Friday, April 23, 2021

रिकामा कवी, विचारांच्या तुंबड्या

कोविड झाल्याचं नक्की झालं, १४ दिवसांसाठी रवानगी आतल्या खोलीत झाली. नाही म्हटलं तरी या एकांतवासाचं कुतूहल होतंच. पण पाहिले ४ दिवस तापात गेले, पुढले ४ दिवस अशक्तपणात गेले. उरलेले दिवस फक्त लोळून काढले. सगळा क्वारंटाईन पिरियड लोळून लोळून संपवला, काही नवीन वाचलं नाही, लिहिलं नाही.. 

गेल्या १४ दिवसांची एकांतकोठडी रिकामीच राहिली.



परिस्थिती बेक्कार आहे सध्या, कवितेच्या आस्मानात दुष्काळाचा ढग आहे

शब्दांचा अँसिड-रेन आणि इमोशनचा कोवीड आहे


सुचते सुचते कविता म्हणावं तर ड्रेनेजला बोळा बसलाय

विचारांच्या पन्हाळीत कचरा अडकलाय


डोक्याचं भिरभिरं आणि मनाचं डबकं झालंय

कवितांच्या ओळींच त्यात बेडूकराव डराव होतंय


विचारांचं जंगल, त्यात शब्दाचं माकड

आपल्याच ओळी आणि त्यासुद्धा भाकड


म्हणून हल्ली कविता करत नाही, हल्ली कविता वाचत नाही

आणि तसंही कविता करावी असं काही सुचतच नाही...


कवितेला स्वल्पविराम, विचारांना पूर्णविराम

या कवितेलासुद्धा आपला इथेच राम राम!!


- समीर