Thursday, October 14, 2010

अजून काय..

बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला
पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला
आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल
आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय!

महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात
दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात
दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील
आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय!

आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत
अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत
परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील
आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय!

एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत
आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत
दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल
आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय!

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!

इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येतील पुन्हा छत्रपती, नि टिळक, नि सावरकर की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय!