप फायनल हरल्यावर गोल-पोस्टला टेकून हताशपणे रडणारा ऑलिवर कान. कान या वर्ल्डकप मध्ये जर्मनीचा कॅप्टन होता, आणि पूर्ण स्पर्धेत त्याने एकच गोल खाल्ला होता. पण शेवटच्या सामन्यात परिस्थिती थोडी बिकट होती. एक तर जर्मनीचा मातब्बर मिड-फिल्डर बॅलाक दोन यलो-कार्ड मिळाल्यामुळे बाहेर होता. आणि ब्राझीलचे खेळाडू कडक फॉर्मात होते. त्यांनी कानची अभेद्य समजली जाणारी जर्मन भिंत २ गोल ठोकून पुरी नेस्तनाबूत करून टाकली आणि त्याचबरोबर वर्ल्डकप जिंकायचं कानचं स्वप्नसुद्धा नेस्तनाबूत झालं. एरवी सिंहासारख्या गर्जना करणाऱ्या कानला असा सर्वस्व लुटून गेल्यासारखं रडताना पाहून जाम वाईट वाटलं होतं. आणि दुसरी आठवण म्हणजे २००६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झिदानने 'हेड-बट' करून हाराकिरी केली ती. झिदान हा फ्रांसचा आधारस्तंभ! पण फायनलमध्ये त्याचा राग अनावर झाला आणि त्याने इटलीच्या मॅटेराझ्झीला डोक्याने जोरदार धडक देऊन पाडलं. साहजिकचं साहेब रेड-कार्ड घेऊन बाहेर गेले, आणि फ्रांस हरला.
(मला स्वत:ला जर्मन टीम अतिशय आवडते. एक अतिशय कट्टर जर्मन समर्थक म्हणालात तरी हरकत नाही. वारा फिरेल आणि गोल होईल तसा पाठींबा बदलणाऱ्यातले आम्ही नाही. 'फर्स्ट लव्ह' जर्मनीला आमचा सनातन काळापासून पाठींबा आहे, आणि तो यापुढेही कायम राहील अशी ग्वाही आम्ही सर्व जर्मन-समर्थकांना याआधीच दिलेली आहे.)
फुटबॉलचा उत्साह, माझ्यासारखेच फुटबॉलवेडे असणारे माझे मित्र, आणि अजिबात कुरकुर न करता आम्हाला दंगा करू देणारे आमचे पालक यांच्यामुळे माझा प्रत्येक वर्ल्डकप साजरा झालाय. माझ्या आजपर्यंतच्या फुटबॉल प्रवासात अनेक नवीन मित्र मिळाले. कुणाला फुटबॉल कळायचा, कुणाला नाही, कुणाला प्रचंड आवड तर कुणाला पुरेपूर उत्सुकता, कुणी त्याचा आवडता देश जिंकावा म्हणून देवाला नमस्कार करून सामने पाहायला बसतोय अशा हवश्या, नवश्या, गवश्या मित्रांबरोबर मी आता माझ्या पाचव्या वर्ल्डकपसाठी सज्ज होतोय. गेल्या वर्ल्डकपच्या फायनलच्या वेळचा स्मिताचा चकित करून टाकणारा उत्साह आणि पुष्करची फुल-टाईम धमाल कॉमेंटरी हे वर्ल्डकपइतकच रंगतदार होतं. तसाच अनुप आणि सारंगने झोपेत पाहिलेली फायनल असंही या फायनलबद्दल सांगता येईल. या वर्षी मात्र जनता जमवून वर्ल्डकप पाहता येणार नाही याचा अतोनात दु:ख आहे. राणीच्या देशात कमतरता कशाची असेल तर मित्रांची. तरी सुद्धा वर्ल्डकप पाहून त्यावर सविस्तर चर्चा करायचं मात्र आम्ही बंद करू शकत नाही.
धनंजयरावांनी यावेळी स्पेनचं पारडं जड असल्याचं सप्रमाण सिद्ध केल्याने आता विजेतेपदाच्या स्पर्धेत जर्मनी बरोबरच स्पेनचाही विचार करावा लागेल. आणि इटली, ब्राझील, फ्रांस, आर्जेन्टिना हे अतिशय ताकदवान संघ आहेत. काही नवखे वाटणारे संघ धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. मात्र, इंग्लंडची अजिबात काळजी नाही, कारण वर्ल्डकप मध्ये सुमार खेळ करायचं त्यांचं फार जुनं धोरण आहे, आणि ते यावेळीही तसंच करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
धनंजय, अनुप, सारंग, आणि स्मिता हे यावेळच्या वर्ल्डकपचे उत्साही पार्टनर आहेत. तुम्हीसुद्धा वर्ल्डकप पहा, आणि एन्जॉय करा! माहितीची गरज काही अंशी पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. पुढच्या वेळी या स्पर्धेत भाग घेणारे संघ आणि त्यांचे ड्रॉ यांची माहिती पाहूयात!
जाता जाता: ही लिंक नक्की पहा! फिफा वर्ल्डकपचं गाणं आहे हे!!
क्रमश:

Thursday, May 6, 2010

पूर्णब्रह्म!

खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मत-प्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात.
मुळात आपण भारतीय लोक हे अतिशय लकी आणि सुखी आहोत. याचा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्य-संस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल? मी खाण्याचे प्रकार म्हणतोय, पदार्थ नाही. सांगून सांगून किती सांगणार? १०,२० फारतर ५०! आपल्याकडे अक्षरश: हजारो खाद्यप्रकार आहेत, आणि अस्सल सुगरिणी रोजच्यारोज नवनवे पदार्थ शोधून काढतायेत. माझ्यासारखा खाण्याच्या बाबतीत अतिशय अडाणी मनुष्यसुद्धा इथल्या कुठल्याही एक्स्पर्ट माणसाला बोलून झोपवून टाकेल. आता काही इंग्रजांचं असं म्हणणं आहे की 'चटणी' हा 'ओरिजिनल इंग्लिश' पदार्थ आहे. अरे, पण मग इंग्लिश जेवणात चटणी का नाहीये? येडे कुठले.. गो-ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराजांची तलवार ढापली, शहाजहानचं मयूर-सिंहासन ढापलं, कोहिनूर ढापून झाला, एवढंच काय पण टिपू सुलतानाच्या महालाचे खांब देखील सोडले नाहीत यांनी. आता चटणी ढापायला निघालेत, चोर लेकाचे! इंग्रज चोर आहेत की नाहीत यावर चर्चा होऊच शकत नाही, कारण ते आहेतच. असो!
मूळ विषय 'खाणे आणि त्याच्या गप्पा' हा आहे, आणि आपण लोक पट्टीचे खाणारे आहोत. सण-उत्सव हे आपोआप आलेले नसून, ते त्या-त्या सणाच्या 'नैवेद्य स्पेशल' पदार्थासाठी 'ॲरेंज' केलेले आहेत, असा माझा पक्का समज आहे. उदाहरणार्थ, मोदक! कधीही करा, चव बदलत नाही, पण गणपतीत करा, आहाहाहा! पुरण-पोळी आणि वाट्टेल तेव्हा वाट्टेल तितक्या पुरणपोळ्या करून वाढणारी आई असेल तर जेवणाच्या पंगतीत साक्षात स्वर्ग अवतरतो! पण ऐन होळीच्या दिवशी पुरणपोळीच्या ऐवजी मोदक केले तर बेत जमून येत नाही राव. 'तेव्हा असावे पुरणपोळीचे, कुणा मोदकाचे ते कामच नव्हे!' चकली हा पदार्थ कधीही टाईमपास करण्यासाठीच बनवला गेलाय! पण दिवाळीच्या दिवसात चिवडा, लाडवाच्या संगतीत चकली कशी शोभून दिसते. शिरा एरवीही आवडेल, पण चतुर्थीच्या नैवेद्याला केलेला शिरा एकदम सात्विकच बनवून टाकतो! त्यातही केळं,वेलची वगैरे घालून केलेला शिरा असेल तर एकदम सारसबागेचाच गणपती आठवणार बघा!
कालच मी आणि माझा मित्र 'मऱ्हाटी खाद्यप्रकार' यावर जरा गप्पा मारत बसलो होतो. जरा म्हणजे ऑफिस मध्ये जेवण करून सुस्ती येते त्या वेळी. थोडक्यात दुपारी २ ते ४:३०! दोन-अडीच तास आम्ही फक्त 'मिसळ' वर गप्पा मारल्या. पुण्याची रामनाथ, बेडेकर, श्रीकृष्ण, श्री इत्यादी अतिशय फेमस आणि बाकी नॉर्मल पुण्यातली वर्ल्ड फेमस 'मिसळ' नावाचं पूर्णब्रह्म पुरवणारी केंद्र, आणि ठाण्याचं 'मामलेदार'! (मित्र मुंबैकर आहे, थोडा मान ठेवावा लागतो!) अशी मैफिल जमलीये म्हणून सांगू! बास, त्याच्या नंतर फक्त एक प्लेट मिसळ, ४ पाव, एक जोरदार लालभडक तर्री आणि नंतर गार गार ताक ऑर्डर करायचं राहिलं होतं. पण हाय, आम्ही बसलो होतो गोऱ्या साहेबाच्या ऑफिसात; तिथे बर्गर, बिन्स, आणि पास्ता याच्या पलीकडे कोणी काही गिळेल तर शपथ आहे. डुक्कर खायला सांगा यांना, डुक्कर मेले! आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथल्या 'इंडियन' हॉटेलात गोऱ्यांची जितकी गर्दी असते तितकी गर्दी त्या हॉटेल च्या आजूबाजूच्या ४ इंग्रजी हॉटेलात मिळूनदेखील नसते. म्हणजे चव वगैरे कळते यांना थोडीफार, पण तिथेही नाक वर! त्या हॉटेलात खाणार आणि मग 'करी' इथेच कशी 'भारी' बनते याच्या बाष्फळ बाता मारणार.
फक्त मिसळीवर २ तास गेले, वडा-पाव वर तर चकार शब्द बोललो नाही आम्ही. पुरणपोळी आणि मोदक तर अजून लिस्ट मध्ये यायचेत. खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी हे तर मिडल-ऑर्डर बॅट्समन आहेत. स्वीकारचे पोहे, अण्णाचा चहा, अप्पाची खिचडी, वैशाली, रुपाली, सोलकडी, दुर्गाची कॉफी वगैरे तर एक्स्ट्रा मधेच! इथे सलामीचा पहिला फलंदाजच दुसऱ्याला बॅटिंग करू देत नाहीये अजून.
तसं पाहायला गेलं तर मला भारतीय पदार्थांचा अगदीच उपास वगैरे घडलेला नाहीये. देवाच्या कृपेने मी जिथे राहतो ते स्वत: 'मुंबै' कर आहेत, आणि मालकीणबाईंच्या जेवणाला झकासच चव आहे. अहो, होळीच्या दिवशी एकदम अस्सल साजूक तुपातली पुरणपोळी मिळाली आहे मला! रोजच्यारोज वरण-भात, कढी/आमटी, २ भाज्या, गरमागरम पोळी असा साग्रसंगीत आणि सणसणीत बेत असतो. भरपूर वेळ, मोकळ्याढाकळ्या गप्पा आणि त्या जोडीला मस्त जेवण. अजून काय हवं?
पण कधीतरी अचानकच 'पुणेरी' पदार्थ डोक्यात रुंजी घालायला लागतात, स्वत:ची महती सांगायला सुरुवात करतात आणि आमचा कलेजा पार खलास होऊन जातो. आम्ही आमचे रहात नाही, कश्शाकश्शाचं भान उरत नाही, 'देह इथे आणि मन थेट पुण्यात, स्वयंपाकघरात' अशी अवस्था होऊन जाते. आईच्या हातची चव, आत्त्याने केलेली चिंच-गुळाची आमटी, साउच्या हातचे मोदक, श्रद्धाचे स्पेशल 'दादा' साठी बनवलेले पोहे- सतराशे साठ पदार्थ आठवतात, आणि खरोखर हळवं होऊन जायला होतं. आपले लोक आणि आपली चव यांचं महत्व बाहेर राहिल्याशिवाय कळत नाही म्हणतात हेच खरं!!!

माहित नाही ....(कविता)

3/25/2010

माहित नाही ....

आजवर अनेक कविता केल्या 

त्याहूनही जास्त वारेमाप पुसून टाकल्या
हीसुद्धा कदाचित शेवटी पुसून टाकीन
काय आहे, शब्दांचा सुद्धा येतो कंटाळा, कधी कधी 


मी अडचणीतच कविता खूप करतो,
मी एकटेपणातच खूप लिहितो, असंही नाही 
कागदही फाटतो, शाई उठत नाही
काय आहे, पेन्सीलही नाही म्हणते, कधी कधी 


शब्दांची रेलचेल बघतो आपण,
निष्पाप जीवांची घालमेल बघतो आपण
मन हेलावताना कोंबडी खातो आपण 
काय आहे, कशातच अर्थ नसतो , कधी कधी



तुम्हाला सगळ्या कविता आयुष्याबद्दलच हव्या,
कविता करताना मनाला वेदनाच हव्या 
प्रखर,गंभीर, रसपूर्ण शब्दांची मोहिनी सुद्धा हवी, पण
काय आहे, देवही अमृताऐवजी चहा घेतो कधी कधी 


प्रेमात कवितेच्या कळ्या होतात, वैराग्यात ती फुलते 
धुंदीत कविता दिसते, शुद्धीत तिचं स्तोत्र बनतं, पण 
वेदनेत कविता साधळते आणि मृत्यूत कविताच गोठते 
हे सारं सारं नकोसं वाटतंही , कधी कधी 

जय महाराष्ट्र!!

प्रिय अमुच्या एक महाराष्ट्र देशाला 'जय महाराष्ट्र' करून आता उणेपुरे ५ महिने होऊन गेले. खरंतर गेल्या महिनाअखेर गोऱ्यांच्या राणीला आणि तिच्या देशाला सुद्धा 'जय महाराष्ट्र' करून स्वगृही प्रयाण करायचा विचार होता, पण आमच्या महाराष्ट्रात राहूनही अमहाराष्ट्रीय असणाऱ्या प्रोजेक्ट मधील वरिष्ठाच्या कावेबाज कुटनीतीमुळे तो विचार आता वेस्टमींस्टरच्या कुठल्यातरी थडग्यात चिरविश्रांती घेत पहुडला आहे. आता मला 'जय महाराष्ट्र' करायचं तिकीट श्रावणातलं दिलंय. माननीय राज, किवा श्री. दादू ठाकरे, किवा आपले लाडके जोशी सर, दादा, भाई, किवा झालंच तर साहेबाना सांगून यावर कडक उपाययोजना करावी असा माझा जहाल विचार आहे. एका मराठी माणसाला मातृभूमीपासून दूर ठेवणारे, हे महाराष्ट्रात येऊन काड्या करणाऱ्या पर- प्रांतीयांइतकेच पापी आहेत. महाराष्ट्रातल्या पर- प्रांतीयांकडे जितकं लक्ष या नेतेमंडळींचं आहे त्याच्या १ टक्का लक्ष जरी पर-प्रांतातल्या मराठी लोकांकडे दिलं तरी ती सगळी जनता धन्य होऊन जाईल.
असो! मुद्दा 'जय महाराष्ट्र' करण्याचा आहे. पण एकूणच ह्या 'जय महाराष्ट्र' ची मजा आहे. आधीच्या पक्षाला नुकताच 'जय हिंद' करून आलो, असा कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही, किवा अस्सल कन्नडिगा मनुष्य देखील 'जय कर्नाटक' म्हणताना आढळलेला नाही. म्हणजे जयजयकारातच 'कल्टी' देण्याचं सामर्थ्य असलेला नवीन वाक्प्रचार मराठीला अगदीच जमून गेला आहे. हल्ली महाराष्ट्रात जे नवीन पक्षांचं पीक आलंय त्यामध्ये इकडून तिकडे उड्या मारणं याला 'पक्षांतर' असा तांत्रिक शब्द असला, तरी बोलीभाषेत त्याला 'जय महाराष्ट्र करणे' असंच म्हणतात.
'नारायणरावांनी' 'बाळासाहेबाना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'राजसाहेबांनी' 'शिव-सेना' आणि 'विठ्ठलाच्या बडव्यांना' केलेला 'जय महाराष्ट्र', 'मोठ्या' साहेबांनी 'हाय-कमांडला' केलेला 'राष्ट्रीय' पातळीवरील 'जय महाराष्ट्र' अशी ठळक उदाहरणं आपण पहिलीच आहेत. तर बाकी रोजच्यारोज चालू असणारी राज्य पातळीवरील, जिल्हा, तालुका, शहर, गाव, वार्ड, गल्ली, सोसायटी पातळीवरील 'जय महाराष्ट्र' प्रकरणांचा नुसता पूर आलाय. कोण कुणाला 'जय महाराष्ट्र' करून कुठे जातंय, आणि कोण 'आपण असं काही केलंच नाही' ची कोलांटी मारतंय याचा अजिबात पत्ता लागत नाहीये. आता पब्लिक मध्ये 'जय महाराष्ट्र' म्हणून खाजगीमध्ये आपण असं केलंच नसल्याची कबुली देणारे महाभागही आहेत. एकमेकांना 'जय महाराष्ट्र' करून, पक्ष बदलून, पुन्हा एकाच पक्षात येणारे वीरही आहेत. पण एकदा जाहीर 'जय महाराष्ट्र' केला की आपण तो केलाच नाही असं म्हणणारा, हा राज्याच्या अस्मितेला प्रकट धक्का देतोय हे लोकांच्याच लक्षात आल्याने, असल्या कोलांट्या मारण्याचा उपयोग त्या उमेदवारास फक्त मदाऱ्याकडेच होऊ शकतो हेही आलंच. सरांच्या 'कोहिनूर' मध्ये याचं खास प्रशिक्षण दिलं जातं असं आम्ही ऐकून आहोत!
महाराष्ट्रातल्या सगळ्या बातम्या इकडे परदेशी पोहोचत नाहीयेत, कृपया 'सकाळ' याकडे लक्ष देईल काय? साहेबाना सांगितलं पाहिजे, नाहीतर थोडेच दिवसांनी परत महाराष्ट्राचा जयजयकार गाताना कोण पार्टी कुठे आहे हेच कळणार नाही, आणि पार्टीतला कोण कुठे आहे याचाही पत्ता लागणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या फडात विलक्षण तन्मयतेने आपापले फेटे उडवून, शिट्ट्या वाजवून दाद देणारे रसिक आम्ही, असल्या न पोहोचणाऱ्या, न कळणाऱ्या बातम्यांमुळे हिरमुसले आहोत. साहेब, किवा दादा याकडे लक्ष देतील तर बरं होईल! महापालिका निवडणुका होतायेत, निकाल लागतायेत. या सगळ्या राजकीय धामधुमीत सुद्धा एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे उभा महाराष्ट्र पेटून उठलाय, आगीत होरपळून निघालाय. आणि याचं कारण राजकीय मुळीच नाहीये.
परवाच 'सकाळ' मध्ये एक अजून धगधगीत वाक्प्रचार वाचायला मिळाला. "विदर्भात उन पेटले!" आवरा! कर्नाटकात पाणी पेटले, मराठवाड्यात कापूस पेटला, खानदेशात उसावरून कारखाने पेटले वगैरे ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्ष उन पेटल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. आत्ता फक्त उन पेटल्याच्या बातम्या आहेत , पण या पेटलेल्या उन्हामुळे पुढे पाणी , मग वीज आणि त्यानंतर महागाई पेटेल हे या सगळ्या 'जय महाराष्ट्र' वाल्यांना दिसत नाहीये का? आणि इतके सगळे झाल्यावर जनता पेटून उठली आणि ज्या व्हायला नको अश्या दंगल,लुटालूट वगैरे गोष्टी सुरु झाल्या तर जबाबदार कोण? की पुढच्या निवडणुकांच्या वेळीच सगळे जागे होणार? की कोणीतरी यांच्या कानाखाली पेटवल्याशिवाय यांना समजणार नाही?
मातोश्री, वर्षा, कृष्णकुंज, बारामती, सिंधुदुर्ग, मराठवाडा, नागपूर याची वेळीच दखल घेतील काय? की त्यांनी या अति-महत्वाच्या मुद्द्यांना देखील 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे???