Wednesday, November 4, 2020

मृत्तिकेची साम्राज्ये

 

अथांग निळ्या आकाशाकडे पाहत ते वारंवार विचारतात, 

अजून किती दिवस?


पृथ्वी नि:क्षत्रिय केली एकवीस वेळा

परशू उगारून चालून गेलो प्रत्येक वेळी

जो कोणी उभा राहिला माझ्याविरुद्ध, 

अश्व-गज-रथातून, तो रथी महारथी

कुणाची टाप होती मला मारायची

मी अजिंक्य, मी अमर, मी चिरंजीव!!


वडिलांना बायको हवी होती, नवीन

तिला मी मुळीच नको होतो, कारण

मी तिच्या होणाऱ्या मुलांचा प्रतिस्पर्धी

वडीलांच्या इच्छेसाठी मी वचन दिलं, ब्रह्मचर्याचं

तेव्हापासूनच मी हा असा एकटा, एकाकी

सव्वाशे वर्षे जपतोय त्या कुटुंबाला, ज्यांना मी कधीच नको होतो

बापाने वरदान म्हणून इच्छामरण दिलं आणि 

पुन्हा एकदा घात केला माझा

मी पराक्रमी, मी इच्छामरणी, मी चिरंजीव!!


कायम दयेवरच वाढलो मी,

कधी शेजाऱ्यांच्या, कधी मामाच्या,

कधी पितामह तर कधी राजकुमाराच्या

युद्धात मला रसच नव्हता, पण

बाप मेल्याचं कळलं तेव्हा सैरभैर झालो मी,

आणि नंतर माझ्या शेवटच्या दयावानाला असं

छिन्नविछिन्न मरताना पाहून वचन दिलं मी

सूड घेईन सूड, त्याच्यासाठी, माझ्यासाठी, शंभरांसाठी

मारले पाचपन्नास, सोडलं ब्रह्मास्त्र

काय केलं, काय मिळवलं, आता उरलो फक्त जखमेपुरता,

तेलापुरता, मी चिरंजीव!!


कुणीतरी लोगान जन्मा येतो, मरायचं नाव नाही

मारतोय, मारतोय, भल्यासाठी, बुऱ्यासाठी,

कधी सैनिक म्हणून, तर  कधी भाडोत्री

मग कोणी एक झेवियर भेटतो, आता आम्ही एक्स-मेन

पण कत्तल सुटत नाही, मनातून रक्ताळलेपण जात नाही

संसार नाही, मैत्र नाही, यातून अजिबात सुटका नाही

आणि आम्ही कोण, आम्ही चिरंजीव!!


आमची धुळीचीच चित्रे, धुळीचीच साम्राज्ये

वाळूचे किल्ले आणि मातीचे इमले

जग जातंय पुढे, युगामागून युगं

आम्ही तिथेच, त्याच अमरत्वाच्या गर्तेत

सगळ्यांचेच हात रक्ताळलेले, मनं उद्विग्न

आणि जेव्हा जेव्हा कोणी सर्वसामान्य मरतो ना जगात, 

शपथ घेऊन सांगतो, सगळे असामान्य चिरंजीव थुंकतात स्वतःच्या जिंदगानीवर


- समीर

2 comments: